मातेशिवाय हे जग चालणं अशक्यच. पण आई ही एक भावना, वृत्ती आणि स्वभावही आहे, त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष मुलांना जन्म द्यायलाच हवा असं नाही. अशाच या काही जणी, वेश्या व्यवसायातल्या स्त्रियांच्या मुलांच्या त्या आई झालेल्या आहेतच, पण त्या स्त्रियांवरही त्यांनी मायेची उबदार शाल पांघरलेली आहे. काही जणी आजारी, दिव्यांगांच्या आई झाल्या आहेत, तर काही वस्तीवरच्या वंचित मुलांना जगण्याचं भान देत आहेत. आईपणाचा परीघ सतत विस्तारत ठेवणाऱ्या या मातांविषयी उद्याच्या ११ मेच्या मातृदिनानिमित्त…
हानपणीचं एक दृश्य माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलंय… आषाढातला धुवाधार पाऊस! चेंबूरमधल्या एका मोकळ्या मैदानातला सोसाट्याचा वारा आम्हा मायलेकींना चहूबाजूने झोडपतोय. आई तिचा ओलागच्च पदर पाच वर्षांच्या माझ्या डोक्यावर धरून, मला अंगाशी लपेटून घेत त्या मैदानातून, चिखलातून, खड्ड्यांतून वाट काढतेय. तो ओलाचिंब पदर त्या लेकराला खरंच त्या तुफान पावसात चिंब भिजण्यापासून वाचवू शकला असेल का? नक्कीच नाही. पण एका आईचा लेकराला पावसापासून वाचवण्याचा तो विफल प्रयत्न होता! आज माझी आई हयात नाही. पण बालवयात मुसळधार पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या ओल्याचिंब पदराची ऊब साठ पावसाळे पाहिल्यानंतर मला आजही स्पष्ट जाणवते.
आईपणाच्या या उबदार मायेच्या पदराने आजवर अनेक जणांना पालवलंय, पण त्यासाठी प्रत्यक्ष त्या व्यक्तीची आई असणं गरजेचं आहे का? नक्कीच नाही. आज अनेक जणी आईच्या मायेनं असंख्य वंचित, अनाथ, दिव्यांग मुलांना सांभाळत आहेत. मायेची छत्रछाया देत त्यांना जगण्याचं बळ देत आहेत.
निवासी संस्था ‘निहार’च्या संचालिका आणि वस्ती पातळीवर काम करणाऱ्या ‘अभिरुची’ प्रकल्पाच्या प्रमुख सुनीता जोगळेकर यांनी अशीच मायेची पाखर वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलांवर घातली आहे. त्या सांगतात, ‘‘घर, नातीगोती या संकल्पनाच ठाऊक नसलेली ही मुलं! त्यामुळे त्यांच्या निकोप वाढीसाठी पोषक वातावरण देणं, त्यांना समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं वाटलं. आपली आई वेश्या व्यवसाय करते हे वास्तव कळल्यावर मुलांच्या मनात आईविषयी कटुता निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्यांची आई भेटायला आली की त्या दोघांना मोकळा वेळ देतो.
मुलांना सांगतो की, तिला ‘निहार’चा मोकळा परिसर दाखवा, तुमची प्रगती पुस्तकं दाखवा, शाळेतल्या मित्रांच्या गमतीजमती सांगा. तसंच त्यांच्या आयांनाही समजावतो की इथं शिवराळ भाषा वापरायची नाही. तंबाखू खाऊन यायचं नाही, भडक मेकअप, कपडे घालून यायचं नाही. त्यामुळे सुरुवातीला आईला पाहून दूर पळणारी मुलं नंतर आईची वाट पाहू लागतात.
