स्वानंद किरकिरे ‘‘माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची सुरुवात मनात भरपूर गोंधळ घेऊनच झाली होती. नाटक-चित्रपटांची आंतरिक आवड नोकऱ्या करत फावल्या वेळात पुरवायचा मी प्रयत्न के ला खरा, पण माझं मन त्यात रमेना. आपल्याला नाटक आणि चित्रपटाच्याच क्षेत्रात राहायचंय हा बहुतेक मध्यमवर्गीय कु टुंबांमध्ये ‘गधडेपणा’चा ठरवला जाणारा निर्णय मी या काळात घेतला आणि पुन्हा रीतसर विद्यार्थी होऊन वर्गात जाऊन बसलो. लोकांच्या दृष्टीनं यशस्वी झालो नसतो, तरी मला काही फरक पडला नसता, इतका ठाम मी त्या वेळी होतो. ती पंचविशीतलीच प्रेरणा, ज्यामुळे मला के वळ आनंद आणि समाधान मिळत गेलं.’’ ‘विशी ते तिशीच्या दहा वर्षांत तुम्ही काय के लंत?’ हा रूढ अर्थानं पाहाता अवघड प्रश्न आहे. कारण अनेक जणांसाठी हाच काळ आपापल्या करिअरमध्ये पाय भक्कम रोवण्याचा असतो, नोकरीतली पत आणि पगार वाढत जाण्याचा असतो. मी मात्र या दहा वर्षांतली सुरुवातीची काही वर्ष संभ्रमात आणि उर्वरित काळ रीतसर शिकण्यात घालवला. आणि तसं करूनही मला माझं काही चुकलंय असं अजिबात वाटत नाही. मी इंदोरमध्ये एका मध्यमवर्गीय घरात वाढलो. हे शांत, सुंदर आणि खवय्यांचं शहर आहेच, पण उत्तम भाषा ऐकणं आणि वापरणं इथेच माझ्या अंगवळणी पडलं. माझे आई-वडील दोघंही शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आणि कु मार गंधर्वाचे शिष्य. लहानपणीच्या माझ्या अनेक आठवणी कु मारजींच्या घरात ते त्यांच्या शिष्यांना शिकवत असताना एकीकडे मी खेळतोय अशा आहेत. त्यामुळे संगीत कानावर पडत होतंच, पण त्या समृद्ध वातावरणात चांगलं काय वाचावं, तेही कळायचं. इंदोरला हौशी मराठी लोक खूप होते. जिथे जाऊ तिथे आपण आपली संस्कृती जोपासतो, त्याप्रमाणे इंदोरला महाराष्ट्रीय सण, उत्सव व्हायचे. त्यात मराठी नाटकं व्हायची. मुंबई, दिल्लीच्या नाटकांचे प्रयोग व्हायचे. पु. ल. देशपांडेंचा मी लहानपणापासून भक्त होतो. त्यांनी मला आजवर खूप प्रभावित के लं आहे. नाटकांमध्ये महेश एलकुंचवार खूप प्रिय होते. त्यांचं ‘होळी’ हे नाटक मी बसवलं होतं. राम नगरकरांचं ‘रामनगरी’ आवडायचं. ते पोस्टात नोकरी करून एकपात्री करतात हे मला माहीत होतं. आपणही तसंच नाटक करू शकू असं वाटून मला स्फु रण चढायचं. जयवंत दळवी आणि रत्नाकर मतकरींच्या नाटकांपासून वसंत सबनीस- दादा कोंडके ंच्या ‘विच्छा माझी पुरी करा’पर्यंत विविध नाटकं मी वाचायचो. माझ्या गटात ती करायचो. माझं स्वत:चंही काही लिहायचो. मला आठवतं, श्रीरंग गोडबोले यांचं ‘मेकअप’ हे नाटक मला तेव्हा फार आवडायचं आणि तेही आम्ही के लं होतं. राज्य नाटय़ स्पर्धेत आमची बृहन महाराष्ट्राची ‘एन्ट्री’ असायची. मराठी नाटकांची एक बृहन महाराष्ट्र स्पर्धा दिल्लीतही होत असे. तिथे इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर, बंगळूरु, सगळीकडून नाटकं यायची. तिथे आम्हीही जायचो. नाटकात मी बॅकस्टेजपासून नाटक बसवण्यापर्यंत काहीही काम करायला तयार असायचो, कारण ते वातावरणच मला खूप आवडायचं. मी वाणिज्य शाखेत शिकलो. अभ्यासात फारसा चांगला नसल्यामुळे इतर अनेक जणांसारखं ‘सीए’ वगैरे करायचा पर्याय