नीरजा

१९७५ हे ‘महिला वर्ष’ म्हणून घोषित झाल्यावर स्त्रीमुक्तीची चळवळ भारतात जोर धरायला लागली आणि बऱ्यापैकी रुजलीही होती. असं असताना गेल्या पन्नास वर्षांत बाईच्या जगण्याचा आणि तिच्या भूमिकांचा जो ‘फॉम्र्युला’ मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी तयार केला होता तो आजही विशेष का बदलला नाही? आजही ती बऱ्याच अंशी पतीवर आणि पुत्रावर का अवलंबून दिसते? आजही ती आर्थिकदृष्टय़ा फारशी सक्षम झालेली का दिसत नाही? त्या वेळी स्त्रियांसाठी तयार केलेली ही चौकट एवढी वर्ष उलटली तरी विशेष बदललेली नाही, अगदी स्त्रीमुक्तीची चळवळ उभी राहिल्यानंतरही. या दुर्दैवाचं काय करायचं? ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने..

मध्यंतरी जर्मनीमधील स्टुटगार्टला जाण्याचा योग आला. तिथली एक मुलगी आम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी बाहेर घेऊन गेली. नुकतंच लग्न झालेल्या या मुलीला माझ्यासोबत असलेल्या माझ्या मत्रिणीनं विचारलं, ‘‘नवऱ्यासाठी स्वयंपाक करून आलीस की नाही?’’ त्या मुलीचा चेहरा प्रश्नांकित झाला. तिला प्रश्न कळला असेलही, पण त्यामागचा अर्थ कळला नव्हता. कारण आपण जर बाहेर जेवायला आलो तर नवऱ्यासाठी स्वयंपाक करून यावं लागतं ही तिच्यासाठी दुसऱ्या कोणत्यातरी अपरिचित जगातली गोष्ट होती.

ही मुलगी आजच्या शतकातली आणि युरोपातली. माझी मत्रीण गेल्या शतकातल्या उत्तरार्धात जन्मलेली. उच्चशिक्षित असली तरीही भारतीय संस्कृतीत स्त्रियांना ज्या संस्कारात वाढवलेलं असतं त्या संस्कारात वाढलेली. पती, पतीचं कुटुंब, त्याचे नातेवाईक यांना आपल्या सौम्य, शांत स्वभावानं जिंकणं, त्यांची काळजी घेणं, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत त्यांच्या भोवती जमेल तसा पिंगा घालणं आणि रात्री सर्वाना समाधानी करून बिछान्यावर पाठ टेकवणं अशा शिकवणीतून तयार झालेली. त्यामुळे तिचा हा प्रश्न अत्यंत स्वाभाविक होता. आजही दोनतीन दिवसांसाठी काही कामासाठी बायका घराबाहेर जात असतील किंवा नोकरीची गरज म्हणून फिरतीवर असतील तर मग ‘‘तू नसताना घरी सगळं कोण करतं?’’ हा प्रश्न आपल्या देशात सर्वाच्याच मनात येतो आणि तो सहज विचारलाही जातो.

खरं तर असा प्रश्न आपल्याकडच्या बायकांना विचारण्याची गरजही नाही. कारण नोकरी करणारी असो वा न करणारी असो कोणत्याही कारणानं ती घराबाहेर पडली तर घरातली सगळी कामं आटोपूनच ती घराबाहेर पडणार असं गृहीत धरलेलं असतं. नोकरी करणाऱ्या स्त्रिया सकाळी लवकर निघायचं असेल तर पहाटे चारचा गजर लावून किंवा रात्री उशिरापर्यंत नोकरीच्या जागी थांबायचं असेल तर तशी तजवीज करून अथवा रात्री घरी परतून गृहिणी म्हणून असलेली आपली सगळी कर्तव्य पार पाडतातच. ज्या नोकरी करत नाहीत त्याही शक्यतो एकटय़ाच डिनरसाठी बाहेर गेल्या आहेत असं चित्र सहसा आपल्याकडे दिसत नाहीच. आणि गेल्या तरी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या विसरत नाहीत. कारण त्या विसरणं म्हणजे आपल्या संस्कृतीशीच प्रतारणा करणं असं त्या बायकांना आणि त्यांच्या घरच्यांनाही वाटत असतंच. त्यामुळेच सून अथवा बायको नोकरीनिमित्तानं अथवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्तानं बाहेर जात असेल तर ‘घरचं सगळं यथासांग करून जाते बरं का!’ असं अभिमानानं सांगितलं जातं. किंवा आपल्याकडची मुलंही लग्न ठरवतानाच मुलींना सांगतात, ‘लग्नानंतर करिअर करायचं तर खुशाल कर. पण घरचं सगळं सांभाळून बरका.’ आधुनिक विचारांची वगरे असली तरी आपल्या या समाजाची मानसिकता खोलवर रुजलेली ही मुलं या मुलींना अशी प्रेमळ ताकीद देतात आणि मुलीही हे प्रेमाचे बोल कानात साठवत ‘घर सांभाळून करिअर करायची आमच्या यांची काहीच हरकत नाही,’ असं कौतुकानं सांगतात.

