आत्मभान येणे गरजेचे

‘नात्यांची उकल’ सदरातील डॉ. ऊर्जतिा कुलकर्णी यांचा ‘आत्मभानावर बोलू काही!’ हा लेख (६ एप्रिल) म्हणजे सद्य परिस्थितीतील अनेक प्रश्नांची उत्तरे! परिस्थिती प्रसंग पाहून प्रतिक्रिया किंवा कृती करताना त्याचे अनेक घटकांवर तात्कालिक किंवा दूरगामी परिणाम होत असतात तेव्हा आत्मभान, सजगता जागृत ठेवून जगलो तर आपले व इतरांचे जगणे आनंदी होऊ शकते. अलीकडे तर सतत ताण, नातेसंबंधांतील दुरावे, ऑफिसमध्ये कामावरून होणारे वादविवाद, कौटुंबिक विश्वातील चिडचिड यामुळे तणाव वाढत आहेत. आत्मभान आले तर अनावश्यक ताण कमी होतो. अन्यथा जबाबदाऱ्या वाढून इतर व्यक्ती फायदा घेतात किंवा संताप वाढून गैरसमज होतात. पूर्वीचे साधेसोपे जगणे आता इतिहासजमा झाले आहे. आता तणाव स्पर्धा, गैरसोयी वर्चस्वाचे वाद आणि हेवेदावे यांना सामोरे जाऊनच पुढे जाणे भाग आहे. अर्थात हे अवघड असले तरी अशक्य नाही. कारण ‘चतुरंग’मधील वैचारिक मार्गदर्शन ‘लोकसत्ता’च्या वाचकांना सदैव उपलब्ध आहे. त्याबद्दल धन्यवाद!

अर्चना काळे, नाशिक

संवाद महत्त्वाचा

‘आव्हान पालकत्वाचे’ हे डॉक्टर राजन भोसले यांचे सदर मी नियमित वाचतो. पालकत्वाचे आव्हान किती कठीण आहे हे त्यावरून लक्षात येते. त्यातही मुलगी असेल तर हे आव्हान अधिकच खडतर असते. पालक म्हणून आपण मुला-मुलींवर किती लक्ष ठेवणार याच्याही काही मर्यादा आहेत. त्यात विस्तारत जाणारी विविध माध्यमे व त्यातून मिळणारे चुकीचे व विकृत लैंगिक ज्ञान. मला वाटते यावर सर्वंकष मार्ग जरी नसला तरी ‘संवाद’ हा खूप मोठा मार्ग आहे. त्यातही लैंगिक विषयावर न संकोचता, मुलगा असो वा मुलगी, संवाद साधल्यास बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील असे वाटते. मुलांनाही जर लक्षात आले, की घरातच आपल्याशी या विषयावर मोकळेपणाने संवाद होतो आहे, तर तीही बोलू लागतील. आतल्या आत कुढत बसणार नाहीत. लेखात दिल्याप्रमाणे कोणी विकृत चाळे करीत असेल तर त्यावरही मुलांशी संवाद साधल्यास, मुले आपले मन मोकळे करतील. एखाद्या चित्रफितीतूनही मुलांना याविषयी शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटते. शेवटी आपला मुलगा वा मुलगी, आपल्या अपरोक्ष सुरक्षित असणे महत्त्वाचे. त्यासाठी ‘मी एवढय़ा लहान वयात मुलीशी कसे बोलू’ हा बाणा सोडणे महत्त्वाचे.

मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली