‘‘मला आणि मंगेशला भेटून २३-२४ वर्षे झालीत. या सगळ्या वर्षांमध्ये आमचे सहजीवन प्रगल्भच होत गेलं. अभिनेत्री म्हणून मला घडविण्यात त्यांचा जितका मोठा वाटा आहे तितकाच मोठा हातभार त्यांनी मला व्यक्ती म्हणून सक्षम करण्यातही लावलाय. तसं पाहायला गेलं तर मी समूहापासून लांब राहणारी मुलगी. जिवलग म्हणाव्या अशा मित्र-मत्रिणींचा गोतावळा माझ्या बाजूला कधीच नव्हता. कोणताही समारंभ, कार्य, सोहळे, पार्टी यापासून मी नेहमीच स्वत:ला अलिप्त ठेवत आले आहे. मग या सगळ्या गोष्टी खासगी आयुष्यातील असोत की व्यावसायिक आयुष्यातील असोत. मला जरा ‘अ‍ॅलर्जी’ होती या गोष्टीची. अर्थात मी कधी याची कारणं शोधायचा प्रयत्नच केला नाही. ‘मला नाही आवडत,’ असा साधा सोपा निष्कर्ष काढून मी मोकळी झाले होते. पण माझ्या या सतत एकटं राहण्याचं कारण मंगेश यांनीच शोधून काढलं आणि माझ्या मनात असलेले अनेक न्यूनगंड माझ्यासमोर येऊन उभे राहिले. मला प्रत्यक्षात जाणवले. माझ्या लक्षात आलं की मला अनेक गोष्टींची भीती वाटते. हळूहळू हे एक एक न्यूनगंड, भीती घालवण्याचं काम मंगेश यांनी केलं. अगदी खरं सांगायचं तर त्यांच्यामुळेच मी मानसिकदृष्टय़ा सक्षम झाले आहे.’’ मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटविण्याऱ्या लीना भागवत हिने स्वत:च्या आयुष्यातील खंबीर आधार असलेला आपला जोडीदार आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांचं महत्त्व सांगताना स्वत:मध्ये घडलेला बदल नेटकेपणानं या शब्दात मांडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘ इतकी वर्षे लीना आणि मी एकत्र आहोत, याचं कारण आम्ही एकमेकांना ‘परफेक्ट मॅच’ आहोत म्हणून नाही तर आम्ही ‘परफेक्ट मिसमॅच’ आहोत म्हणून. आमच्या नात्यात लीना तलवार आहे आणि मी ढाल. ती समोरच्यावर किंवा माझ्यावरही मागचा पुढचा विचार न करता वार करते अनेकदा आणि मी कायम शांत राहून, गोड बोलून बचावाच्या पवित्र्यात ‘प्रॉब्लेम्स सॉल्व्ह’ करण्यावर भर देतो. ती एक उत्तम अभिनेत्री आहे आणि आपल्यातील ‘कले’ नं तिनं जोडलेली माणसं ‘शब्दानं’ तोडू नयेत असं मला सतत वाटतं. खरं तर तिच्या प्रेमात पडायला भाग पाडणाऱ्या महत्त्वाच्या घटकांमधला तिचा स्पष्टवक्तेपणा हा एक मोठा घटक होता.’’ लीनाच्या बाबतीतील महत्त्वाचं मत पुन्हा एकदा आपल्या स्वभावाला अनुसरून मंगेशनं संयतपणे मांडलं.