आम्हाला नेमकं हेच हवं असतं. ‘आकाशवाणी’वर ‘निहार’मधल्या मुलांनी लिहिलेला कार्यक्रम आम्ही सादर केला. ते बघून अभिमानाने माझाच ऊर भरून आला. या मुलांना सोळा वर्षांचे झाल्यावर वेगळ्या संस्थेत पाठवलं जातं. काही दिवस गेल्यावर तिथल्या संस्थाचालकांचा मला फोन येतो, मुलं सारखी तुमची आठवण काढतात. तुम्हाला फोन लावून द्या म्हणून हट्ट करताहेत.’’ सुनीता यांचे या मुलांशी हे सूर अचानक जुळलेले नाहीत.
रोजच्या रोज त्यांच्याबरोबरच राहून खेळ घेणं, गाणी म्हणणं, अंगतपंगत करणं यातून ही मुलं त्यांच्याशी आईपणाच्या रेशीमबंधाने बांधली गेली आहेत. त्यांनी स्वत: लग्न केलेलं नाही. पण आज ‘निहार’मधून मोठी झालेली मुलं त्यांच्या अडचणीत धावून येतात. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन पाया पडायला येतात. त्यांची मुलं जेव्हा आजी म्हणून त्यांना बिलगतात, तेव्हा खरोखरच त्यांना वयाच्या सर्व पातळ्यांवर आईपण मिरवायला मिळालं या विचारांनी कृतार्थ वाटतं.
आई होण्यासाठी वयाचं बंधन नसतं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर कुणाचंही आई होता येतं, हवं असतं ते फक्त संवेदनशील मन. वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि एकल स्त्रियांसाठी काम करणाऱ्या ‘वंचित विकास’ संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर आज अनेक जणींच्या आई झालेल्या आहेत. त्या सांगतात, ‘‘मातृत्व ही एक उदात्त भावना आहे. आपलं मूल जसं आहे तसं, मग ते सर्वसामान्य असो, दिव्यांग असो वा मतिमंद, लहान असो की मोठं, त्याला स्वीकारण्याची, सुधारण्याची अंगभूत ताकद आईपणात असते. तेच माझं झालं.
माझ्या कामाच्या निमित्ताने ‘लालबत्ती’ विभागातल्या काही जणी माझ्या संपर्कात आल्या. सुरुवातीला त्या म्हणत, ‘तू घरगृहस्थीवाली बाई! तुला आमची दु:खं काय कळणार?’ पण आज त्या माझ्या लेकी आहेत. त्यांच्या सगळ्या सुखदु:खात त्या मला सहभागी करून घेतात. कधी निराशेने उन्मळून पडतात, कधी दुखातिरेकाने वैफल्यग्रस्त होतात तेव्हा सांभाळावं लागतं. कधी कधी त्या दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेल्या असतात. त्यांना उचलून आम्ही घरी आणतो.
कधी कधी त्यांचा स्वत:वरचा ताबा सुटतो आणि त्या मला शिवीगाळसुद्धा करतात. पण अबोलपणे त्यांना जवळ घेतलं, थोपटलं की केवळ स्पर्शातून त्यांना माझ्या भावना नेमक्या कळतात आणि स्वत:ची चूक उमगते. त्यांच्या अनेक व्यावहारिक अडचणी आहेत. त्या समजून घ्याव्या लागतात. तेव्हाच तर त्या मोकळेपणाने त्यांच्या व्यथा-वेदना सांगतात, एका आईवरच्या विश्वासाने.’’
