सुचिता प्रसाद घोरपडे suchitapatilhll@gmail.com हाल कदी कमी नव्हतंच सरूचं. त्यात तेच्या एका मेहरबानी नजरनं कूस उजवली. लगीन झाल्यास पयला डाव तिला उर फुटोपतूर खुशी झाली. आता तर माहेराचा उंभरा वलंडायला यील वाटलं, पर ही खुशीबी घटकतच इजली. ‘‘जगायेगळं पोर व्हत नाय तुला. गपगुमान पोर हुईपतूर समदं कराया पायजे,’’ असा हुकूम ऐकून तिचं हात पाय गळलंच. कवतिकानं सरूला न्याया आलेल्या आई-बा संगबी नाय धाढलं तिला.. दिसातल्या सरूला सोडून एक दिस तिचा दाल्ला तालुक्याला श्याताच्या कामासाठनं गेला.आज काय सरूचं चित्त थाऱ्याला नव्हतं. मन हावरं-बावरं झालं व्हतं. सरूला उचमळून याया लागलं. एवढय़ातनबी तेनं तिला जाताना भांगलनीचं काम दिलं व्हतं. आज तिचा दाल्ला नाय म्हणल्यावर गुणाबाई दोन डाव ईचारूनबी गेली व्हती.. ‘कथा दालन’ हे कथालेखिकांसाठीचं सदर दर पंधरवडय़ाने.. ‘‘सरू.. अगं ये सरू. लेकी घरात हाईस का?’’ गुणाबाईची साद जशी ऐकली, तशी सरू एका हातानं पोट सांभाळत, दुसऱ्या हाताचा भित्तीला रेटा देत उठाया लागली. सरूला नव्वा लागल्याला. तसं आता सरूला भुईला उभं रानं बी व्हीना. ‘‘गुणाबाई, घरातच हाई की. घराभाहीर पडायची आमाला कुठली मुभा.’’ सरू उठत म्हणाली. ‘‘अगं.. अगं.. कशाला उठालीयास? भांगलायला आल्तो गं. परवा जीभंला काय ग्वाड लागना म्हणालीस म्हणताना तुझ्यासाठनं चार धपाटं आणल्यालं. धर, खा.. खा लेकी! गरम गरम हाय तवर. त्यो तुझा मुर्दाड दाल्ला याच्या अदुगर खा.’’ सरू अंगकाठीनं एकदम छलकाठी. पाप्याचं पितारच. पर दिसाया देखणी. गोरटय़ाली. नकटंच खरं, गोल तोंडाला शोभणारं नाक, पाणीदार मासळीगत डोळ्यानं तर चार जणात उठून दिसायची सरू. शहरगावातील शिकलेली, मस्त स्थळं सरूला सांगून आलती. बापानं तिकडंच कुठंतरी उजवून टाकायचं ठरवलं बी,पण सरूच्या आईनं पाय आडवा घातला. म्हणाली, एकटी एक लेक डोळ्यामाघारी एवढी लांब पाठवण्यापरीस चार गाव सोडून दिली तर कदी बघूसं वाटलं तर बगता यील, म्हणताना सरूच्या बापानं पयलं आलं तेच स्थळ, एकलं एक पोर चांगलं हाय, शेतीबी हाय म्हणून सरूला उजवून टाकली. एकली एक पोर रानीवानी हिथं राहील, म्हणताना आई-बानं चांगलं झोकात लगीन लावून दिलं. पर हे बेनं मेल्या टाळूवरचंबी लोणी खाणारं निगालं. नव्याची नवलाई नवू दिसात सपती, हिथं लग्नाच्या रातीच सपली. सरूला एक नयी गोष्ट करायाबी धादा इचार कराया लागायचा. पोटाचं हाल तर कुत्रबी खाणार नाय असं. राबू-राबून हाडाच्या तुरकाटय़ा रायल्या व्हत्या. सरूचा जीव तुटत व्हता खरं, बोलणार कुणाला? सासू-सासरा, दीर-नंदा कुणीबी नाय. तशी भावकी मस्त मोठी व्हती खरं, काय फायदा? सरूच्या दाल्ल्याचा कायम सवता सुभा असायचा. हाल कदी कमी नव्हतंच सरूचं. त्यात तेच्या एका मेहरबानी नजरनं कूस