अनघा ठोंबरे

अनघा ठोंबरे यांचं पुण्याला आपल्या राहत्या घरीच एक अनोखं ‘दुकान’ आहे, गेली पंधरा वर्षे सुरू असलेलं. हे दुकान आहे कॅशलेस. कारण तिथल्या वस्तू फुकट दिल्या जातात. दिवाळीला कपडे, नवरात्रीत नऊ साडय़ा, ईदसाठी ओढण्या, वारीसाठी टोप्या, अनवाणी लोकांना चप्पल, भुकेल्यांना अन्न, लहान मुलांना खेळणी, कष्टकरी बाईला तवा, कुकर, इतकंच नाही तर ‘स्थळ दाखवायला’ नवीन कपडेही.. सारं काही इथे मिळतं.. समाजातल्या गरीब बांधवांसाठी सुरू असलेल्या या अनोख्या ‘दुकाना’साठी हजारो लोकांची मदत झाली.. होते आहे.. ‘पिंपळाला पार बांधण्यासाठी’ असंख्य हात पुढे येत आहेत..

Millions of online bets on IPL in gadchiroli
गडचिरोली : ‘आयपीएल’वर कोट्यवधीचा ऑनलाईन सट्टा!
couple confessed to murdering the girl as they could not take care of it
मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने केली हत्या, दाम्पत्याची कबूली
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Girl organ donation
शेतमजूर कुटुंबाचा धाडसी निर्णय; मुलीच्या अवयवदानातून…

यशाच्या एका क्षणी माझ्या आईने मला सांगितलं, ‘‘आपलं आयुष्य, आरोग्य, यश, समृद्धी, शिक्षण यांच्यामागे कितीतरी राबणारे, कष्ट करणारे हात असतात, मग ते हात शेतात राबणारा शेतकरी,ओझी उचलणारा हमाल, सफाई कामगार, बांधकाम कामगार, शेतकरी, मोलकरणी, सीमेचे रक्षण करणारा जवान असे अगणित असतात. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे, ते सगळे यशाचे, श्रेयाचे वाटेकरी आहेत. आपण सण, उत्सव साजरे करतो, छंद, मनोरंजनाने आनंदी होतो, नोकरी करतो, वृद्ध रुग्णांची सेवा करतो, घर सजवतो, प्रत्येक वेळी त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे. पिंपळाला पार बांधत राहावं.’’ माझ्या आईच्या शब्दाला ‘अमर’ करण्यासाठी एका क्षणी मी भरपूर पगार, सुविधा असणारी केंद्र सरकारची सन्मानाची नोकरी सोडली आणि गरिबांसाठी ‘समाजप्रस्थाश्रम’ स्वीकारला. घेणाऱ्यांचे हात हजारो आहेत हे माहीत होतंच, पण देणाऱ्यांचेही हात हजारो आहेत, याचा साक्षात्कार झाला, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या देण्या-घेण्यातून असंख्य आठवणी माझ्या पदरात पडत गेल्या.. समाधानाचं कटोरं शिगोशिग भरत गेलं.. आजही जातंय..

