रेणू दांडेकर renudandekar@gmail.com

कौसानी : जि. अल्मोडा, उत्तराखंड येथील लक्ष्मी आश्रम. सरलादेवी म्हणजे कॅथरिन मेरी हॅलीमन यांनी स्थापन केलेला. १९४६ ला स्थापन झालेला आश्रम २०१८ लाही सुरू असणे, त्याच विचारसरणीने सुरू असणे, वेगळ्या उपक्रमातून जिवंत असणे याला वेगळा अर्थ आहे. त्याविषयी..

upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

शिक्षण म्हटले की काही नावे अपरिहार्यपणे येतातच. रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विवेकानंद, जे. कृष्णमूर्ती आणि आपल्याकडचे मग लोकमान्य टिळक, आंबेडकर इत्यादी बरेच. विचारांना एक वेगळी बैठक यांच्या तत्त्वज्ञानामुळे मिळतेच. यांना वाचून वा यांच्या सहवासातून शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या काही व्यक्ती उभ्या राहिल्या. कदाचित त्यांची ख्याती – विचार सर्वदूर पोहोचले नाहीत. त्या काळातली व्यक्ती, पण ते काम तेवढय़ाच उमेदीनं सुरू असणारी आजची एक रचनात्मक संस्था म्हणजे कौसानीचा लक्ष्मी आश्रम.

कौसानी हे उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्य़ातील नयनरम्य गाव. या गावाला महत्त्व आहे ते अशासाठी की महात्मा गांधींनी ‘अनासक्ती योग’ इथे लिहिला. या जागी उभे राहिले की समोर हिमालयाच्या रांगांचे दर्शन होते. आता पर्यटन केंद्र म्हणूनही हे गाव माहितीचे आहेच. आता येऊ या लक्ष्मी आश्रमात. कोणी स्थापन केला? सरलादेवी यांनी. कोण या सरलादेवी? नाव ऐकल्यावर वाटते कुणी भारतीय स्त्री असणार, कदाचित त्याच परिसरातली. असे नाहीये. सरलादेवी म्हणजे कॅथरिन मेरी हॅलीमन. त्यांनी लक्ष्मी आश्रम का आणि कसा स्थापन केला हे समजून घ्यावेच लागेल. अधिक जाणून घ्यायचे असेल ‘व्यावहारिक वेदांत एक आत्मकथा’ असे त्यांचे पुस्तक वाचावेच लागेल. गांधीजींबरोबर बराच काळ असलेली ही स्त्री! संपूर्ण भारत पाहिला, अनेक चळवळींत सहभागी झाल्या. मूळच्या परदेशी. लहान असताना आईच्या एका कृतीचा संस्कार नि नंतर गांधी विचारांचा संस्कार. हे सारे प्रत्यक्ष कृतीत आले लक्ष्मी आश्रमाच्या रूपात. एका पॅकिंगबरोबर आलेली सुतळ पुन्हा उपयोगासाठी आईने गुंडाळून ठेवली. तेव्हा बालवय पण संस्कार कायम राहिला. तरुणपणी संकटे आली, त्याच वेळी गांधी विचारांशी ओळख झाली. ही ओळख खोलवर गेली नि आपला देश सोडून त्या भारतात आल्या. भारतातच राहिल्या आणि शेवटही लक्ष्मी आश्रमात झाला. गांधींबरोबर चर्चा करताना त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल चर्चा केली. चर्चा खूप झाली. शेवट असा झाला की, यांच्यासाठी मला काम करायचेय, त्यांच्यात आत्मविश्वास नि स्वत:चे अस्तित्वभान येईल अशी शिकण्याची रचना करायचीय. गांधीजी म्हणाले, ‘‘बघा विचार करा. जमेल का? प्रत्यक्षात येईल?’’ कॅथरिनना नवल वाटले. त्या खेदाने म्हणाल्या, ‘‘तुम्ही असा अविश्वास दाखवताय? शंका घेताय?’’ कॅथरिन यांनी हे आव्हान स्वीकारले. १९४६ मध्ये या आश्रमाची स्थापना तिथेच झाली जिथे ‘अनासक्ती योग’ घडला. कॅथरिन यांच्या सरलादेवी झाल्या. आज ७० वर्षे होऊन गेली तरी लक्ष्मी आश्रम तसाच, त्याच पद्धतीने सुरू आहे, जिथे गेल्यावर आपण आजच्या काळाचे सगळे संदर्भ विसरतो.