‘‘हो मंगेश, पण म्हणून माझी अ‍ॅसिडिटी वाढत नाही. माझी चूक नाही तर मी ऐकून घेणार नाही.’’ लीनाचा तेवढय़ात वार झालाच. ‘‘लीनाची हीच आक्रमकता मला आवडते. ती स्वत:ची मतं मांडून मोकळी होते. या बाबतीत मी थोडा भिडस्त आहे.’’ मंगेश सांगतात. ‘‘लीना कधी व्यक्ती म्हणून आवडत गेली तर कधी अभिनेत्री म्हणून. तिचं हे आरपार बोलणं, ठाम असणं, विचारांमधला पारदर्शीपणा तिच्या अभिनयातही डोकावतो आणि अशा वेळी दिग्दर्शक म्हणून मलाही काही गोष्टी वेगळा विचार करायला भाग पाडतात. अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकातील वंदना नगरकर ही व्यक्तिरेखा जेव्हा रिमा साकारत होती तेव्हा ती वेगळी होती, दिग्दर्शक म्हणून मी वेगळा विचार करत होतो, पण जेव्हा लीना करायला लागली तेव्हा माझ्यातील दिग्दर्शकाला तीच भूमिका वेगळी दिसायला लागली.’’

लीना त्याला हसून सहमती दर्शवत म्हणाली, ‘‘मी गमतीनं असं म्हणते की माझा नवरा एक दिग्दर्शक आहे असं नाही तर एक दिग्दर्शक माझा नवरा आहे. ते एक उत्तम दिग्दर्शक आहेत. एखादी संहिता उभी करताना ते ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा मग त्या तांत्रिक असोत वा अभिनयातील असोत विचार करतात त्या खूप वेगळ्या आणि ग्रेट असतात. नवरा-बायकोमधील वाद आमच्यातही होतात, जसं तुम्ही मला वेळ देत नाही, तुम्ही मला फिरायला नेत नाही, तुमचं माझ्यापेक्षा जास्त नाटकावर प्रेम आहे, पण अनेकदा नवऱ्यापेक्षा त्यांच्यातला दिग्दर्शकच वरचढ ठरतो आणि नाटकाला प्राधान्य दिलं जातं. आणि मीही ते स्वीकारते.’’

‘‘हो आणि हे करत असताना लीनामधल्या बायकोपेक्षा तिच्यातील अभिनेत्री माझ्या मदतीला धावून येते.’’ मंगेशच्या या वाक्याला लीनाच्या मोकळ्या-ढाकळ्या हसण्यानेच तिला हे माहीत असण्याची जाणीव करून दिली. यावर मला एक गंमत आठवतेय असं म्हणत मंगेश सांगू लागले. ‘‘एकदा आम्ही सतत नाटकाचे प्रयोग-दौरे, लीनाचं शूटिंग यात व्यस्त होतो तेव्हा ठरवलं की बास झालं आता दोन दिवस सुट्टी घेऊन कुठेतरी फिरायला जायचं. फार लांब नाही तर माथेरान हे ठिकाण नक्की झालं. घरातून निघतानाच आम्ही ठरवलं होतं की हे दोन दिवस फक्त आपल्या दोघांचे. नाटक, स्क्रीप्ट, तारखा, प्रयोग कशावरही बोलायचं नाही. छान गप्पा मारत, गाणी ऐकत प्रवास सुरू झाला. माथेरानला पोचलो. दिवसभर सगळीकडे भटकलो, बोलण्याच्या नादात चुकून जरी नाटकाचा विषय आला तरी लीना मला थांबवत होती. दुसऱ्या दिवशी दुपापर्यंतचा वेळ कसा-बसा गेला आणि लीनाचा उत्साहदेखील थोडासा मावळतोय हे जाणवायला लागलं. नाटकाविषयी बोलायचं नाही, असं ठरवलेलं असतानासुद्धा मी घरातून निघताना बॅगमध्ये एक स्क्रीप्ट टाकलं होतं. धीर करूनच लीनाला म्हणालो की आत्ता जर तुला बाहेर पडायचा कंटाळा आला असेल तर माझ्याकडे स्क्रीप्ट आहे. वाचू या का? वाळवंटात पाणी दिसावं तसा चेहरा करून लीना म्हणाली, ‘प्लीज वाचू या. दिवसभर किती मिळमिळीत गप्पा मारतोय आपण. नाटक वाचू या म्हणजे थोडे तरी वाद होतील, चर्चा होईल. आपण नाही हो राहू शकत नाटकांशिवाय.’’ हा किस्सा सांगून झाल्यावर कितीतरी वेळ दोघेही मनसोक्त हसत होते..