उजवली. लगीन झाल्यास पयला डाव तिला उर फुटोपतूर खुशी झाली. आता तर माहेराचा उंभरा वलंडायला यील वाटलं, पर ही खुशीबी घटकतच इजली. ‘‘जगायेगळं पोर व्हत नाय तुला. गपगुमान पोर हुईपतूर समदं कराया पायजे,’’ असा हुकूम ऐकून तिचं हात पाय गळलंच. कवतिकानं सरूला न्याया आलेल्या आई-बा संगबी नाय धाढलं तिला. खरं म्हंजी अशा वक्ताला संग कोणतरी पायजेलच. शेजार पाजार आधाराला म्हणावं तर खाल मान पाताळ धुंडय़ानं डोंगरा लगतच्या श्यातातच खोपटं केलं व्हतं. बाकी समदी माणसं गावात रात व्हती. तरीबी एक गुणाबाई नावाची म्हातारी पलीकडचं श्यात करायची. ती हिची लेकीवानी काळजी घेत व्हती. सरूच्या नवऱ्याची नजर चुकवून तिला कायबाय खाऊ घालायची. आडी-नडीला धावून याची. गुणाबाई व्हती म्हणताना सरूला आभाळावानी आधार व्हता. दिसातल्या सरूला सोडून एक दिस तिचा दाल्ला तालुक्याला श्याताच्या कामासाठनं गेला. दिस बुडाला कडूस पडलं तरी तेचा परतायचा पत्त्या नव्हता. आज काय सरूचं चित्त थाऱ्याला नव्हतं. मन हावरं-बावरं झालं व्हतं. उठाया-बसाया नको, नुस्तं हाथरुनातच पडावं असं वाटाया लागल्यालं. सरूला उचमळून याया लागलं. एवढय़ातनबी तेनं तिला जाताना भांगलनीचं काम दिलं व्हतं. आज तिचा दाल्ला नाय म्हणल्यावर गुणाबाई दोन डाव ईचारूनबी गेली व्हती. ‘‘पोरी.. त्यो काय यील वाटना की. माझा तर काय पाय निगना बग. येतीस काय लेकी माझ्या घरला. तू अशी दिसातली, कुठं एकटी या आडरानात राहतीस.’’ गुणाबाईच्या जाणकार नजरंनं सरूचं चित्त हेरलं व्हतं. या चार दिसात सरू मोकळी व्हील अशी खात्री व्हती. ऐन वक्ताला जरी कळा सुटल्या तर घाबरू नगंस. मोठा श्वास घे. बिनघोरी हो. या मरणाच्या कामानं तुझी कंबर सल पडली हाय लेकी, जादा तरास देणार नाय पोर. तू मातूर धीर सोडू नगंस. एक दोन दिस जरा सावकाश काम कर, असा इशारा देत गुणाबाई पोटावरनं हात फिरवून, आलाबला घ्यून आपला घरला परतली. गुणाबाईला ‘बरं’ म्हणून रोजच्यावानी सरू समदी कामं कराया लागली. गुणाबाई जाऊनश्यान तासबी झाला नाय तवर सरूला कसंनुसं व्हाया लागलं. देवाम्होरं दिवा लावला तरी जीवाची कालवा-कालव काय थांबंना. सरूला धड बसू वाटंना, का झोपू वाटंना. चार घास खाऊन जरा लवंडायला यील म्हणलं तर कायसुदिक खायची इच्छा व्हीना. पाणी तर प्यून निजूया, असा मनात इचार आला. पर कोपऱ्यातल्या हंडय़ापतूर जायचंबी जीवावर आलं. ती तशीच पाणी प्याया उठाया गेली, तर उभं रायला व्हीना. तवा गुडघ्यात वाकून उभी रायली तसं तिला इरागतीची भावना झाल्यासारखं झालं. काळवंडलं व्हतं, तरीबी तशीच तांब्या उचलून पायाकडं बगत, ढेकळं तुडवत सरू वडय़ाकडलाबी जावूनश्यान आली. कोपऱ्यातच दुपटं हाथरलं अन् जरा कंबर टेकली. सरूला आई आल्याचं सपान दिसू लागलं. खरं म्हंजी आता ह्य वक्ताला आई