आता मात्र शाळेलाच बोलणं भाग पडलं, शाळाशाळांत बाकं आली. पायात चपला सगळीकडे. लहान असताना रांगेत चपला काढण्याची सवय आपोआप मोडून जाते नि मग जागा मिळेल तिथे, जागा मिळेल तशा चपला भिरकावल्या जातात. चपलांबरोबर वर्गावर्गात धूळ जाणारच. जिकडेतिकडे हळूहळू धूळ, कचरा यांचं अनभिषिक्त साम्राज्य पसरतं. काय मार्ग काढता येईल?.. शाळेनंच मग सुचवली एक भन्नाट आयडिया, स्वत:ला सुंदर करण्याची.
मधली सुट्टी झाली नि धो-धो कोसळणाऱ्या पावसासारखी मुलं वर्गातून आनंदानं बाहेर पडली. हा सण मुलांच्या दृष्टीनं खूप आनंदाचा असतो. वर्गात बांधून घेतलेल्या मुलांना खूप मोकळं मोकळं वाटतं. सगळीच मुलं गटागटांत विभागली जातात. फुलांच्या गुच्छासारखी ताजी-टवटवीत होऊन एकत्र जमतात. आपापल्या मनासारखे गट पडतात. हाच खरा गटचर्चेचा तास असतो. आपल्या मनासारख्या जिवाभावाच्या मित्रमैत्रिणींना भेटायचा आनंदाचा सण.
आता शाळाशाळांत बाकं आली आणि घरातही टेबल-खुर्ची आली. पायात चपला सगळीकडे. लहान असताना रांगेत चपला काढण्याची सवय आपोआप मोडून जाते नि मग जागा मिळेल तिथे, जागा मिळेल तशा चपला भिरकावल्या जातात. चपलांबरोबर वर्गावर्गात धूळ जाणारच. आणि माझ्या पायाला धूळ लागत नाही, मग तोपर्यंत मला कचरा झाला तरी काहीच वाटत नाही. जिकडेतिकडे हळूहळू धूळ, कचरा यांचं अनभिषिक्त साम्राज्य पसरतं. काय करावं? काय मार्ग काढता येईल? सगळे एक होऊन निर्णय कसा घेतील? शिवाय हे काही यंत्रणेत नाही. काही घडलं तर ते मुलांकडूनच. कुणीतरी विषय तर मांडायला हवा. मुलांच्या मनाला स्पर्श करील असा!
आता मात्र शाळेलाच बोलणं भाग पडलं, कारण वाडीवस्तीवर, गावागावांत असणारं शाळा हे सार्वजनिक-सामाजिक ठिकाण. ठरावीक वेळात गजबजलेलं नि बराच काळ एकटं असणारं. कुलुपात बंद राहणारं. सगळय़ांचं नि कुणाचंच नाही. शिवाय वेगवेगळय़ा रूपातलं, जशी झोपडी ते राजवाडा यात राहण्याचे-जगण्याचे वेगवेगळे स्तर. तसेच शाळेचेही. यात वावरणारं, कुठं कुठं अंधूक दिसणारं मुलांचं शिक्षण. इथेच! इथेच आणि इथूनच काही घडायला हवं.
त्या दिवशी असंच घडलं, मुलं गोलात बसली होती. ‘या विषयावर मुलांशी काहीतरी वेगळं बोललंच पाहिजे,’ असं शाळेनं ठरवलं. संधी चांगलीच आहे असं म्हणून शाळा चक्क बोलू लागली, ‘रांगोळी काढल्यासारखी दिसतायत सगळे जण’ शाळा मनातल्या मनात म्हणाली. शाळा म्हणाली, ‘हाय! गुड आफ्टरनून’ शाळाच बोलतेय म्हटल्यावर मुलांना आपण ऐन चांदण्यात बसलो आहोत, असं वाटलं नि मुलं म्हणाली , ‘‘माय डिअर स्कूल, गुड आफ्टरनून, शाळा, तू बोलतेय तेही चक्क इंग्रजीत!’’
‘मला तुम्ही सांगा, कुणा कुणाची आई रांगोळी काढते दारासमोर? शाळेने विचारताच मुलं कावरीबावरी झाली. एक दोन मुलांनी हात वर केला. काही मुलं म्हणाली, सणावारी रांगोळी काढते आई.’ खरंच होतं हे.
‘रांगोळी का काढतो आपण?’