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला फक्त फिल्मी गरिबी माहिती होती, खरी गरिबी कधी अनुभवली नव्हती वा त्यांच्या जगण्याशी माझा थेट सामना कधीच झाला नव्हता. पण आजूबाजूला गरिबी होती. लांब अंतरावर असली तरी दिसत होती. झोपडपट्टीतलं जगण्याची मी कल्पना करू शकत होते. उपाशी असणं, जे हवं ते न मिळणं यातली कुचंबणा मला जाणवत होती. आणि गरिबीसाठी माझ्या दृष्टीने कारणीभूत होता, शिक्षणाचा अभाव. मग त्यांच्यासाठी काही करायचं तर सुरुवात त्यांच्या शिक्षणापासून करायचं ठरवलं, गरीब वस्तीतल्या लोकांना साक्षर करायचं ठरवलं. पण मला लवकरच उमजलं शिकवण्यापेक्षा त्यांच्याकडूनच शिकण्यासारखं खूप आहे. त्यांचं स्वत:चं एक तत्त्वज्ञान आहे, एक संस्कृती आहे आणि ते त्यांना जगण्याचा अर्थ देत आहेत. जे आहे ते स्वीकारण्याची, गोड मानून घेण्याची त्यांच्यात एक उपजत समज आहे, हे लक्षात येत गेलं, सणावाराला नवी साडी नेसून, बेंटेक्सचे दागिने घालून, डोक्यात गजरा माळून दहा घरची भांडी घासणारी बाई, तिची हौस, डोळ्यातला आनंद, उत्साह, रोज जीवनमरणाचा, दोन वेळच्या जेवणाचा संघर्ष असूनही तिला असणारी जीवनाची ओढ पाहून सकारात्मक जगण्याचा अर्थ मीच त्यांच्याकडून शिकले, जगण्याच्या विद्यापीठात! त्या माझ्या कितीतरी पुढे होत्या, त्यांनी माझी दु:खं छोटी केली, माझं मन मोठं केलं. मी त्यांची श्रोता झाले, एवढय़ा छोटय़ा गोष्टीनेही त्यांनी मला खूप प्रेम दिलं, निरपेक्षपणे. मग त्यांच्यासाठी मी ‘आस’ हे महिला मंडळ स्थापन केले.त्यांच्या अपेक्षा अगदी छोटय़ा होत्या, पण त्यांची हौस खूप मोठी होती.. आणि ती पूर्ण करण्याची संधी मला लवकरच मिळाली.

एका गरीब मुलीची ब्रेन टय़ुमरची शस्त्रक्रिया करायची होती. ती गुणी मुलगी कविता करत असे, या कवितांचे पुस्तक प्रसिद्ध करायची तिची शेवटची इच्छा होती. उपचार, तपासण्यांसाठीही पैसे नव्हते, तिच्याविषयी एका वृत्तपत्रात लेख लिहिला आणि मदतीचा ओघ सुरू झाला. लोकांनी भरभरून मदत केली, सर्व तपासण्या, उपचार, शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळाले. मुख्य म्हणजे या शस्त्रक्रियेनंतर ती वाचली, ती आता दोन मुलांची आई आहे. मग तिच्या वस्तीतल्या अनेक गरीब स्त्रिया आल्या. त्यांनाही मदत हवी होती. मग वृत्तपत्रे मासिकातून अनेक लेख प्रसिद्ध झाले, त्याच्याशिवाय सगळं अशक्यच होतं, त्यांचे उपकार विसरू शकत नाही, कधीच नाही.  और कारवाँ बनता गया.. अशा पद्धतीने असंख्य लोक जोडले गेले. अनेक जण काही ना काही आणून देऊ लागले. चांगल्या अवस्थेतील वस्तू, तर काही वेळा न वापरल्या गेलेल्या वस्तू, अगदी भांडीसुद्धा. काही तर अगदी कोरी करकरीत. काहींनी त्यांचे संपर्क क्रमांक दिले. काहीही लागलं तरी फोन करा, असं आवर्जून सांगितलं. अशा तऱ्हेनं माझं गरिबांसाठीचं ‘कॅशलेस दुकान’ सुरू झालं. इथे सगळं काही मिळतं. एकही पैसा न घेता.

प्रथम कपडय़ांचं दुकान सुरू झालं. अनेक लोक जुने पण चांगल्या अवस्थेतले कपडे आणून देतात. मग ते गरिबांना, कष्टकऱ्यांना दिले जातात. एकदा एक माहिती समजली, नवीन जन्मलेल्या बाळांना झबली नसतात. एका रुग्णालयामध्ये ही दीडदोनशे बाळे उघडीच असतात, असं कळलं. अनेकांनी मला जे फोन नंबर दिले होते, त्यांच्याशी संपर्क साधला. मग ब्लाऊजपीस, कटपीसेस लोकांनी आणून दिली, एका मैत्रिणीने तीनशे झबली मोफत शिवून दिली, माझ्या दुकानात झबली आली. ज्यांना ती हवी होती त्या गरीब स्त्रिया माझ्या या दुकानात आल्या आणि आवडीची झबली घेऊन गेल्या. बाळांना झबली मिळाली, त्यांचे गोजिरवाणे चेहरे डोळ्यासमोर आले नि मी खूप श्रीमंत झाले. मी माझी राहिलेच नाही..