जवळ पायजे, असं सारकं सारकं सरूला वाटत व्हतं. तिचं डोळं भरून आलं. आईसाठनं काळीज लई वड घेत व्हतं. पर तेवडं तिचं नशीब कुठलं. जीवाची निस्ती उलघाल चाल्याली. द्वाड मनालाबी आवर घालाया जमना. कानात वारं शिरल्यागत ते हिकडं तिकडं उडय़ा माराया लागल्यालं. आता पायातनबी मिंग्याचं रिवाण उठल्यावानी झालं. डोस्कं भिरमिटल्यागत हून, आतातर सरूचं त्वांडबी सुकत चालल्यालं. बसून बसून पाय ताठरल्यावानी झालं म्हणताना कुडाचा आधार घेत सरू उठली. तिच्या डोळ्याम्होरं अंधारी येत व्हती. तरीबी भिताडाला धरत धरत खोपटाभाहीर आली. भाहीर जाऊनश्यान या अडनडय़ा वक्ताला कोण नशीबानं दिसलंच तर गुणाबाईला निरोप धाडता यील म्हणून ती वाट बगीत व्हती. खरं सांज हून कडूसं पडलं तवाच समदी आपल्या आपल्या घरला पांगली व्हती. आता मातूर सरू हळवी झाली. ‘‘कुणी हाय का?’’ सरूनं आरोळीबी ठोकली. तिची साद वाऱ्यासंग इरून गेली. आता सरूला गुणाबाईची लई आठवण येत व्हती. कुणाकडनं निरोप धाडायचा? दाल्ला अंधार पडाया आला तरी अजून परतला नव्हता. दिसात बायको हाय. तवा तेनं काय पायजे-नको ते बगावं, पिरमानं चार शबुद बोलावं, असं सरूला चार-चौघीवानी वाटायचं. त्यात चूक काय व्हती? असला दाल्ला तिच्या नशिबात व्हता, तवा ती बापडी तरी काय करणार. तेच्या म्होरं कायबी चालायचं नाय. मूग गिळून निस्तं गप बसाया लागायचं. वाट बगून बगून सरू आत आली. येळ जात व्हती तसं आता सरूला मांडीतनं कळा सुटल्या व्हत्या. ह्य वक्ताला कोण तरी जवळ पायजे व्हतं. हाता पायात पेटकं येत व्हतं. अंगात ताकद नको? तोळा मासाचा जीव सरूचा. त्यात अजून एक जीव उदरात. वाळवटात एकादा जीव पाण्याच्या आसंवर जगावा, तसा त्यो कोवळा जीव सरूच्या उदरात वाढत व्हता. भिरभिरत्या नजरनं हिकडं तिकडं बगत ती भिताडाला धरून परत खोपटात गेली. आता तर रावून रावून कळा यायला लागल्या व्हत्या. सरूला कळा सोसवना झालत्या. पोटाला धरूनश्यान एका कोपऱ्यात सरू पडली व्हती. तिच्या डोळ्याम्होरं यम म्हशीवर बसून वाटच बगालाय, असं वाटू लागल्यालं. आता काय आपलं खरं नाय म्हणत सरू हाय खावू लागली. जीव तोंडाशी आला व्हता. तश्यात एक जोरदार कळ पाठीमागनं आली, तशी बसकन् भितीला टेकून सरू देवाचा धावा कराया लागली. आता खालनं वलीची धार लागली व्हती. तशी सरू घामाघूम झाली. तरी गुणाबाईनं बोलता बोलता समदं सांगूनश्यान सरूला शानं केलं व्हतं. पर अजाण कवळी पोर. एकटी कशी करल? देवाला दयाबी येवू नये अशा वक्ताला? आता अंगाकडनं तांबडंबी जाया सुरवात झाली व्हती. उभं राहूनश्यान चालायचं तरान काय अंगात नव्हतंच, तशीच सरकत सरकत सरू चुलीजवळ आली. बाजूची खोडवी चुलीत सारून चुलीला जाळ घातला. अन् भुगूनं भरून पानी गरम कराया ठेवलं. अंगात बळ तर नव्हतंच. म्हणत्यात नव्हं, पोरासाठनं