एकल स्त्रियांबरोबर काम करतानाही अशाच सहसंवेदना जपाव्या लागतात. त्यांना मुलं असतात. नातलग असतात. तरी त्या भरल्या कुटुंबात एकट्या, एकाकी असतात. कधी तरी त्या माझ्याजवळ बोलून जातात, ‘आम्हालाही आयुष्यात पुरुष हवा आहे.’ अर्थात असं म्हटलं म्हणून लगेच त्यांचा पाय घसरणार नाही हे मला ठाऊक असतं. अशा वेळी मी त्यांना जवळ घेऊन थोपटते. म्हणते, ‘हो असं वाटू शकतं. त्यात काहीच गैर नाही.’ त्यामुळे त्यांचं अपराधीपण कमी होतं. बऱ्याच एकल स्त्रियांना कोणाशी तरी बोलावंसं वाटतं. मग आई जशी सासरी गेलेल्या लेकीला फोन करते, तसा मी
फोन केला की त्यांना खूप बरं वाटतं. एखाद्या दिवशी खूप पाऊस पडत असेल आणि मेसेज केला की, बाई तू सुखरूप घरी पोहोचलीस ना किंवा कडक ऊन पडलेय, बाहेर पडताना जरा काळजी घे. असे चार ओळींचे मेसेजसुद्धा त्यांचं आपलं नातं घट्ट करतात. आईपण यापेक्षा वेगळं काय असतं? अर्थात मातृत्वाचे नुसते गोडवे गाऊन भागत नाही. वेळेला कडकपणे वागून त्यांना त्यांच्या चुकासुद्धा दाखवाव्या लागतात. तसंच आईसुद्धा आदर्शाचा पुतळा नाही. तिला तिच्या गुणदोषांसकट स्वीकारणं अनिवार्य आहे हे त्यांना पटवावं लागतं.’’
आईपणाचा आणखी एक आयाम आहे, तो फोस्टर मदर! अनाथ मूल संस्थेत आल्यावर ते दत्तक जाईपर्यंतच्या काळात आईच्या मायेने त्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या सीमा गोम्स, गेली ३० वर्षं त्या हे काम करतायेत. ‘‘माझ्या पतीचं अकाली निधन झालं. पदरात चार मुलं! त्यांना सांभाळण्यासाठी मी हे काम सुरू केलं खरं, पण आज ही मुलं माझा जीव आहेत. IAPA ( indian association for promotion of adoption & child welfare) कडून माझ्याकडे मुलं येत. त्याच्या संचालक प्रीमॅच्युअर व आजारी मुलं मलाच देत आणि म्हणत, ‘‘सीमा तू या मुलांना इतका जीव लावशील की आम्हाला त्यांची मुळीच काळजी नाही.
’’ अशीच एक अंध मुलगी माझ्याकडे आली. ती थोडी मोठी झाल्यावर जे हातात येईल ते खाली खेचू लागली. मग मी माझ्या घरातली एक खोली तिच्यासाठी पूर्ण रिकामी करून दिली. ती खिडकीत झोके घ्यायची. मस्त खेळायची. पुढे संस्थेने तिला एका आश्रमात पाठवलं. एकदा आम्ही तिथं तिला भेटायला गेलो, माझा केवळ आवाज ऐकून तिने मला ओळखलं आणि मला घट्ट मिठी मारून रडायला लागली. मलाही खूप वाईट वाटलं, पण नाइलाज होता. अशा वेळी हृदयावर दगड ठेवावा लागतो.
ही मुलं खूप अशक्त असतात. ती वारंवार आजारी पडतात. एकदा एका मुलीला मध्यरात्री जुलाब सुरू झाले. रिक्षा, टॅक्सी मिळेना. मी हॉस्पिटलकडे धावत सुटले. वाटेत पोलिसांनी त्यांची व्हॅन थांबवून माझी चौकशी केली व हॉस्पिटलमध्ये सोडलं. दुसरी एक मुलगी, अशिता अपंग होती. तिला हॉस्पिटलला नेणं, तिचे व्यायाम घेणं, सगळं काही करायला लागायचं, पण ती खूश असायची त्यातच मला आनंद. आठ वर्षांपूर्वी एका जीवघेण्या दुखण्यातून मी बरी झाले ती केवळ या अश्राप मुलांच्या प्रेमामुळेच.’’
