‘‘जिथे आपण खूप जीव गुंतवलेला असतो, तिथे अपेक्षाभंग करणारा प्रतिसाद मिळाल्यावर सर्वात जास्त अस्वस्थता येते, पण तर्कसंगत विचार करून सुटण्याची जागाही तीच असते. दुसऱ्याच्या हेतूबद्दल आपल्याला वाटतंय तेच खरं, असं गृहीत न धरता इतर शक्यतांचाही विचार करून पाहायला हवा, आपल्या आणि संबंधितांच्या प्रतिसादाकडे त्रयस्थपणे पाहायला हवं. त्या व्यक्तीपर्यंत योग्य शब्दांत आपली भावना पोहोचवून विषय ‘पूर्ण’ करणंही तितकंच महत्त्वाचं. संवादांचं हे पूर्णत्व मनातला जुना कचरा स्वच्छ करतं.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘एक गोष्ट आता मला पक्की कळलीय, आपण लोकांसाठी केलेल्या कष्टांची त्यांना कदर नसते. त्यामुळे कुणाला जीव लावायला जाऊ नये. आपण बरं, आपलं घर आणि जवळची चार माणसं बरी.’’ रसिका तिचं जीवनविषयक तत्त्वज्ञान तावातावानं मांडत होती.
‘‘या वेळी हा साक्षात्कार तुला कुणामुळे झाला रसिका? कारण घरच्यांना माझी किंमत नाही अशीही नेहमी तक्रार करतेस.’’ मी गमतीनं विचारलं.
‘‘अगं, माझ्या समोरच्या ब्लॉकमधली पूजा आहे ना, कॉल सेंटरमध्ये काम करते. मध्यंतरी तापानं फणफणली. पार्टनर्स गावी गेलेल्या. एकटीच पडून होती. उठवतही नव्हतं. तिची अवस्था पाहून मी तिला दवाखान्यात नेलं, काळजी घेतली, घरचं जेवण दिलं, बरी झाल्यावर डोळ्यात पाणी आणून ‘थँक्यू’ म्हणाली. कशा या मुली राहतात गं बिचाऱ्या एकटय़ा. रात्रीचा दिवस, जेवणखाण धड नाही. मलाच वाईट वाटलं. मग घरात काही वेगळं केलं की मी त्यांना आठवणीनं डबा द्यायला लागले. पोरी नावाजून खातात, पण डबे परत करायचं नाव नाही. शेवटी मीच एकदा माझे सगळे डबे उचलून आणले. आता त्यांना प्लास्टिकच्या डब्यात खाऊ पाठवते.’’
‘‘मग प्रॉब्लेम काय? तुझ्यामागे टवाळी करतात का मुली तुझी?’’
‘‘नाही गं, पण एकदा पूजा पार्टनरला सांगत होती, ‘हा कुणाचा डबा पडलाय देव जाणे. इतके डबे येतात कुणाकुणाचे..’ बघितलं तर माझाच डबा होता गं, तिला आजारपणात धिरडी पाठवलेली त्याचा. खूप दुखावल्यासारखं वाटलं मला.’’
‘‘अगं, मग तसं सांगून टाकायचं तिला. अगदी टवाळी केली असती तरी सांगायचं की ‘तुझ्या बोलण्यानं मी दुखावली जातेय..’ एकदा माधुरीबद्दलपण असंच काही तरी सांगत होतीस..’’
‘‘हो. तिची इशिता सहामाहीला दोन विषयांत नापास झाली. आई रागावली म्हणून मुसमुसत होती. मला वाईट वाटलं, मी शिकवते म्हटलं. हसतखेळत शिकवून गोडी लावली अभ्यासाची. दोन र्वष उत्तम मार्क पडले. माधुरी पैसे देत होती शिकवण्याचे, मी घेतले नाहीत..आणि आठवीला, इशिताला त्या नावाजलेल्या महागडय़ा क्लासला जबरदस्तीनं घातलं माधुरीनं. आठवीपासून इंजिनीअिरगच्या तयारीची गरजच काय? मला सांगायची सुद्धा तसदी घेतली नाही. लोक कसं असं वागू शकतात गं? गरज सरो वैद्य मरो? मी रागानं बोलणंच सोडलं तिच्याशी.’’
‘‘लोकांनी असं वागू नये हे खरं, पण बोलली नाहीस म्हणून माधुरी ‘सॉरी’ म्हणायला आली का? अबोला धरून लोकांचे स्वभाव थोडीच बदलू शकतो आपण?’’
‘‘त्याचीच तर चिडचिड करून मैत्रिणीजवळ मन मोकळं करतेय.’’
‘‘तू मैत्रिणींजवळ चिडचिड करणार, पण ज्यांनी हे केलंय त्यांच्याशी मात्र तोंडदेखलं गोड बोलणार किंवा बोलणंच थांबवणार. त्यामुळे मनात आणखी चिडचिड होणार. वर त्या व्यक्तींशी याबद्दल चकार शब्दही न बोलता ‘जगाला माझ्या करण्याची किंमत नाही’ असा निष्कर्ष तूच काढणार आणि दुसऱ्यासाठी केलेल्याचा निखळ आनंद गढूळ करून घेणार. काय भारी लॉजिक आहे गं तुझं?’’
‘‘पण त्यांनी का वागावं असं?’’
‘‘असतील त्यांची कारणं. माधुरीनं तुला त्रास द्यायच्या हेतूनं इशिताला त्या क्लासला घातलं असेल का?’’
‘‘काहीही काय? तिच्या भावाचा मुलगा त्या क्लासला जातो. त्यामुळे इशितालापण इंजिनीअरच करायचंय तिला. ‘इशिताला अभ्यासापलीकडचे अनुभव घेऊन स्वत:ची आवड शोधू दे. मार्काच्या मागे नको लागू’ असं इतके वेळा सांगूनही तिला पटलं नाही.’’
‘‘बघ. तूच उत्तर दिलंस. इशिताला त्या क्लासला घालायला तुझा विरोध होताच. मुलांकडून ते जसं डोक्यावर बसून करून घेतात तसं तुला जमणारच नव्हतं. ‘मतभेद’ होण्याची भीती वाटली, शिवाय तू पैसेही नको म्हणालीस. म्हणून तुला पटवत बसण्यापेक्षा माधुरीनं न सांगण्याचा पर्याय निवडला असेल.’’
‘‘असंही असू शकेल गं, माझ्या लक्षातही आलं नाही.’’
‘‘तिच्याशी बोलणं बंद करूनही तुला त्रास होतोच आहे. तिलाही होत असणार. तू इशितासाठी केलेल्याची थोडी तरी जाण तिला असेल?’’

मराठीतील सर्व संवादाने रचला पाया बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conversation completion
First published on: 16-04-2016 at 01:11 IST