मातृसत्ताक पद्धत जाऊन पुरुषसत्ताक पद्धत सुरू झाल्यापासून पुरुष या एका केंद्राभोवती युगानुयुगे फिरण्याची बाई नावाच्या पृथ्वीला सवय झाली आहे. आपल्याकडच्या जवळजवळ सगळ्या स्त्रिया या किचन नामक भट्टीमध्ये आपल्या अस्तित्वाचे लचके तोडून खरपूस भाजून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला हवे तेव्हा सव्‍‌र्ह करण्यात माहीर आहेतच. बाईचा हात घरावरून फिरला पाहिजे, बाई नसली तर घर खायला उठतं, घर विस्कटून जातं असं पुरुषांनी म्हटलं की आपल्याकडच्या बायका सुखावतात. आपल्याशिवाय आपला हा नवरा विस्कटूनच जाईल असं मनात आलं की त्यांचा जीव हुरळून जातो. पण त्यांना माहीत नसतं की बाईशिवाय तो इतका विस्कटून जातो की तिच्या मृत्यूनंतर विस्कटलेलं ते घर पुन्हा घडीदार लावण्यासाठी त्याला लगेच दुसऱ्या बाईची गरज लागते. असो.

सांगायचा मुद्दा हा की भारतात स्त्रीवादी चळवळ सुरू झाल्यानंतरही स्वयंपाक कोणी करायचा, किंवा घरकामाची जबाबदारी कोणाची असे प्रश्न आपल्याला पडताहेत. खरं तर पाश्चिमात्य देशात सुरू झालेली स्त्रीवादी चळवळ आपल्याकडे पोचण्याआधीच सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षण देऊन स्त्रियांचं आत्मभान जागवण्याचं काम सुरू केलं होतं. र. धों. कर्वे तर तिच्या लैंगिक प्रेरणांविषयी जाहीररीत्या त्यांच्या ‘समाजस्वास्थ्य’ या नियतकालिकतून बोलत होते. अनेक लेखक-लेखिका स्त्रीप्रश्नांना भिडत होते. १९७५ हे ‘महिला वर्ष’ म्हणून घोषित झाल्यावर स्त्रीमुक्तीची चळवळ भारतात जोर धरायला लागली आणि बऱ्यापैकी रुजलीही होती. असं असताना गेल्या पन्नास वर्षांत बाईच्या जगण्याचा आणि तिच्या भूमिकांचा जो ‘फॉम्र्युला’ मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी तयार केला होता तो आजही विशेष का बदलला नाही असा प्रश्न राहून राहून मनात येतो. आज एकविसाव्या शतकातही ती बऱ्याच अंशी पतीवर आणि पुत्रावर का अवलंबून दिसते? आजही ती आर्थिकदृष्टय़ा फारशी सक्षम झालेली का दिसत नाही? मुंबईसारख्या शहरातही दीडशे मुलांच्या वर्गात किती मुलांच्या आया नोकरी करतात असा प्रश्न विचारला की, दहावीस हात वर येतात. उरलेल्या ऐंशी टक्के मुलांच्या आया या गृहिणी असतात. गृहिणी असणं ही चुकीची गोष्ट नाही. तेही सन्मानाचं काम आहे. पण आर्थिकदृष्टय़ा सक्षमता या सत्तर-ऐंशी टक्के स्त्रियांमध्ये नाही त्याचं काय करायचं? नवऱ्याच्या पशांवर त्यांचा हक्क असतो असं मानलं तरी त्याची इच्छा असली तर त्या आपल्या गरजांवर खर्च करू शकतात हे कसं विसरायचं? स्त्रीला कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही. तिनं पिता, पती, पुत्र यांच्यावर अवलंबून राहावं आणि आपलं आयुष्य धार्मिक कृत्ये आचरिणे, स्वयंपाक करणे आणि एकंदरीत सर्व गृहकृत्यांची व्यवस्था ठेवणे या कामात स्वत:ला गुंतवावं असं मनुस्मृतीत सांगितलं होतं. त्या वेळी स्त्रियांसाठी तयार केलेली ही चौकट एवढी वर्ष उलटली तरी विशेष बदललेली नाही. अगदी स्त्रीमुक्तीची चळवळ उभी राहिल्यानंतरही. जसा पुरुषाच्या मर्दपणाचा आणि वर्चस्वाचा गंड त्याच्या ‘डीएनए’मध्ये रुजत गेला तसाच आपल्या दुय्यमत्वाचा स्वीकार बाईच्या ‘डीएनए’मध्येही खोलवर रुजला गेला. तो इतका रुजला गेला की आजही अनेक बायका स्त्रीमुक्ती, स्त्री-स्वातंत्र्य, स्त्रीवाद अशा शब्दांपासून कोसो मल दूर राहण्याचा प्रयत्न करतात. आजच्या सुशिक्षित स्त्रिया आणि त्यांची एकूण जीवनपद्धती समजून घेतली तर त्यांच्या या मानसिकतेचा उलगडा होतो.