काय आहे वेगळेपण? कशा शिकतात मुली? कशा घडल्यात वेगळ्या? खरेच आत्मविश्वास नि अस्तित्वभान आलेय मुलींच्यात? या सगळ्यांचे उत्तर ‘हो’कारात्मक आहे. मात्र तेव्हा यासाठी एका परदेशी स्त्रीने भारतीय स्त्री-जीवनाचा अभ्यास करून शिक्षणाची रचना केली. स्वावलंबन म्हणजे केवळ स्वत:चे काम स्वत: करणे नाही, तर स्वत:चे जीवन आत्म्निर्भर बनवणे आणि त्यासाठी मुलींनी काय शिकायचे हे या स्त्रीने ठरवले, ब्रिटिश शिक्षणाचा विचार भारतात पसरत चाललेला असताना भारतीय स्त्रीचा भारतीय पद्धतीने विचार करून त्यांची मांडणी सरलादेवींनी लक्ष्मी आश्रमाच्या रूपाने केली, जिथून बाहेर पडलेल्या स्त्रियांवर आज संशोधन केले जातेय.

हे थोडसे विस्ताराने अशासाठी की हा शिक्षणातील – मुलींच्या शिक्षणातील नवा आयडॉल माहीत व्हावा. दुर्दैव असे की, या स्त्रीला भारतीयत्व मिळण्यासही इतका त्रास झाला की ती शेवटी म्हणाली, ‘‘इथेच तर जन्म गेलाय. कागदोपत्री भारतीयत्व मिळाले नाही म्हणून काय झाले!’’ लक्ष्मी आश्रमाचे आजचे रूप आपण बघणारच आहोत, पण हा आकार कसा येत गेला हेही पाहिले तर मुलींच्या संदर्भात वेगळा विचार करता येईल. शिक्षणाने स्त्रीजीवनात किती बदल झालाय? तिच्या धारणा कितपत बदलल्यात? याचे उत्तर आकडेवारीत काहीही असले तरी एवढेच म्हणावे लागेल, सुरुवात झालीय इतकेच. ही सुरुवात तेव्हा लक्ष्मी आश्रमात झाली. स्त्रीची ताकद सरलादेवी पाहत होत्या आणि ती कशी जगतेय हेही पाहत होत्या. आणि म्हणून त्यांच्या एकूण रचनेत स्वावलंबनाला बळकटी आणणारे कौशल्य शिक्षण सुरू झाले. सरलादेवींना विनोबा भावे यांचाही सहवास लाभला. ‘दान’ ही संकल्पना तेव्हापासून आजपर्यंत लक्ष्मी आश्रमात प्रत्यक्षात आहे. या आश्रमाचा विचार-वेगळेपण आपण अशासाठी समजून घेणार आहोत की, निवासी शाळा-निवासी शाळांची शिक्षण रचना हाही प्रचलित शिक्षण प्रणालीतील घटक आहे. ‘मुलांना कामे सांगू नयेत. ती गुलाम नाहीत,’ असा विचार एका बाजूला. ‘मुलांनी कामे करणे, स्वत: अनेक कामे करणे हा संस्कार आहे, श्रमदान हे मूल्य रुजवण्याचे माध्यम आहे,’ असा विचार एका बाजूला. मुलांना राबवून घेतले जाते, नको तितके काम करवून घेतले जाते. फुकटचे खाता येते! काम नको करायला!’ असेही चित्र दिसते. मुलांनी काम केले तर त्यांच्यामध्ये असलेली ऊर्जा योग्य दिशेने प्रकट होते, शिवाय अनेक गोष्टी शिकता येतात. मुलांना कामच सांगितले नाही तर मुले नंतरही कोणतेच काम करेनाशी होतात. किंवा तीही कुणाकडून तरी काम करून घेऊ लागतात. नोकरशाही भक्कम होते’. हा विचार एका बाजूला. खरे म्हणजे मुलांनी काम करणे, आपल्या कामाबरोबर इतरांना मदत करणे, सहकार्यातून काही कामे करणे अशा एका वेगळ्या दृष्टीने ‘श्रमदाना’कडे समतोल राखून कसा आश्रम चालतो याचे देखणे उदाहरण म्हणजे लक्ष्मी आश्रम. हाताला काम. विचारांना काम. मनाला काम ही गोष्ट या निवासी मुलींच्यात जाणवली. हाच विचार स्वावलंबन म्हणून श्रमदान म्हणून, स्वयंसेवा म्हणून वेगळ्या दृष्टीने सरलादेवींनी लक्ष्मी आश्रमाची तेव्हा जी स्थापना केली ती ७० वर्षे जिवंत आहे. आज तिथे डेव्हिड मामा आणि त्यांच्या पत्नी हंसा दीदी, इतर जण कार्यरत आहेत. समस्या आहेत पण ते विचार अजून तसेच कार्यरत ठेवण्याची धडपड आहे. आत्मनिर्भरता आणि आत्मविश्वास, आश्रमातल्या निवासाबद्दल जिव्हाळा – स्मरण – कृतज्ञता आजही मुलींमध्ये जाणवते (जी आजकाल दिसत नाही).