मग माझे कपडय़ांचे दुकान प्रसिद्ध होत गेले, इकडे देणाऱ्यांचे हातही हजारो झाले. एकाने रेडिमेड कपडय़ांचे दुकान बंद केले, मुलांचे चारशे ड्रेसेस मला फुकटात आणून दिले. ते सारे आदिवासी, ग्रामीण भागात पाठवले. आदिवासी भागातली मुले तर चार दिवस अंगावरचे कपडे धुण्यासाठी द्यायला देखील तयार नव्हती, नुसतं ऐकूनच अंगावर रोमांच उभे राहिले. माझा प्रत्येक सण वेगळ्या अर्थाने आता साजरा होतो. रमजान ईदला मुलींना, बायकांना नमाज पढायला नव्या ओढण्या हव्या असतात. पण त्याचबरोबरीने त्यांना हवी असलेली खजूर, दुधाची पाकिटं तीसुद्धा या दुकानात मिळायला लागली. असंख्य अनामिक देणाऱ्यांची एक मोठीच्या मोठी यादीच आहे माझ्याकडे. एक फोन करायचा अवकाश माझ्या या दुकानात सगळं काही येऊन पडतं. अगदी भरभरून. मग मी गरजूंना मानाने बोलावते, कुणी बोहारणी, कुणी कासारणी, कुणी मोलकरणी, कुणी गावाकडच्या. सगळ्या जणी तृप्त होऊन जातात आणि मग माझ्यासाठी मशिदीत मन्नत मागितली जाते, माझ्यासाठी ‘रोजे’ धरले जातात. मोराचे पीस पायाला आणून बांधलेही जातात. अतीव प्रेमाने माझी ईद आनंदमय होते. पांडुरंगाच्या वारीच्या वेळी टोप्या, पायजमे, शर्ट, धोतर हवे असतात अनेकांना. दोन-तीन महिने आधीपासून मी ते जमवायला सुरुवात करते. मग साबण, टूथपेस्ट, पाण्याच्या बाटल्याही जमवते सगळ्यांना वाटायला. आजपर्यंत कधी काही कमी पडले नाही की अपुरे पडले नाही. मी वारीला न जाताही प्रसाद आणून दिला जातो, प्रत्येकात विठुराया दिसतो. घरबसल्या पुण्य कमवते. नवरात्रातल्या नऊ दिवसांत उपवासाला दाणे, साबुदाणे, राजगिरा वडय़ा आणून दिल्या जातात आणि मागितल्याही जातात. सगळ्या सणांना काही ना काही दिलं- घेतलं जातंच. सगळे देव माझ्यावर प्रसन्न आहेत. इतकंच कशाला अनेकांच्या लग्नपत्रिकेवर माझं नाव असतं. कुणी पाया पडायला येतात, कुणी कानावर बोटे मोडतात, कुणी मलाच खाऊ आणून देतात. खूप काही घडत असतं या देण्या-घेण्यात!