मुंबईसारख्या शहरात आज रोजीरोटीसाठी महाराष्ट्रातील गावागावातून अनेक स्त्रिया त्यांच्या कुटुंबाबरोबर स्थलांतरीत झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतातील स्त्रियांच्या जगण्याचं प्रतिबिंब मुंबईतील लोकलमधील स्त्रियांच्या डब्यात पाहायला मिळतं. या स्त्रिया पाहिल्या आणि वाचल्या तर आजच्या त्यांच्या जगण्यातला विरोधाभास लक्षात येतो. नोकरी करणाऱ्या या स्त्रियांसाठी आजही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नवऱ्याच्या हातात पगार आणून देणे यापलीकडे पोचत नाही. सकाळी नोकरी किंवा कामधंद्यासाठी प्रवास करणाऱ्या अनेक बायका वेणीफणी करण्यापासून पोथी वाचण्यापर्यंतची सारी कामं ट्रेनमध्ये चढल्यावर आणि बसायला जागा मिळाली तर करतात. अनेकदा ही पोथी आपण का वाचतो या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. ती वाचल्यावर जे काही दुर्दैव आपल्या वाटय़ाला आलं आहे ते सरून आयुष्य सुखसमृद्धीनं भरून जाईल असा त्यांचा समज असतो. ही सुखसमृद्धी पुन्हा कोणाची तर आपला नवरा, कुटुंब यांची. त्यांचा आनंद तोच आमचा असं त्यातल्या बहुतांश बायकांना वाटत असतं. कारण आपला स्वत:चा एकटीचा असा काही आनंद, सुख, समृद्धी असू शकते हे अजूनही त्यांना जाणवलेलं नसतं आणि जाणवलेलं असलं तरी तो आपला अधिकार नाही अशीच त्यांची भावना असते. त्या त्यांचं सारं आयुष्य या व्यवस्थेतील प्रथम स्थानावर असलेल्या माणसांसाठी समíपत करायला तयार असतात. रेटत का होईना त्याच्याबरोबर राहतात. कधी बायकांच्या तथाकथित निर्बुद्धपणाविषयी आणि मूर्खपणाविषयी तर कधी त्यांच्या नवऱ्यावरच्या वर्चस्वाविषयी पुरुषांनी केलेले विनोद एकमेकींच्या ग्रुपवरून शेअर करून स्वत:लाच हसत असतात. नवरा आवडला नाही, त्यानं मारलं, अपमान केले, सतत हिणवलं तरी घटस्फोट घेणं त्यांना परवडत नाही. या समाजात सुरक्षित राहायचं असेल आणि इतर पुरुषांच्या वाईट नजरा किंवा बलात्कारासारख्या घटनांपासून दूर राहायचं असेल तर गळ्यात काळ्या मण्याची पोत अडकवून आपण पाळीव प्राणी आहोत आणि आपल्याला एक मालक आहे हे जगाला पटवावं लागतं हे त्यांना माहीत असतं. नवऱ्याला धनी किंवा मालक हा शब्द आजही ग्रामीण भागातील किंवा तिथून महानगरात येऊन राहणाऱ्या बायकाही सहज वापरतात. आपला मालक आणि त्यांनं गळ्यात बांधलेला पट्टा हेच आपलं भागधेय आहे असं समजत असलेल्या बायकांना आजही पिंजऱ्यात राहायला आवडतं. नवऱ्याचं प्रेम मिळवण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे वाक्प्रचार आजही रूढ आहेत. त्या मार्गावरून जाताना नोकरी आणि घर यात शिजणाऱ्या काही बायका करवादतात, कंटाळतात पण पदरी पडलं म्हणून सांभाळूनही घेतात. हजारो तक्रारींचे सूर सकाळ-संध्याकाळ स्त्रियांच्या डब्यात वाजत राहतात आणि तिथंच विरून जातात. पुन्हा आपली करिअर वूमन आणि पारंपरिक स्त्री या भूमिका वठवायला त्या नव्या जोमानं तयार होतात.