‘अनासक्ती योग’ जिथे लिहिला त्या वास्तूपर्यंत गाडी जाते. लक्ष्मी – आश्रमाची पाऊलवाट तीच आहे. खूप चढून जावे लागते. अगदी दमछाक होते. मी जेव्हा गेले तिथे तेव्हा घाबरलेच. आपण रस्ता तर नाही ना चुकलो? पण विचारत जाताना – चढण चढताना प्रत्येकाला आश्रम माहीत होता. प्रत्येक जण सांगत होता आपण जा तिथे. चिंता करू नका. मुली दिसतील काम करताना.’ लोकांचा आदर हाही महत्त्वाचा. ‘प्रणाम! लक्ष्मी आश्रम में आपका स्वागत है।’ अशा पाटीपुढेही चिंचोळ्या रस्त्याने चालत जावे लागले. आश्रमात पोचले. सुंदर, पण जुनी इमारत. लाकडी. बसायला छान बैठका. साधेपणा पण स्वच्छता, नीटनेटकेपणा, प्रसन्नता, मुलींचा उत्साह. वेगळे वाटले (आपल्याकडचे आश्रम डोळ्यापुढे आले. तिथली मुले, त्यांच्या वस्तू, त्यांचे सैरभैरपण. काहीच इथे नव्हते). इथे डेव्हिड मामा आहेत १९७२ पासून. त्यांनी १८-१९ वर्षांच्या एका मुलीला माझ्यासोबत दिले आणि आश्रम पाहून झाल्यावर पुन्हा इथे या, आपण बोलू,’ असे म्हणाले.

उंच टोकावर कविता मला घेऊन गेली. कामे उरकेपर्यंत ऊन येते. तिथे सगळ्या मुली इथे अभ्यासाला बसतात. हिमालयाच्या उंच रांगा पाहत मुली लिहायला, वाचायला शिकतात. कविता म्हणाली, ‘सरलादेवी, ग्रेट.’ आम्ही समाधीपाशी पोचलो नि तिला समजलेल्या सरलादेवी तिने मला सांगितल्या. संस्थापकाबद्दल माहिती, आदर हाही विशेष म्हणायला हवा, पहिली ते बारावीपर्यंतच्या आज ६५ मुली इथे आहेत. सरकारी मदत नाही. ३०-३५ वर्षे इथेच राहणारे कार्यकर्ते (न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने, या भूमिकेतून). कुणी प्रशिक्षित शिक्षक नाही. पण मोठय़ा मुली लहान वर्गाना शिकवायच्या. सध्या आरटीईमुळे पहिली ते आठवीच्या मुली एवढा डोंगर चढून खाली सरकारी शाळेत येतात नि तिथल्या मुलांना त्यांच्याजवळील असलेली मूल्ये शिक्षणातून देतात (हे गप्पातून जाणवले). दुपारी १ वाजता परत आश्रमात येतात. मग सुरुवात होते इथल्या दिनचर्येची. सामानसुमान मुली खालून वर आणतात. आश्रमातली सर्व कामे मुली करतात.  त्यांच्या पालकांचे त्यावर कोणतेही म्हणणे नाही. उलट म्हणून अनेक पालकांनी मुली इथे ठेवल्या आहेत. एक पालक म्हणाले, ‘‘इथून मुलगी बाहेर पडते तेव्हा लक्षात येते ती दोन घरांची जपणूक करेल. घरपण सांभाळेल. बाहेर सन्मानाने वावरेल आणि बोलेल.’’ फुकट आहे म्हणून आश्रम नाही तर संस्कार म्हणून आश्रमाकडे पाहिले जाते.

