१५ एप्रिल १८६५ या दिवशी सकाळी अब्राहम लिंकन एका लॉजमधील खोलीत मृतावस्थेत आढळले. जॉन विल्किक्स बूथ या माणसाने लिंकनवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. जेव्हा लिंकनच्या मृत्यूची बातमी ऐकली तेव्हा युद्ध सचिव स्टँटन म्हणाला, ‘आत्तापर्यंत जगाने पाहिलेल्या राज्यकर्त्यांपैकी सर्वात परिपूर्ण असा राज्यकर्ता मृत्युशय्येवर पडला आहे.’ लिंकन सर्वाशी इतके चांगले संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी झाला, त्यामागचे गुपित काय असेल? मी दहा वर्षे अब्राहम लिंकनच्या आयुष्याचा अभ्यास करण्यात घालवली आहेत. मला जेवढे आणि जितके जास्तीत जास्त शक्य होते तेवढे सगळे प्रयत्न पणाला लावून मी त्याच्या घरगुती आयुष्याचा, राजकीय व सामाजिक जीवनाचा बारीक तपशिलांसह अभ्यास केला आहे. तो टीकाटिप्पणीमध्ये गुंतून पडला का? हो! काही अंशी! जेव्हा तो इंडियाना येथील पिजन वीक व्हॅलीमधील तरुण होता तेव्हा तो दुसऱ्यांची टिंगलटवाळी करणारी पत्रे व कविता लिहायचा आणि त्याच्या गावातील अशा ठिकाणी मुद्दामच सोडायचा, जेणेकरून ती वाचली जावीत. या पत्रांपैकी एका पत्राने खूप संतापजनक खळबळ माजवली होती. त्याचे पडसाद फार काळापर्यंत उमटले. आणखी एका प्रसंगानंतर तर त्याने पुन्हा कधीही अपमानास्पद पत्रे लिहिली नाहीत. पुन्हा कधीही त्याने कोणाची टिंगलटवाळी केली नाही. कोणावर कशासाठीही टीका केली नाही. वेळोवेळी झालेल्या नागरी युद्धांमध्ये लिंकनने प्रत्येक वेळी सैन्याचा प्रमुख असलेला जनरल बदलला. कधी मॅक्लिअन, कधी पोप, कधी बर्नसाईड हुकर, कधी मेडे; पण यामुळे प्रचंड घोळ झाले आणि शेवटी त्याचे पर्यवसान लिंकनच्या निराशेत झाले. अध्र्या राष्ट्राने लिंकनने निवडलेल्या या अपात्र जनरल्सची निंदा केली, पण लिंकन मात्र आपल्या निवडीवर ठाम होता. ‘कोणाचाही प्रति द्वेष नको; सर्वाशी सहृदयतेने वागा’. हे त्याचे ब्रीदवाक्य होते. आणखी एक त्याचे लाडके ब्रीदवाक्य म्हणजे, ‘तुम्ही इतरांबद्दल मत व्यक्त करू नका. इतरही तुमच्याबद्दल मत व्यक्त करणार नाहीत.’ आणि जेव्हा मिसेस लिंकन आणि इतरांनी दक्षिणेकडील लोकांवर कडक शब्दांत टीका करायला सुरुवात केली तेव्हा लिंकन म्हणाला, ‘‘त्यांच्यावर टीका करू नका. तुम्ही त्यांच्या जागी तशा परिस्थितीत असता, तर तुम्हीसुद्धा तसेच वागला असता.’’ पण तरीही जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा टीका करणारा नक्की लिंकनच असायचा. आपण आणखी एक उदाहरण पाहू. जुलै, १८६३ च्या पहिल्या तीन दिवशी गेट्सबर्गचे युद्ध लढले गेले. ४ जुलै रोजी रात्री शहर काळ्या ढगांनी भरून गेले व पावसाला सुरुवात झाली म्हणून ली त्याचे सैन्य घेऊन माघारी वळायला लागला. त्याचे पराभूत सैन्य घेऊन ली जेव्हा पोटोमॅक येथे आला तेव्हा त्याने पाहिले की, त्याच्या समोर दुथडी भरून वाहणारी नदी होती, तर पाठीमागे युनियन आर्मी होती. ली आता पुरता कात्रीत सापडला होता. त्याला आता पळूनही जाता येत नव्हते. लिंकनने पाहिले की, लीचे सैन्य जिंकून घेण्याची आणि युद्ध ताबडतोब थांबवण्याची तीच योग्य वेळ होती. म्हणून लगोलग त्याने मेडेला आज्ञा केली की, कोणतीही मीटिंग वगैरे न करता त्याने लीवर हल्ला चढवावा. लिंकनने त्याचा आदेश तारसंदेशने पाठवला. शिवाय एक दूतही पाठवला व कामाला लागावे हे सांगितले. आणि इकडे जनरल मेडेने काय केले? त्याला जे सांगितले गेले त्याच्या विरुद्ध गोष्ट त्याने केली. लिंकनचे आदेश धुडकावून लावण्यासाठी एक मीटिंग बोलावली. अशा परिस्थितीत लीवर हल्ला करण्यास तो कचरला. त्याने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले. अनेक प्रकारची कारणे दिली. हळूहळू नदीचे पाणी ओसरले आणि ली त्याच्या सैन्याला घेऊन पोटोमॅकहून पळून गेला. लिंकनची तळपायाची आग मस्तकात गेली. ‘‘याचा अर्थ काय?’’ लिंकन तावातावाने त्याचा मुलगा रॉबर्ट याला विचारत होता. ‘‘शत्रू आपल्या तावडीत सापडला होता. आता फक्त हात लांब करून नेस्तनाबूत करायचे होते. मी इतके सांगूनही आपले सैन्य जरासुद्धा हलले नाही. या परिस्थितीत लीचा कोणत्याही सैन्याने पराभव केला असता. मीसुद्धा रणांगणावर गेलो असतो, तर तेथे पराक्रम गाजवून आलो असतो.’’ अत्यंत कडवट मनाने लिंकनने मेडेला पत्र लिहिले. लक्षात घ्या, लिंकन त्या वेळी अत्यंत पुराणमतवादी विचारांचा होता आणि शब्द तो तोलूनमापून वापरत असे. म्हणूनच खाली दिलेले हे पत्र म्हणजे अत्यंत कडक शब्दांत ओढलेले आसूड होते, असे समजण्यास हरकत नाही. प्रिय सैन्यप्रमुख, ‘ली’ला पळून जाण्यासाठी तू मदत केलीस, या तुझ्या विशाल अंत:करणाचे कौतुक कसे करावे? कारण माझा तर विश्वासच बसत नाही. तो तुझ्या पकडीमध्ये आला होता आणि आपल्या या विजयावर आपले पुढील यश अवलंबून होते, पण आता तुझ्या या वागण्यामुळे युद्ध प्रदीर्घ काळ चालेल. मागच्या सोमवारी तू लीवर यशस्वी हल्ला चढवू शकला नाहीस. पुढे तरी तुझ्याकडून कोणती अपेक्षा धरावी? आता तरी तुझ्याकडे दोन तृतीयांश सैन्य होते. पुढे एवढे असणार नाही. तुझ्याकडून काही अपेक्षा करणे चुकीचे आहे. तू हातातील सुवर्णसंधी घालवली आहेस आणि त्यामुळे मी खूप दु:खी झालो आहे. तुम्हाला काय वाटते? मेडेने हे पत्र वाचले असेल का? मेडेने हे पत्र पाहिलेच नाही, कारण लिंकनने ते पाठवलेच नाही. लिंकनच्या मृत्यूनंतर त्याच्या इतर कागदांमध्ये हे पत्र मिळाले. माझा असा अंदाज आहे आणि फक्त अंदाज आहे की, हे पत्र लिहून झाल्यावर लिंकनने खिडकीतून खाली पाहिले असेल व तो स्वत:शी म्हणाला असेल, ‘एक मिनिट! मी फार घाई करायला नको आहे. इथे व्हाइट हाऊसमध्ये शांतपणे बसून मेडेला ‘हल्ला कर’ असा आदेश देणे सोपे आहे, पण मी स्वत: जर गेट्सबर्ग येथे असतो आणि मागच्या आठवडय़ात मेडेने जसा रक्तपात पाहिला तसा मी पाहिला असता आणि मरणाच्या, जखमी लोकांच्या कर्कश किंकाळ्या माझ्या कानावर आदळल्या असत्या, तर मीसुद्धा ‘हल्ला करावा की नाही’ अशा दोलायमान अवस्थेत सापडलो असतो. जर मी मेडेसारखा भित्र्या स्वभावाचा असतो तर मेडेने केले तेच मी केले असते आणि काही झाले तरी पुलाखालून आता बरेच पाणी वाहून गेले आहे. जर मी हे पत्र पाठवले, तर माझ्या रागाच्या भावनांमधून माझी मुक्ती होईल हे खरे! पण त्यामुळे मेडे सतत स्वत:ची बाजू मांडत राहील. तोसुद्धा माझ्यावर चिखलफेक करेल. त्यामुळे पुन्हा माझा क्षोभ होईल आणि त्याच्यापुढे सैन्यासाठी त्याचा जो उपयोग होणार असेल, तो होणार नाही आणि कदाचित त्याला सैन्यातून राजीनामा देणे भाग पडेल.’ म्हणूनच मी आधी सांगितल्याप्रमाणे लिंकनने ते पत्र बाजूला ठेवून दिले, कारण अनुभवातून तो शिकला होता की, पराकोटीची टीका आणि दुसऱ्यावर ओढलेले आसूड हे बहुधा व्यर्थ ठरतात. डेल कार्नेजी chaturang@expressindia.com (मेहता पब्लिशिंग हाऊसच्या ‘मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा’ या डेल कार्नेजी लिखित आणि अॅड. शुभदा विद्वांस अनुवादित पुस्तकातील संपादित भाग.)