गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर, मुंबई आपला जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो, पण त्यांच्यामधलं संपूर्ण आयुष्य हे आपल्यालाच जगायचं असतं, जन्माबरोबरच आपण माणसांशी, समाजाशी जोडले जातो आणि सुरू झालेल्या काळाच्या प्रवासात आनंद, सुख, दु:ख, निराशा, विरह, अपयश, विश्वासघात, एकटेपण अशा अनेक भावनांशी सामना होतो. शांती ढळते आणि मग आयुष्याबद्दल, स्वत:बद्दल प्रश्न पडायला लागतात. त्या त्या वेळी आलेल्या संकटातून, प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपलं आपण एक तत्त्व वा तत्त्वज्ञान तयार करतो. कुणाकडून तरी ऐकलेलं किंवा स्वत: पारखून घेतलेलं. ते विचार, ती कृती त्या वेळी आपल्याला गर्तेतून बाहेर पडायला मदत करते. ते तत्त्व म्हणजेच तुम्ही तुमच्या आयुष्याचा लावलेला अर्थ. वाचकांचे हे निवडक अनुभव दर पंधरवडय़ानं ‘आयुष्याचा अर्थ’ या सदरांतर्गत वाचायला मिळतील. chaturangnew@gmail.com या ई-मेल पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता तुमचे अनुभव. पूर्वी अंकगणितात दिलेल्या गोष्टी प्रथम मांडून घ्यायच्या, अशी पद्धत होती. आपल्याला ठरावीक काळात, ठरावीक देशात आणि ठरावीक कुटुंबात जन्म मिळाला आहे या दिलेल्या गोष्टी समजाव्यात. काढावयाचं उत्तर गणितात दिलेलं असतं तसं मात्र जीवनात नसतं. या दिलेल्या गोष्टी- म्हणजे परिस्थिती आणि आपल्यामध्ये जन्मत: असलेले गुणदोष यांचा विचार करून आपणच आपल्याला काय करायचंय ते- म्हणजे काढावयाचं उत्तर ठरवायचं असतं आणि एवढंच आपल्या हातात असतं, हा मला जाणवलेला आयुष्याचा अर्थ. हा केवळ माझाच आहे, पूर्णपणे स्वत:चा आहे, असं म्हणणं धाडसाचं होईल. तसा अगदी स्वयंभू अर्थाचा दावा कोणी करू शकेल, असं मला तरी वाटत नाही. आता याचं उपयोजन मी कसं केलं वा करतो हे सांगायला हवं. मी निम्नस्तराच्या एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात, नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या काळात जन्मलो. मोठय़ा भावाला नोकरी मिळवताना आलेल्या अडचणी आणि जो भेटेल त्याला ‘माझ्या मुलाला कुठेतरी चिकटवा’ अशा अजीजीच्या सुरात विनवणारी आई पाहून कोणालाही असं सांगावं लागण्याची वेळ आपल्यावर येता कामा नये, पैसे कमी मिळाले तरी चालतील, असं नकळत ठरवलं. हे असं ठरवणं हेसुद्धा स्वत:साठी घेतलेला निर्णय, म्हणजे माझं माझ्यासाठीचं तत्त्व होतं. कॉलेजमध्ये शिकत असताना ‘संस्कृत शिक्षक हवेत’ अशा जाहिराती मी वारंवार वाचत होतो. शिक्षक दिनाला आमच्या शाळेत विद्यार्थी हेच शिक्षक म्हणून काम करत, त्या वेळी मीही त्यात भाग घेतला होता आणि मला बक्षीस मिळालं होतं. त्यामुळे शिक्षकच होण्याचं ठरवून मी ‘बी.ए.’ला संस्कृत घेतलं. त्यात ध्येयवाद वगैरे नव्हता, केवळ सोय होती. मला शाळेत काय किंवा कॉलेजात काय, अभ्यासाची आवड नव्हती. नेहमी जेमतेमच गुण मिळवून मी उत्तीर्ण होत होतो. करिअर, व्यवसाय मार्गदर्शन वगैरे शब्दसुद्धा माझ्या कानावर पडलेले नव्हते. मी संस्कृत घेऊन बी.ए. झालो आणि शाळांमधून संस्कृत विषय हद्दपार झाला! संस्कृत पदवीधराला मराठी विषय शिकवणं अवघड जाणार नाही, या मुख्याध्यापकांच्या समजामुळे मला नोकरी मिळाली. आपण ठरवतो एक आणि घडतं भलतंच, अशा वेळी ‘.. गॉड डिस्पोजेस’ म्हणणं मला पटत नाही. परिस्थितीतला संभाव्य बदल, म्हणजे दिलेल्या गोष्टी बदलून नव्यानं घातलेलं गणित असतं एवढंच. ‘आपल्याला नेमकं काय हवं आहे’ ते- म्हणजे काढावयाचं उत्तरसुद्धा बदलत जातं. कारण आपणही बदलत असतो. मी जुन्याजाणत्या मराठी शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊन मराठीही शिकवू शकलो. पुढे इंग्लिश शिकवणंही भाग पडलं आणि तेही मला जमत गेलं. आपल्यात असलेल्या उणिवा, दोष यामुळे मला जेव्हा अपयश आलं, तेव्हा मी प्रथम निराश झालो, वैतागलो. पण जीवन द्वंद्वात्मक आहे, जगात केवळ सुख, केवळ स्तुती कोणाच्याच वाटय़ाला आलं नाही, येणं शक्य नाही, हा वेदांतातला, पण व्यवहारी विचार मी करत असे. आपल्यात आणि दुसऱ्यातदेखील गुणांबरोबर दोष असणारच आणि त्याचे बरेवाईट परिणाम विनातक्रार स्वीकारले तरच मनाला कमी त्रास होईल. दु:ख, निराशा यांना फार वेळ थारा न देणं, पाहुण्याला निरोप द्यावा तसा निरोप देणंच योग्य, हे सहजपणे नाही, पण काही काळानं अंगवळणी पडलं. दिलेल्या गोष्टी वेगळ्या केल्या की काय उत्तर काढायचं हे समजतं हे गणितात खरं आहे, पण जीवनाचं तसं नाही, हे समजत आणि उमजत गेलं. न संपणारी गोष्ट असते तसं हे न संपणारं, सुटलं म्हणावं तोपर्यंत नव्या आकडेमोडीची गरज पडणारं, पण वाढत जाणाऱ्या गुंतागुंतीमुळे आपल्याला गुंतवून ठेवणारं गणित! कदाचित यामुळेच ‘मी ईश्वराखालोखाल गणिताला मानतो’ असं विनोबांनी म्हटलं असावं.