‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही उक्ती आपण नेहमी वापरतो. कोणतीही वस्तू काटकसरीने वापरून थोडी थोडी शिल्लक टाकली तर काही दिवसातच तिचा मोठा साठा आपल्याकडे होतो. पूर्वीच्या बायका घरखर्चातून थोडे थोडे पैसे शिल्लक ठेवायच्या. चांगली रक्कम जमली की दागिना घ्यायच्या. आई-बाबा रोज ऑफिसला जाताना बबलूला पैसे देत. काही तरी खाऊ आणून तो ते संपवून टाकायचा. त्या खाऊमुळे तो आजारी पडतोय हे लक्षात आल्यावर आई म्हणाली, ‘‘तुला पैसे देणार नाही, अरबट चरबट खायला.’’ पण तो ऐकेना. मग असं ठरलं, बबलूने दिलेल्या पैशातून निम्मे खर्च करायचे, निम्मे एका डब्यात ठेवायचे. दोन-तीन महिन्यांत साठलेले पैसे पाहून बबलूला आनंद झाला. बाबांच्या वाढदिवसाला सरप्राइज गिफ्ट आणायचं लगेच ठरलं. बाहेरच्या खाण्याने आजारपण येतं, शाळा चुकते, पैसेपण साठत नाहीत हे आईने बबलूला पटवून दिलं. मोठा झाला तरी तो हे विसरणार नाही.
आपल्याकडच्या भीषण दुष्काळात सर्व जण थेंब थेंब पाणी वाचवून दुष्काळग्रस्तांकडे पाठविल्या जाणाऱ्या पाण्यात भर घालत आहेत. पुढील वर्षी त्रास होऊ नये याची तजवीज करताहेत. शहरवासी गाडय़ा फवाऱ्याने न धुता बादलीत थोडं पाणी घेऊन धुतात. घराघरातून वॉशबेसिनचा नळ सुरू ठेवून काम केलं जात नाहीत. वॉशिंग मशीन कपडय़ांनी पूर्ण भरल्यावर सुरू करतात, त्याचं दुसरं तिसरं पाणी ड्रममध्ये साठवून इतरत्र वापरतात. बाल्कनीत, अंगणात लावलेल्या झाडांच्या मुळाशी पालापाचोळा, निर्माल्य टाकून मातीचा ओलावा टिकवून, झाडांना कमी पाणी लागेल हे पाहतात. थेंबे थेंबे पाणी वाचवून साठवायचं ठरल्यावर, भरून ठेवलेलं पाणी शिळं झालं म्हणून ओतून टाकत नाहीत. धरणात अनेक महिने ठेवलेलं पाणी नळातून आपल्याकडे येतं मग ते शिळं नाही हे आता पटलं आहे. प्रसारमाध्यमंसुद्धा पाणी वाचवण्याच्या युक्त्या सांगतात. सार्वजनिक संस्थांचे कार्यकर्ते आपल्या प्रभागात पाइप फुटून पाणी वाया जाणार नाही याकडे लक्ष देतात. पाणी जीवन आहे. वसुंधरेने ते आपल्याला जगण्यासाठी दिलं आहे, हे भान जनसामान्यांना आहे. शाळा, शासकीय संस्था, हॉस्पिटल्स, सार्वजनिक स्वच्छतागृहं येथे आदर्श व्यवस्थापन केलेलं दिसतं. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये पाणी जपून वापरतात. शाळांच्या गेटजवळ ड्रम ठेवलेले दिसतात. मुलं घरी जाताना पाण्याच्या बाटलीतील उरलेलं पाणी त्यात टाकतात, नंतर ते दुसऱ्या कामासाठी वापरलं जातं. जेथे पाणी फारच कमी येतं तिथे केळीच्या पानावर, पत्रावळीवरसुद्धा माणसं जेवू लागली आहेत.
जलयुक्त शिवार, रेन हार्वेस्टिंग, ठिबक सिंचन या सरकारी योजना मोठय़ा प्रमाणावर, शेतीच्या वापराकरिता आहेत. सामान्यांनी साठवलेलं पाणी खेडोपाडी माणसांना, जनावरांना उपयोगी पडतं. वसईला एक कुटुंब गेली अठरा र्वष पावसाळ्यात घराच्या छतावरून पडणारं पाणी मोठमोठय़ा ड्रम्समध्ये साठवून ठेवून वर्षभर वापरत आहेत. एक-दोघे जण नाहीत, तर प्रत्येक नागरिक शक्य असेल त्या मार्गाने पाण्याची बचत करतो आहे. उदाहरणं द्यावी तेवढी कमीच आहेत. आपलं काय? आपणही केली नसेल सुरुवात तर करायला हवी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गीता ग्रामोपाध्ये
geetagramopadhye@yahoo.com

मराठीतील सर्व मन वढाय वढाय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saving is good for the future
First published on: 04-06-2016 at 01:01 IST