इतकंच कशाला एखाद्या गरीब मुलीचा ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम असतो. कधी तर तो माझ्या घरातच होतो, मी चहा बिस्किटे आणते, तिला चांगला ड्रेस लागतो, तो मी आधीच मिळवलेला असतोच. तो मग अशा मुलींच्या अंगावर चढतो. लाजणारी ती मुलगी जेव्हा लग्नाच्या बोहल्यावर चढते तेव्हा मी भरून पावते. माझ्याकडे येणाऱ्या मुलींमध्ये अंध मुलीही आहेत. त्यांना अंगभर कपडा लागतो, त्यांच्यासाठी पूर्ण बाह्य़ांचे ड्रेस लोक मला आणून देतात. गरीब शेतकऱ्यांना शहरात उपचाराला, कुणाला भेटायला यायचे तर धड कपडे नसतात अंगावर, काही जण मग शेजाऱ्यांचे बिनमापाचे कपडे घालून येतात. कुणी असे लोक दिसले की माझ्या दुकानातले कपडे त्या खेडय़ापाडय़ात जातात. महालक्ष्मीला नेसवायला साडय़ा, घराला दार नसते, मग लावायला पडदे, असा पडद्यांचा स्टॉकही माझ्या दुकानात असतो. पावसात पॉलिएस्टर साडय़ा लागतात, थंडीत स्वेटर्स, बाळांना गुंडाळायला सुती साडय़ा लागतात. पेटिकोट्सची तर कायम डिमांड. अधिक महिन्यात गरीब स्त्रियांना पेटिकोट्स वाटते. माझ्या दुकानात सर्व व्हरायटीज मिळतात. साठ सत्तर आज्या आहेत, त्या नऊवारीच नेसतात. आता नऊवारी जुने मिळतच नाही मग नवीन नऊवारी साडय़ा माझ्या दुकानात दिवाळीत येऊन पडतात. मोठे दुकानदारही भरपूर डिस्काऊंट देतात. रिक्षावाले ओझी उचलायला मदत करतात. ‘आमचाही हात लागू दे’ म्हणतात. माझे ‘दुकान’ सजते. नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेकींना नऊ रंगांच्या साडय़ा हव्या असतात. मग माझे फोन अनेकींना जातात. नातेवाईक, मैत्रिणी, मंडळे, कट्टे, सोसायटय़ा.. त्यांच्याकडून भरपूर साडय़ा येतात. माझाही खारीचा वाटा असतो. संक्रांतीला काळी साडी पाहिजेच असते. मग त्या जमा करायच्या. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला पांढरी साडी हवी असते, दिवाळीत जरीच्या साडय़ा पाहिजेत, असा चक्क आग्रह असतो. मग दिवाळीआधीच त्या माझ्याकडे न्यायला येतात आणि दिवाळीत मॅचिंग ब्लाऊज शिवून छान नेसून येतात. एकीला गोंडय़ाच्या साडय़ांची हौस, मला हळूच कानात सांगून गेलेली असते. मग ती साडी दिसली की मलाच खूप आनंद होतो. तिला देते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक मला तृप्त करते. एकदा एका गावी एक टेम्पो भरून कपडे पाठवले, त्यात काही नवेही कपडे होते. ते लोक कपडे घालून नाचले, अक्षरश: रडले. अत्यानंदाने तो दिवस त्यांनी सणासारखा साजरा केला. मला फोन येत होते, तो दिवस माझ्यासाठी दिवाळी दसराच होता. त्यांचा आनंद मला ‘जीनेका बहाना’ देतो.

कपडय़ांबरोबर सर्वाधिक मागणी असते ती वस्तूंना, भांडय़ांना. या लोकांना मी त्यांना देणारच हे इतकं पक्कं माहीत असतं की चक्क हक्काने मागूनच घेतात. ‘आम्ही कधी कान असलेल्या कपातून चहा प्यायलो नाही. आम्हाला कपबशा द्या,’ मागणी येते. मग मी माझ्या ओळखीतल्यांना फोन करते. ते लोक स्वत:साठी नवे कप आणतात आणि जुने माझ्या गरिबांसाठी देतात. अशा देण्यातून मला हजारो लेकी मिळाल्या आहेत. चकलीसाठी कुणाला सोऱ्या हवा असतो, कुणाचा कुकर नवरा दारू पिण्यासाठी विकतो, तिला कुकर, एकदा रस्त्यावर तीन दगडांची चूल मांडणारीने मला तवा मागितला, भाकरी नाही मागितली, हे मला विशेष वाटलं. मग लोकांकडून मला जुनी भांडी मिळू लागली, जुनी कसली नवीनच. दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याचे कॅन्स, भांडी लागतात, मग लोकांनी बादल्या, कळशा आणून दिल्या. गेल्या पंधरा वर्षांत काय हवे तेही समजले. मला आणि देणाऱ्यांनाही! सगळं आपसूक माझ्या या दुकानात येऊन पडतं किंवा पैसे येतात त्यातून विकत घेतलं जातं.