समोर नव्हता. नाटकात रुची असली, तरी नाटक-चित्रपटात करिअर करायचं तर मुंबईला जावं लागेल हे माहीत होतं. शिवाय के वळ आवड असून भागत नाही, त्या क्षेत्रात कु णाशी तरी ओळखी हव्यात, भक्कम मार्गदर्शन हवं, हेही कळत होतं. त्यामुळे तो विषय बाजूला पडला. घरातून माझ्या नाटकाच्या छंदाला पाठिंबा होता; पण तो नोकरी करून मग उर्वरित वेळात नाटक जरूर करा, अशा प्रकारचा होता. या मानसिक गोंधळाच्या काळात मी अनेक गोष्टी के ल्या. एके ठिकाणी लेथ मशीनवर काम शिकू न ते काही काळ के लं, लहान ऑफिसमध्ये अकाऊंटंट म्हणून काम के लं, ‘युनिट ट्रस्ट’मध्ये तात्पुरत्या स्वरूपात नोकरी के ली, घरोघरी फिरून व्हॅक्यूम क्लीनर आणि आग विझवायची ‘सीजफायर’ उपकरणंही विकली. पण त्यात मन रमत नव्हतं. १९८० चं दशक म्हणजे समांतर चित्रपटांचाही सुवर्णकाळ म्हणावं असं होतं. भारतीय चित्रपटात नवे प्रवाह येत होते, उत्तम नट त्यात काम करत होते. हे सर्व मला आकर्षित करत होतं. शेवटी वयाच्या चोविसाव्या वर्षी ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त (एनएसडी) मी प्रवेश घेतला. इतरांच्या नजरेतून पाहिलं तर हा शुद्ध गधडेपणा होता. चोविसाव्या वर्षी मुलांची करिअर्स सुरू झालेली असतात. माझे काही मित्र शिकू न अमेरिके ला गेले होते. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये त्यांना नोकऱ्या लागल्या होत्या. अनेक जण ‘सीए’ आणि ‘कं पनी सेक्रे टरी’ झाले होते. काहींनी स्वत:चे व्यवसाय सुरू के ले होते. आणि मी आता कमावणं सोडून महाविद्यालयीन जीवनात परत जाणार होतो. चोविसाव्या वर्षी सुरू झालेलं शिक्षण चार वर्ष चालणार, म्हणजे शिक्षण संपेल तेव्हा तिशी जवळ आलेली असणार, हे समजत होतं. पण हा मोठा निर्णय मी तेव्हा घेतला नसता, तर तोपर्यंत जसं जगत होतो, तेच करत राहिलो असतो. शेवटी मी आईला म्हटलं, ‘‘एनएसडी’साठी एक वर्ष प्रयत्न करतो, आणि नाहीच मिळाला प्रवेश तर नोकरी करीन.’’ पण तो प्रवेश मिळाला आणि माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. ‘एनएसडी’नं माझ्यासमोर खूप मोठं विश्व उघडून दाखवलं. आपल्याला थोडंफार मराठी नाटक आणि थोडं इतर भाषांमधलं, इतपतच माहिती असतं. पण देश आणि परदेशातलं वेगवेगळ्या ठिकाणचं नाटक , आसाम, मणिपूर, कर्नाटक, तमिळनाडू, झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार, असे विविध राज्यांतून आलेले सहाध्यायी, त्यांच्या प्रदेशातलं नाटक, नाटकाचा इतर कलांशी असलेला जवळचा संबंध, हे नव्यानं उमजत होतं आणि ते मी माझ्यात साठवत गेलो. आजचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी हे माझ्या वर्गातले सहकारी. ‘एनएसडी’मध्ये असताना नाटकाशी संबंधित सर्व गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, हे तिथल्या दिनक्रमातच होतं. नाटय़लेखन, गीतलेखन, अभिनय, दिग्दर्शन, प्रकाशयोजना, ध्वनी, ते कपडेपट, यातलं कोणतंही काम असो, ते अगदी आयत्या वेळी करावं लागलं तरी तुम्हाला चांगलं जमायला हवं, अशी शिकवण तिथे मिळत होती. ती मी आत रुजवत गेलो आणि आता यातलं कोणतंही काम मला काम वाटतच नाही, इतकी मजा ते करताना येते. ‘एनएसडी’त प्रवेश