प्रत्येक खोलीत सहा-सात मुली. त्यांच्या कपडे, पुस्तके, वस्तूंच्या रॅक्स. पहाटे ४ वाजता उठून ४ ते ६ अभ्यास. मग दोन तास शेती काम, प्रत्येकाला शेतीकाम बंधनकारक आहे. शेतीपासून लांब जाणाऱ्या समाजमनाला ही वेगळी शिकवण होती. मुलीही आनंदाने शेतीची कामे करतात. पाचवीतली मुलगी म्हणाली ‘मातीत खेळायला मजा येते.’ आश्रमाला लागणारा भाजीपाला, फळे या शेतीत पिकतो. माती चांगली. थोडे धान्यही होते. मुलींसाठी स्वच्छतेचा वेगळा पाठ आहे. शारीरिक स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे मुलींचे केस नीटनेटके, स्वच्छ आणि तजेलदार वाटले. कारण मुली आठवडय़ातून तीन वेळा न्हातात. मुलीच स्वयंपाक करतात, वाढतात, मुठ्ठीभर धान्य दान करतात. तुळशीचा चहा असतो प्यायला. तुळशीची विशेष लागवड आहे नि मुली तुळस आणून वाळवतात जी विक्रीसाठी ठेवली आहे. पिठाची गिरणी तिथेच आहे. मुलींना शिवणकाम असे शिकवले जाते की, आश्रमातल्या मुलींचे कपडे मुलीच शिवतात. हे कापड खादीचे असते. चरखा चालवला जातो. विशेष म्हणजे दर वर्षी युनिफॉर्म बदलतो. मला सर्व दाखवणारी आणि जे केले जाते तो विचार सांगणारी कविता इयत्ता दुसरीपासून आहे. मुक्त विद्यापीठातून मुली इतर परीक्षा देतात. मुली आपापला अभ्यास करतात. कुणीच हातात दंडुका घेऊन दडपून टाकणारे दिसले नाही. दुपारी सर्वधर्मीय प्रार्थना असते. इथे अनेक दीदी भेटल्या ज्या इथेच लहानाच्या मोठय़ा झाल्या आहेत. मोठय़ा मुली लहान मुलींशी विचारसरणीबद्दल सोप्या भाषेत बोलतात.

१९४६ ला स्थापन झालेला आश्रम २०१८ लाही सुरू असणे, त्याच विचारसरणीने सुरू असणे, वेगळ्या उपक्रमांतून जिवंत असणे याला वेगळा अर्थ आहे. आजही बाजारूपणापासून दूर दूर असणाऱ्या या आश्रमाची नीतिमूल्ये समजून आपण प्रत्यक्षात कशी आणू याचा विचार ‘आश्रमांनी’ करायला हवा. कारण तिथे ज्यांना विकासाची संधी मिळाली नाही असे बालविश्व आहे. तिथले चित्र असमाधानकारक आहे. तिथले शिक्षक भेटले. दीदी-भय्या. त्यांचे वर्तन खूप वेगळे नक्कीच होते. मुलींशी बोलताना जाणवले. आश्रमाची भूमिका, तत्त्वे, विचार इथल्या प्रत्येकाला केवळ माहीत नाही तर रक्तात आहेत. याचे श्रेय सरलादेवींनी ज्या पद्धतीने आश्रमाची बांधणी केली त्यात असणार. ‘‘फुकट देतायत काही उपकार नाही करत!’’ ‘‘जाऊ दे वाया! पैसे थोडेच पडतात!’’ अशा विचारातून मोडतोड, अन्नाचा दर्जा हे प्रश्नच इथे नाहीत. ‘इथून मुली जात नाहीत नि बाहेर पडलेल्या मुली इथे आल्याशिवाय राहत नाहीत,’ हे मुलींनीच सांगितले. इथे राहणारे (लंडनचे आहेत हे फक्त रंग-डोळ्यावरून कळते) डेव्हिड मामा, ८४ वर्षांच्या राधा बहन, ७३ वर्षांच्या एक  भगिनी या इथे मनापासून बांधल्या गेल्या आहेत.