मातृत्वाचा परीघ किती विस्तारावा? तो जात, धर्म, पंथ यांच्यापलीकडे पोहोचला आहे. तृतीयपंथीय श्रीगौरी सावंत हे याचं उत्कृष्ट उदाहरण! त्यांचा मातृत्वाचा अनुभव त्यांच्याच शब्दांत – ‘‘तृतीयपंथीयांचं शाश्वत नातं कोणाशीच नसतं. गायत्री माझ्याकडे अचानक आली तेव्हा माझं हक्काचं असं कोणीच नव्हतं. पण गायत्रीने माझ्यातल्या मातृत्वाला जागं केलं. ती घरी आली, तेव्हा अर्थातच मी तिच्या वेण्या घालू लागले. तिला आंघोळ घालू लागले. शाळेत सोडायला जाऊ लागले.
तिच्यात माझं मन इतकं गुंतलं की ती बरोबर नसेल तर मी एकटीने माझ्या आवडीचं खाणंसुद्धा टाळत असे. मात्र तिला आवडतं म्हणून, मी शाकाहारी असूनही तिला भरपेट मच्छी खाऊ घालायचे. मात्र मी माझं आईपण तिच्यावर कधीही लादलं नाही. सात महिन्यांनंतर तिने ‘मम्मा’ अशी हाक मला मारली, तेव्हा माझं मन भरून आलं. तिने माझ्यातल्या आईला स्वीकारलं होतं. ती वयात आल्यावर मी हळूच तिला सांगायला लागले, अगदी इतर आयांसारखीच की ‘बाई गं तू दुपट्ट्याशिवाय कुठे जाऊ नकोस. पावसात भिजू नको. हळूहळू मी तिला आमच्या समाजात नेणं टाळायला लागले. कारण इतर तृतीयपंथीय तिच्यादेखत दारू पिऊन शिवीगाळ करायचे.
तिला पान आणायला पानाच्या ठेल्यावर पाठवायचे. मला गायत्रीला या कुसंस्कारांपासून वाचवायचं होतं. नकळत माझ्यात जबाबदारीची जाणीव गायत्रीमुळे निर्माण झाली. उद्या माझं काही बरं-वाईट झालं, तर तिचं भविष्य अंधकारमय होऊ नये यासाठी मी बँकेत बचत करू लागले. तिच्या लग्नासाठी दागिने खरेदी करू लागले. गायत्रीला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा मी आधी गडबडले. कारण मला हा अनुभव नव्हता ना! पण मग सारं निभावलं. जेव्हा ती १८ वर्षांची झाली, तेव्हा तिने गॅझेटमध्ये आपलं नाव नोंदवलं, गायत्री गौरी सावंत!
आज हे माझं नाव सांगणारी दहा मुलं ‘आजीचं घर’मध्ये माझ्यासोबत आहेत. या बाळांना मी स्वत: न्हाऊ-माखू घालते. त्यांची शि-शू काढते. ही मुलं वेश्या व्यवसायातल्या एचआयव्हीग्रस्त स्त्रियांची आहेत. ती निरोगी राहावीत म्हणून मी त्यांना रोज ड्रायफ्रूटची स्मूदी, ग्लासभर दूध, फळफळावळ खाऊ घालते. कधी कधी त्यांच्या कानामागे गुपचूप काळी तीटसुद्धा लावते. त्यांची नजर काढते. त्यांच्या भविष्यासाठी मी मला कार्यक्रमातून मिळणारं मानधन दरमहा पोस्टात जमा करते. मला मनापासून वाटतं, आता मी इतर तृतीयपंथीयांसारखी बेवारस नाही मरणार! गौरी सावंत हे माझं नाव लावणारी मुलं मला आहेत. ही मुलंच माझ्या जगण्याचं उद्दिष्ट आहेत. ही मुलं माझ्यातल्या आईला चैतन्य आणि ऊर्जा प्रदान करतात. मी या मुलांची ऋणी आहे.’’
madhuri.m.tamhane@gmail.com