आईच्या अंगात धा हत्तीचं बळ येतया. सरूनं सावकाश भुगूनं उचललं अन् खाली उतरून ठेवलं. आडय़ाला चार पाच फडकी लोंबत व्हती, ती लोंबतेली फडकी बसल्या जागेसनं हातानंच तिनं वडली. अन् जवळ ठेवून घेतली. आता मातूर सरूला कळा सोसवना झाल्या. जीवघेण्या कळा एकामागनं एक यायला लागल्या तशी तोंडावर हात घेत सरू बोंबलू लागली. वरडू लागली. देवाचा धावा कराया लागली. आता सरूच्या कमरं खालनं धारा लागल्या. जरा दम धरला तवर एकदमच सरूचा श्वास अडकल्यावानी व्हाया लागला. मोठमोठानं श्वास घ्याया बघितलं तरी दम लागाया लागला. सरू धापा टाकाया लागली. उर फुटतोय का, असं वाटू लागलं. अशा वक्ताला सरूला गुणाबाईचं शबूद आठवलं. ‘पाठोळी बाहीर येताना दम खायचा नाय पोरी. नायतर पोर पोटातच गुदमरतया. तवा मोठा श्वास घे. धीर सोडू नगंस.’ सरूनं धीर धरत मोठा श्वास घेतला. अन् सरू कळा द्याया लागली. आता परत दम सुटत चाल्याला, त्योच सरूनं जोराची किकाळी फोडली. ‘‘ये आय..’’ त्या जोराच्या कळीसरशी पाठोळी बाहीर आली. बाहीर आल्या आल्याच पाठोळी फुटली अन् फसकन् पाठीमागनं मासाचा गोळा वारासकट बाहीर आला. वार पडली. घामानं चिब सरूच्या डोळ्यात कवळ्या जीवाला बगून प्राण आलं. हात पाय गळूनबी देवानं कुटनं एवढं उसनं अवसान दिलं काय ठावं. पर अंगात देवी आल्यासारखं समदं भासत व्हतं. तिनं सोताच नाळ तोडली. पोराला पुसून फडक्यात गुंडाळलं. समदी घाण पुसून काढली. एवढय़ाच्यानं रायलेला जीव एकवटत सरू एका कडला पोराला घेवूनश्यान पडली. सरूचा दुसरा जनमच झाला व्हता. पोरासाठनं उसनं अवसान आज तिनं गोळा केलं व्हतं. हिकडं गुणाबाईचा जीवबी वारंहुरं व्हाया लागल्याला. कालवाकालवं व्हत व्हती. तिचं चित थाऱ्यावर काय राहिना, मन सरूकडं वढ घ्याया लागलं. रातीचा पहर लोटला व्हता. आता या वक्ताला कसं जायचं, असा सवाल तिच्या मनात पिंगा घालू लागला. ती तशीच भाहीर जोत्यावर बसून रायली. काय वाटलं काय माहीत? एक डाव बगूनश्यान तर यावं म्हणत गुणाबाई उठली. जरा येळानं तिथनं भाहीर पडली ते तिनं थेट सरूचं खोपटं गाठलं. तिथला समदा हालहवाला बगून गुणाबाईच्या तोंडातनं शबूदच निगना. तिनं तिथंच देवाला सपशेल लोटांगण घातलं. काय सुचलं काय ठावं पर येताना तिनं उनउनीत मऊशार भात तुपात कालवून घेतला व्हता. त्यो डबा काढत गुणाबाईनं हळूच सरूला उठीवलं. सरूच्या तोंडावरनं कडाडा बोटं मोडली. अन् तिच्या लेकराला तिच्या वटय़ात ठेवलं, तान्या पोराला मायनं डोळं भरून पायलं सरूनं. पोराला उराला लावत थान तोंडात घातलं. अन् मग एक जगायेगळं समादान आत आत मुरत गेलं. डोळ्याकडनं धारा लागल्या, सरूच्या मुखावर तेज पसरलं व्हतं. जगायेगळं तेज. गुणाबाईनं आपल्या हातानं दोन घास सरूला भरवलं. ‘‘लई धाडसाची पोर बाय तू. एकटय़ानं कसं काय निभावलसं गं पोरी.’’ ‘‘एकटी कुटं व्हती मी गुणाबाई. त्यो वर बसलाय नव्हं. त्येला काळजी नाय व्हयं माझी.’’ असं म्हनताना समादानानं भरलेलं एक हसू सरूच्या मुखावर झळकलं. गुणाबाईनं पोराला परत साफ करत एका चांगल्या कापडात गुंडाळून निजवलं. सरूलाबी उनुनीत पाण्यानं पुसून काढलं. समदं आवरून बाळ-बाळतिनीसाठनं खोपटय़ात एका कडला उबदार हाथरून घातलं. अन् सरूच्या अंगावर वाकळ घालत, ‘मी हाय हिथंच. तू आता बिनघोरी आराम कर पोरी,’ असं म्हणत आपण सोताबी एका कोपऱ्यात पोतं टाकून जरा येळ लवंडली. त्या राती काय सरूचा दाल्ला आलाच नाय. गुणाबाई मातूर सरूच्या सोबतीला रायली. दुसऱ्या दिशी सरूचा दाल्ला कोंबडा बांग द्यायच्या अदुगरच हजर झाला. धाडकन् दार उगडून आत शिरला. त्येच्या आवाजानं सरू अन् गुणाबाई एकदम दचकल्याच. त्यो तर्राट आतच आला. तेनं पायलं तर सरू आपल्या तान्या पोराला पाजत व्हती. अन् गुणाबाईनं चुलीवर चाला आदन ठेवलं व्हतं. खरं एवढं समदं बगून सुंभाटय़ा दाल्ल्याच्या मुखावर एक रेग उमटल तर शपथ. डोईवरला पटका काढत तेनं तिथंच खुट्टीला अडकवला. त्या दोगीस्नी कायबी न बोलता कोपऱ्यातल्या घंगाळातनं तांब्याभर पाणी घेतलं. अन् खळाला चुळा भरत भाहीर उभा रायला. पोरीचं कोण करणार म्हणत गुणाबाई जरा धीट व्हत, सरूचा दाल्ला काय बोलला तर बोलूदे म्हणत रोज सरूचं अन् बाळाचं कराया येत रायली. आतापतूर वैशाखाच्या झळांनी करपून गेलेली सरू या चार दिसाच्या सुखानं उजळली व्हती. तिला आपल्या नशीबावर इस्वासच बसत नव्हता. दुखच पदराला बांधून सरूनं उंभरा वलांडला व्हता, अन् दुखानंबी पाठराखनीगत कदी तिची साथ सोडली नव्हती. आता दुखाखेरीज आपल्याला कुणाची सोबत नाय हे मनाशी पक्कं केल्यालं सरूनं. पर दुखाच्या मागनं सुक आलं. शिवूपालटीचा ख्योळ करणाऱ्या सुकालाबी परत दडून ऱ्हायची हुक्की आली. अन् एक आठवडा उलटला नाही तवरका सरूचा दाल्ला तणतणतच खोपटाकडं वळला. सरू तिच्या पोराला निजवून आपण सोताबी जरा आडवी व्हणार व्हती, त्योच तिचा दाल्ला आत येत कावदारला. ‘‘आता लई झाली ही सोंगं. जगात काय तू एकटी बाळतीन नाय झालीस. बास झालं नखरं आता. उठ पयलं, अन् चल खुरपनाला.’’ असं म्हणत तेनं हातातलं खुरपं तिच्या म्होरं फेकलं. सरूनं पोराकडं एक डाव पायलं. आयच्या पदराची उब घेऊनश्यान ते झोळीत निर्धास्त झोपल्यालं. मुकं कढ काढत सरूनं अजून एक लुगडं बोचक्यातनं भाहीर काढलं, अन् सावली बगून बांदावरल्या आंब्याच्या खायल्या फांदीला लुगडय़ाची झोळी बांधली. पोराला आणून त्यात निजवलं. सरू तशीच उठली. तिनं आभाळाकडं एक डाव पायलं. आभाळ भरून आलं व्हतं. सरूच्या डोळ्यातल्या डोहालाबी भरती आल्याली. सरूनं खाली वाकून बुट्टीतलं फडकं उचलत कानाला गुंडाळलं अन् भुईला पडलेलं खुरपं उचलत भांगलायला चालू केलं.