१९७० पर्यंत या लक्ष्मी आश्रमाने, ‘कस्तुरबा महिला पुनरुथ्थान मंडळा’ने देशात रचनात्मक आणि परिवर्तनवादी कार्यकर्ते तयार केले. तोपर्यंत शिक्षणरचना आश्रमाची होती. अभ्यासक्रम आश्रमाचा होता. आजही अनेक प्रकाशने आश्रमाची आहेत. गोशाला, स्वयंपाक, स्वच्छता, शेती, सुतकताई, शिलाई, स्वयंपाक, स्वच्छता, लघुउद्योग याकडे विषय म्हणून तेव्हाही आणि आजही पाहिले जात नाही. तर याच प्रदीर्घ विचारांची बैठक मुलींच्या दैनंदिन जीवनात आहे. इथल्या मुली वेगळ्याच आहेत. औपचारिक शिक्षणासाठी कमी वेळ दिला जातो.

१९९४ पासून ‘साधना’ नावाचा उपक्रम सुरू आहे. गांधीविचार आजच्या काळाच्या संदर्भात तरुण पिढीला समजावा म्हणून आठ महिन्यांचा कोर्स चालवला जाते. १८ ते ३५ वयोगटातल्या मुलींना हा कोर्स करता येतो. हा कोर्स करणाऱ्या मुलींना भेटले, अभ्यासक्रम पाहिला. विचार रुजवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता जाणवली. कोणी म्हणेल हे कशाला हवे? वाचून समजून घ्यावा.’ याची रचना आणि उपाययोजना अशी आहे की मुलीमधली सकारात्मकता, जिद्द, बाह्य़रूपाच्या सजावटीत फारसा वेळ न देणे, सामाजिक जबाबदारी वेगळा आकार घेतीय. हे फक्त गांधी विचारापुरते नाही. तो ओलांडून रोजच्या आजच्या जगण्यासाठी आहे.

इथे ८ ते ८४ वयोगटातले एकत्र राहतात. एकत्र प्रार्थना म्हणतात, खेळतात, स्वयंपाक करतात, जेवतात. जेवणाचे ताट चवीसाठी कसे जाईल? तक्रारी कशा राहतील? मेट्रनचे वेगळे जेवण कसे होईल, यावर विचार करतात. कविता म्हणाली, ‘मुली दर आठवडय़ाला एकदा फलक बदलतात.’ भोजन कक्षात एक वाडगा ठेवला होता. मूठभर धान्य टाकून मंत्र म्हणून मुली जेवायला बसतात. सर्वात सर्वाचा सहभाग. कविता स्वत:बद्दल म्हणाली, ‘‘इतरत्र मुली पुस्तक वाचायला शिकतात. आम्ही जगायला शिकतो.’’ अनुदान, हिशेब, जाती या पलीकडे जाणारा हा आश्रम पाहताना वाटले विचारात केवढी ताकद असते. या मुली विचाराला बळकटी आणतायत.

या आश्रमातल्या अनेक मुली शिक्षण, व्यसनमुक्ती, बालविकास, पर्यावरण संरक्षण, स्त्री-जागृती अशा क्षेत्रात वेगळी दृष्टी होऊन काम करतायत. त्यावर संशोधन तिथल्याच एक कार्यकर्त्यां करत आहेत. आपल्या आश्रमांच्या बाबतीत या पातळीवर काय करू या?

chaturang@expressindia.com