‘‘नाटक ही गोष्ट आम्हाला बांधून ठेवते. नाटकानं आम्हाला एकत्र आणलं, नाटकानेच आम्हाला एकमेकांच्या साथीनं राहायला शिकवलं. नाटकानेच आम्हाला जबाबदारी दिली, आमचं आयुष्य समृद्ध केलं. आज ‘गोष्ट तशी गमतीची’ किंवा ‘के दिल अभी भरा नही’ या नाटकाला येणारे प्रेक्षक आम्हाला येऊन भेटतात आणि आमच्या टय़ूनिंगविषयी भरभरून बोलतात किंवा कौतुक करतात तेव्हा आपल्याला एकत्र बांधून ठेवणारं हे नाटक लोकांना आवडतंय किंवा माझा सह-अभिनेता माझा जिवलग जोडीदार आहे याचा खूप मोठा फायदा होतो.’’

नाटक या विषयावरून गाडी जेव्हा वैयक्तिक आयुष्याकडे वळवली तेव्हा लीना म्हणाली, ‘‘नाटकात आम्ही एकमेकांच्या इतके पूरक असलो तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र फारच भिन्न आहोत. मी खूप वेगळ्या संस्कारात लहानाची मोठी झाले. ब्राह्मण कुटुंबातला जन्म, पूर्ण शाकाहारी सगळं कसं आखीव-रेखीव चौकटीत बसवल्यासारखं.’’

‘‘माझं मात्र अगदी याच्या उलट,’’ मंगेश सांगतात. ‘‘मी सुरुवातीला फार शिस्तीतला नव्हतो. पण लीनामुळे माझ्यात शिस्त आली. तिच्यामुळे आयुष्याला वळण लागलं. पूर्वी मी भविष्याचा फार विचार वगरे करत नव्हतो, किंबहुना असा काही विचार करायचा असतो हेच माहीत नव्हतं, अगदी पशांचंही कसलंही नियोजन नव्हतं. पण लीनाने मला कधी ओरडून, कधी रागावून, कधी तर अगदी अबोला धरून शिस्त लावली. काही वेळा यासाठीच्या तिच्या ओरडण्यातली तीव्रताही माझ्यासाठी आवश्यक होती, कारण स्वछंदी, बेजबाबदारपणातून मला बाहेर काढून स्वत:कडे नव्याने पाहायला शिकवताना तिला कठोर होणं भाग होतं. त्याचा मला फायदाच झाला आणि त्यामुळे आमच्या सहजीवनालाही.’’

‘‘आज माझं आयुष्य एका परिपूर्णतेच्या वेगळ्या वळणावरून वाटचाल करतंय ते लीनाच्या भक्कम आधारामुळेच. कोणत्या गोष्टी एकमेकांसाठी बदलायच्या आणि कोणत्या गोष्टी एकमेकांमधल्या बदलायच्या, हे आम्हा दोघांनाही माहिती आहे; आणि म्हणूनच एकमेकांना समजून घेणं आमच्यासाठी सोपं झालंय.’’