देणाऱ्यांना फक्त निमित्त लागतं. कुणी मग स्वत:चे, मुलाचे वाढदिवस, कुणाचे स्मृतिदिन तर कुणी दिवाळी, दसरा, नवरात्र या सणाच्या निमित्ताने अनेक वस्तू आणून देतात अगदी नवीन. माझी ही मुलं गोटय़ा, दगडांनी खेळतात.. मला वाटतं त्यांनाही मिळावी खेळणी. मग काय मनात यायचा अवकाश खूप खेळणी आणून देतात लोक! मी त्यांचं छोटं प्रदर्शन भरवते. या सगळ्या मुलांना बोलावते. ज्याला जे हवे ते खेळणे निवडायचे. तो बालआनंद मला माझ्या बालपणात नेतो. मी छोटी मुलगी होते, बाहुलीचे लाड करते.. खऱ्या आणि खेळण्यातल्याही.

उन्हात पाय भाजतात, चटके खात खात लोक माझ्याकडे येतात. चप्पल, बूट मागायला. माझ्या या दुकानात ते असतातच. मग आपल्या मापाचे, आवडीचे चप्पल, बूट घेऊन जातात. एकदा एका गरीब, गुणी मुलीने कळवलं, तिला शिवण मशीन पाहिजे होते. ती त्याचा नक्कीच चरितार्थासाठी उपयोग करणार याची मला खात्री होती. सहज म्हणून, पाहू या तर खरं म्हणून फोन केले तर एकाने एक छान मशीन नवी मोटर बसवून आणून दिली. मोठी माणसं तर मदत करतातच पण त्यांचं पाहून लहान मुलंही त्यांच्या या मित्रांसाठी मदतीचा हात पुढे करतात. काही शाळांचे विद्यार्थी मदत करतात. ‘मोती साबण, पेन्स, टूथपेस्ट, खेळणी, हौसेने आणतात.  एका रोजगार हमीवर काम करून इंजिनीअरिंग करणाऱ्या तरुणाला कॉम्प्युटर हवा होता. तोही प्रिंटरसकट एकाने आणून दिला. सायकल हव्या होत्या तर मोठय़ा सोसायटीतल्या पार्किंगमधल्या वीस सायकली दुरुस्त करून आणून दिल्या. गरजेच्या वस्तू दिल्या घेतल्या जातातच पण गंमत म्हणजे हौसेच्या वस्तू पर्सेस, पावडरचे डबे, बेडशीट्स, तोरणे हेही सगळं मिळत राहतं.

माझ्या या दुकानात धान्य बँकही आहे, काही भुकेल्या घरांसाठी! डाळ, तांदूळ, चहा, साखर, कडधान्येही लोक आणून देतात, बिस्किटांचे पुडे, कांदा लसूण मसाला, अगदी दूध पावडरही! दुष्काळी भागातले लोक येतात, त्यांना देवाच्या नैवेद्याला डाळ, गूळ, कणीक हवी असते, बाळंतिणीला दलिया, वरणभात हवा असतो. तो तिला इथेच मिळतो. मुख्य म्हणजे काही तरी द्यायचं हा भाव नाही. चांगल्या गुणवत्तेच्या, खाण्यासाठी योग्य वस्तू या लोकांकडून मिळत जातात. या सगळ्याचा उपयोग आजूबाजूच्या लोकांमध्येही होतो.  केवढे माझे भाग्य. गंभीर शस्त्रक्रियाही डॉक्टर मोफत करतात. उपचार करतात. त्यांच्या औषधांचे पैसेही मिळत राहतात.

आता तर मला फार करावं लागतच नाही. लोकांनी आपणहून गट तयार केले आहेत. तरुण मुले आहेत, आय.टी. इंजिनीअर्स आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, गरिबांना मदत करणारे गरीबही आहेतच. असे मानवतेचे दुकान. मला मिळालाय आनंदाचा ठेवा. मोक्ष कशाला? मी पुनर्जन्म मागते आहे.. मला आणखी आनंद हवा आहे! तुम्हीही त्यात सहभागी व्हाल?