‘अंगण छान दिसतं. पाहायला बरं वाटतं. रंग भरले की सजवल्यासारखं वाटतं.’ मुलांची खूप उत्तरं आली.
‘आता आपल्याला मुलं सजवतील, आपण सुंदर दिसू’ असे विचार शाळेच्या मनात आले. हीच वेळ आहे मुलांशी गप्पा मारायची. ‘आपण शाळेत रोज रांगोळी काढली तर?’
‘अगं शाळा, तुझी कल्पना छानच आहे. पण इथे इतकी मुलं येणार-जाणार रांगोळी टिकणार कशी? काढायची कुठे? इथे काय घरासारखं एक दार आहे? इतके वर्ग.. इतकी मुलं..’’
मुलं काळजीत पडली. शाळेला मुलांची अडचण समजली, पण शाळेकडे मार्ग होता. त्यामुळे शाळेला हसू आलं. शाळा का हसतेय हे मुलांना समजेना. ‘अगं शाळा, तू का हसतेस सांग ना!’ ‘अरे, तुमच्या मनातल्या शंकाही किती सुंदर असतात! म्हणून मला हसायला आलं..’
‘पण मग रांगोळीच्या कल्पनेचं काय?’ मुलंच विचारून थांबली. अन् तीच विचार करू लागली. शाळा म्हणाली, ‘तुम्हालाच उत्तर सापडेल..’
‘आपण असं केलं तर?.. प्रत्येक वर्गाच्या दाराबाहेर उजव्या बाजूला आपण रांगोळी काढायची. कशी वाटते कल्पना?’ एका मुलानं विचारलं. दुसरा म्हणाला, ‘‘कल्पना छानच आहे पण, रांगोळीचा खर्च.. आणि रांगोळी काढायला येते कुणाला?’’
शाळा म्हणाली, ‘‘म्हणूनच तर मी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं, कुणाची आई दारापुढे रांगोळी काढते. आईच्या जवळ मुलं असतात. मुलांनो, तुम्ही आईबाबांकडून खूप शिकता.. शिवाय रांगोळीतून किती तरी गोष्टी कळतात. ठिपके ओळीत काढणे, ठिपके वेगवेगळय़ा प्रकारे जोडून त्यातून भूमितीचेच आकार तयार होतात. शिवाय सुंदर दिसण्यासाठी रंगही भरावे लागतात. मग अंगण छान दिसतं. उंबरा छान शोभतो. जेवणाचं ताट छान दिसतं. आजी तर रांगोळीतून ३२-३५ वस्तूंचं चैत्रांगण काढते. मुलांनो, आता याची जागा स्टिकरच्या रांगोळय़ांनी घेतली. पण तुम्ही माझी लाडकी मुलं आहात. तुम्हाला हे सारं आलंच पाहिजे. येणारच..’’
‘हो. शाळा, तू म्हणतेस ते खरंच आहे. शंभर टक्के खरं. किती वेगळा विचार करतेस तू जुन्या गोष्टींचा!’ आम्ही ठरवलंय तू सुंदर दिसली पाहिजेस. आणि असं छापील नाही तर आमच्या बोटातून आम्ही तुझं रूप बदलणार.. विश्वास ठेव आमच्यावर..’’
‘कुणावर नसेल इतका तुमच्यावर विश्वास आहे माझा! तुम्ही आहात म्हणून मी आहे. तुम्हीच तर आशा आहात माझी..’ शाळा भारावून बोलत होती आणि मुलंही तेवढीच भारावली होती.’ मला काय वाटतं शाळा, आम्ही वर्गणी काढून रांगोळी आणू. रंग आणू. आम्ही रांगोळी काढायला शिकणार. किती मज्जा येईल..’’
‘हो ना रे! आपण रोज पाळी लावायची दोघा दोघांची. दोघांनी दरवाजात. दोघांनी वर्गात रांगोळी काढायची. ठरलं तर मग! रोज नवी वर्गसजावट होईल. छान दिसेल नाही. आणि आम्ही मुलंही रांगोळी काढायला शिकू..’’
‘‘अरे, पण मी म्हणजे दरवेळी काही रांगोळीच वापरायला हवी असं नाही. कधी वाळू, कधी बिया, कधी दगड, कधी पानं, कधी फुलं, कधी पेन्सिल, कधी खडू.. किती प्रकारे हे सारं सजवता येईल,’’ वर्गातल्या एका मुलीनं कल्पना मांडली.