घ्यायच्या काही काळ आधी मी ‘एनएसडी’नंच घेतलेली नाटकाची कार्यशाळा करण्यासाठी दिल्लीत गेलो होतो. तिथे अभिनेते आशीष विद्यार्थी यांच्याशी भेट झाली. त्यांचा ‘अॅक्ट वन’ हा नाटक करणारा गट होता. आता अतिशय प्रसिद्ध असणारे अनेक लोक तेव्हा त्या ग्रुपमध्ये प्रामाणिकपणे धडपड करत होते. त्यात अभिनेता मनोज बाजपेयी, पीयूष मिश्रा, दिग्दर्शक शुजीत सरकार होते, नाटय़दिग्दर्शक आणि नाटय़शिक्षक एन. के . शर्मा, रॉबिन दास होते. त्यांच्यात मीही सहभागी झालो. दिल्लीतल्या वास्तव्यात माझं वर्तुळ विस्तारत होतं आणि मी सतत नवीन गोष्टी शिकत होतो. ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचीही दिल्लीत भेट झाली. त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. तेव्हा मी विद्याधर पुंडलिकांच्या एका नाटकाचं भाषांतर के लं होतं. चंदावरकरांमुळेच ‘चार्वाक’ हे नाटक के लं. वामन के ंद्रे यांच्याशीही भेट झाली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि अभिराम भडकमकर यांनी लिहिलेल्या ‘लडीं नजरिया’ या नाटकासाठी मी प्रथम गीतं लिहिली. वयाच्या २७ व्या वर्षी ‘एनएसडी’मधून उत्तीर्ण झाल्यावर ‘रेपरटरी कं पनी’ उपक्रमात नाटक करायची संधी मिळाली. देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मी भगत सिंग यांच्या आयुष्यावर नाटक के लं होतं. नंतर मुंबईत ‘दूरदर्शन’मधल्या निर्मात्या आणि कार्यक्रम संशोधक मंजू सिंग यांनी मला बोलावलं आणि भगत सिंग यांच्यावरची ‘स्वराज’ ही मालिका लिहिण्याची संधी मिळाली. ते माझं या क्षेत्रातलं पहिलं व्यावसायिक काम. एक वर्ष मी या कामातच होतो. त्यासाठी मी मुंबईत आलो आणि नंतर इथेच राहिलो. माझी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो, तेव्हा मी तीस वर्षांचा झालो होतो. मला ज्यासाठी लोक ओळखू लागले, त्या सर्व गोष्टी वयाच्या तीस वर्षांनंतर घडल्या आहेत. अनेकांना माझं नाव घेतल्यावर ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ (२००३) चित्रपटातलं ‘बांवरा मन देखने चला इक सपना’ हे गाणं आधी आठवतं. ते गाणं गायलं तेव्हा जरी मी तिशीत होतो, तरी ते मी ऐन गद्धेपंचविशीतच लिहिलेलं आहे! मला लोक विचारतात, की तुम्ही गीतलेखन, गायन, अभिनय, चित्रपटलेखन, दिग्दर्शन, सगळ्याच क्षेत्रात कसं काम करू शकता? पण ‘गद्धेपंचविशी’च्या काळात या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतल्यावर मी स्वत:ला त्यासाठी जाणिवपूर्वक घडवत गेलो आहे. नवीन काम मनापासून शिकलो आणि तितकीच मेहनत के ली. ‘एनएसडी’त शिकायला जाण्याचं ठरवल्यावर या अनिश्चित क्षेत्रात आपण यशस्वी झालो नाही तर काय, असा विचारही माझ्या डोक्यात नव्हता. नाटक-चित्रपटाचं क्षेत्र इतकं आवडीचं होतं, की मिळालेलं यश मोठं की लहान, असे ठोकताळे मांडावेसे वाटत नव्हते. भीतीही वाटत नव्हती. जगीन मरीन ते यातच, पण याच जगात मला राहायचंय, अशी भावना होती. मनात असलेला गोंधळ दूर सारून मी ठामपणे हा रस्ता निवडला, तो माझ्या ‘गद्धेपंचविशी’तला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय; आणि त्यानं मला केवळ आनंदच दिला. शब्दांकन- संपदा सोवनी