अर्थात यात अपवाद आहेतच. आजचे बरेच पुरुष आपल्या जोडीदारांना बऱ्यापैकी मदत करतात, समजावून घेतात. पण त्यांनाही व्यवस्थेच्या या चौकटीत राहून आपापल्या भूमिका कराव्या लागतात. अनेक गोष्टी नातेसंबंधात कटुता येऊ नये, कुटुंबातल्या नात्याची वीण सल होऊ म्हणून केल्या जातात. नातेसंबंध सांभाळणे ही सगळ्यात कठीण कसरत आपल्याकडच्या सर्वच मुलामुलींना करावी लागते. कधी आपल्या रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी तर कधी आपल्या परंपरा म्हणूनही हळदीकुंकू वगरे सारखे सणसमारंभ, व्रत-वैकल्य ही पिढी हौशीने करते. पण हे जे सारं आपण करतो आहोत ते आपल्याला बाईपणाच्या चौकटीत जास्तीत जास्त घट्ट बांधून ठेवतं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न अगदी उच्चशिक्षित मुलीसुद्धा करत नाहीत. या प्रथांमागे असलेलं या व्यवस्थेचं षड्यंत्र त्या जाणून घेत नाहीत. एकूणच या समाजाने त्यांच्यासाठी तयार केलेल्या सुरक्षित (?) पिंजऱ्यात राहणं त्यांना जास्त सोयीस्कर वाटतं. अनेकदा वाद नको म्हणून बाहेरच्या जगात मिळवलेला कर्तृत्वाचा मुकुट घरात प्रवेश करताना त्या घराच्या उंबऱ्यावरच उतरवून ठेवतात आणि कोणाची तरी बायको, सून किंवा आई होतात आणि हे करत असताना भारतीय संस्कृतीचा दाखला त्या देतात.

अशा वेळी मला आठवण होते ती किर्केगार्ड या विचारवंतानं केलेल्या विधानाची. त्यानं म्हटलं होतं, ‘What a misfortune to be a woman! And yet, the worst misfortune is not to understand what a misfortune it is.’ बाई असणं ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे दुर्दैव म्हणजे नेमकं काय आहे हे समजूनच न घेणं.

किर्केगार्डनं १९ व्या शतकात केलेलं हे विधान मला आजही समर्पक वाटतं. ‘महिला दिना’च्या दिवशी सहज एकमेकींना शुभेच्छा देतघेत दुसऱ्या दिवशी पुन्हा आपलं स्वतंत्र अवकाश वगरे असू शकतं हे विसरून बाईपणाच्या चौकटीत शिरणाऱ्या या बायकांना कदाचित हे दुर्दैव काय आहे हे कळलंही असेल, पण ते कळूनही न कळण्याचा अभिनय करणाऱ्या किंवा कळूनच न घेणाऱ्या अनेक सुशिक्षित बायकांच्या या दुर्दैवाचं काय करायचं हा प्रश्न मनात घोंगावत राहतो.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com