‘‘नक्की, तर मग ठरलं, ठरलं, ठरलं..’’
नव्या कल्पना मुलांच्या डोक्यातून बाहेर पडतात तेव्हा मुलं किती वेगळी वाटतात! एकदा त्यांनी मनापासून ठरवलं की मग काय विचारता.. शाळा भारावली, थरारली, आता प्रत्येक वर्गाचं दार सजेल, वर्गातला कोपरा सजेल, प्रत्येक जण काळजी घेईल की रांगोळीवर पाय नको पडायला. रोज नव्या कल्पना व्यक्त होतील. मुलं वर्गावर्गासमोर दंग होऊन काही करताना दिसतील?.. मुलांच्या मनातले विचार शाळेलाच समजत होते. कारण सर्व जण आपापल्या ठिकाणी जात होते पण शाळेला मात्र दिवसरात्र ध्यास होता मुलांचा.
मधली सुट्टी संपली नि मुलं वर्गात आली. प्रत्येकाच्या मनात ‘मी उद्या काय काढू?’
दुसरा दिवस उजाडला. वर्गाच्या बाहेर उजव्या बाजूला मुलांचे घोळके दिसू लागले. रोज जिथं धुळीचं नि वेडय़ावाकडय़ा चपला भिरकावण्याचं राज्य होतं तिथे आता पाण्यांनी साफसफाई झाली. चपला खाली आल्या. उजवा कोपरा सजला. कुणाच्या वर्गाबाहेर चिंचोक्यांची रांगोळी, तर कुठे बारीक खडय़ांची, कुठे पाना-फुलांची, कुठे ठिपक्याची.. वर्गात जाताना पावलं थबकू लागली, ‘अरे रांगोळी पुसेल. सजावट फिस्कटेल..’
एकदम शाळा वेगळी दिसू लागली. वर्गाबाहेर, रांगोळी- कागदाच्या माळा.. वा! शाळा सजली, शाळा सुखाने भारावून गेली.
आता शाळेच्या बाहेर प्रत्येक वर्गासमोर आणि प्रत्येक वर्गात सुंदर सजावट केलेली असते. प्रत्येक वर्गाला वाटते, ‘‘माझा वर्ग चांगला दिसावा..’’
रूक्ष-खरखरीत दिसणाऱ्या पायऱ्या, वर्गाचे व्हरांडे एकदम बदलून जातील शाळेने सुचवलेल्या या प्रयोगामुळे. आणि मुलांनाही याचं अप्रूप आहेच, पण कुठल्याच अभ्यासाच्या विषयात हे बसत नाही. वर्ग सजतात ते तयार पट्टय़ांनी. मग मुलांच्या कल्पनेचं काय? कल्पना करा ना की ओळीनं वर्गाबाहेर मुलांनी कल्पकतेने काढलेल्या, वेगवेगळय़ा माध्यमांतून काढलेल्या रांगोळय़ा दूरून पाहिल्या तर डोळय़ांना किती सुखद वाटेल!
बहिणाबाई म्हणते ना आपल्या नातलगांना ‘अरे झाडं तोडू नका. सगळी झाडं फळं देणारी नसतात, काही झाडं डोळय़ांना आनंद देणारी असतात..’ याचा अर्थ किती मोठा आहे!
एका लहान मुलानं तर वर्गाबाहेर रांगोळी म्हणून छान ओळी काढल्या तर दुसऱ्यानं वाळूनं पक्षी काढले पण दाणे खरे टाकले. फक्त हे फिस्कटायचं नाही, जपायचं कसं ही सवय आपल्याला लावावी लागेल. ‘स्वच्छतेतून सुंदरतेकडे’ हा प्रवास वेगळाच असतो शेवटी, जे नाही ते निर्माण करण्यात वेळ जाणारच. ल्ल
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2014 रोजी प्रकाशित
सुंदर मी होणार
आता मात्र शाळेलाच बोलणं भाग पडलं, शाळाशाळांत बाकं आली. पायात चपला सगळीकडे. लहान असताना रांगेत चपला काढण्याची सवय आपोआप मोडून जाते नि मग जागा मिळेल तिथे, जागा मिळेल तशा चपला भिरकावल्या जातात. चपलांबरोबर वर्गावर्गात धूळ जाणारच. जिकडेतिकडे हळूहळू धूळ, कचरा …
First published on: 01-02-2014 at 08:39 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I would be beautiful