हेच म्हणणं पुढे नेत लीना सांगते, ‘‘वैयक्तिक सण-समारंभ साजरे करण्याची आमची स्वतची एक वेगळी व्याख्या आहे. माझा वाढदिवस, मंगेशचा वाढदिवस किंवा आमचा लग्नाचा वाढदिवस या दिवशी जर शनिवार, रविवार किंवा बँक हॉलिडे असेल तर आम्ही सुट्टी घेत नाही. कारण त्यावेळी नाटय़प्रयोग असतातच असतात. आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस प्रेक्षकांबरोबर साजरा करणं आम्हाला जास्त भावतं. आणि तसा तो आम्ही घालवतोही. अर्थात, इतक्या वर्षांतला एक वाढदिवस मात्र माझ्या चांगलाच लक्षात आहे. आमचा ‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकाचा प्रयोग होता २१ तारखेला, आणि माझा वाढदिवस दुसऱ्या दिवशी २२ तारखेला. आम्ही २१ ला ‘शिवाजी मंदिर’मधला रात्रीचा प्रयोग करून निघालो. गाडीतच मला गाढ झोप लागली होती.. थोडय़ा वेळानं मंगेशनं मला उठवलं, म्हणाले, ‘उतर..’ मला क्षणभर समजेच ना कुठे आलोय ते. आजूबाजूला मस्त लाइट्स, गाडीचा दरवाजा उघडायला पट्टेवाला रुबाबदार माणूस.. काही तरी वेगळं, छान वाटत होतं नक्की. मी मंगेशना विचारलं, ‘आपण कुठे आलोय?’ गाडीतून उतरून पहिलं तर आम्ही ‘ऑर्किड’ च्या दारात होतो. तिथे माझ्यासाठी त्यांनी मिडनाइट बुफे अ‍ॅरेंज केला होता. माझ्या वाढदिवसाचं ते सरप्राइस गिफ्ट होतं. खूपच रोमँटिक. माय गॉड! मंगेश यांच्या अशा रोमँटिक रूपाची मी कधी कल्पनाही केली नव्हती. माझ्यासाठी तो वाढदिवस फारच मस्त ठरला. बरोबर रात्री बारा वाजता त्यांनी मला ‘विश’ केलं. छान सुरुवात झाली वर्षांची.’’

हा किस्सा सांगताना लीना थोडी भावनिक झाल्याचं जाणवत होतं, मंगेश तिच्याकडे बघून हसत सांगू लागले. ‘‘सध्या आम्ही ‘के दिल अभी भरा नाही’ व ‘गोष्ट तशी गमतीची’ या दोन नाटकात एकत्र काम करतोय. तालीम, प्रयोग, दौरे अशा प्रत्येक वेळी आम्ही एकत्र असलो तरी तो वेळ आमच्या व्यस्ततेचाच असतो. पण नवरा-बायको म्हणून आम्ही वेळेची काही गणितं पक्की ठरवली आहेत. काहीही झालं तरी आम्ही सकाळचा चहा एकत्र घेतो. तेव्हा नो फोन कॉल्स, निथग, तो वेळ आम्ही आमच्या स्वतसाठी राखून ठेवलेला आहे. आणखी एक अलिखित नियम आहे आमच्यात तो म्हणजे आमच्यात जर भांडण झालं तर ज्याचं चुकलं असेल त्याने स्वतहून बोलायला जायचं. सॉरी वगरे म्हणायची गरज नाही, बोलायला सुरुवात केली म्हणजेच स्वतची चूक मान्य केली असा याचा अर्थ होतो. आज २३-२४ वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतोय.. संपूर्ण गुण-दोषांसकट आम्ही एकमेकांना स्वीकारलंय. आम्ही एखादी गोष्ट सोयीसाठी जुळवून घेण्याला तडजोड म्हणत नाही त्याला आम्ही प्रेम म्हणतो. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी मनाला मुरड घातली तर ती तडजोड कशी काय?..त्यालाच तर प्रेम म्हणतात ना.’’

‘‘इतकं परिपूर्ण सहजीवन जगत असतानासुद्धा काहीतरी अपेक्षा असतीलच एकमेकांविषयीच्या?’’ असं विचारल्यावर मंगेश म्हणाले, ‘‘लीना खरंतर उत्तम अभिनेत्री आहे. पण तिच्या ताकदीची भूमिका अजून तिच्या वाटय़ाला आलेली नाही, असं मला वाटतं. तिनेही स्वतला पुरेसं शोधलेलं नाही. तिच्यात अभिनयाची खूप वेगळी ताकद आहे, त्याचा तिनेच शोध घ्यायला हवाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्यामध्ये खूप चांगली लेखिका दडलेली आहे. नुकतंच तिनं एक नाटक लिहिलंय. नाव अजून ठरलं नाही; पण व्यावसायिक रंगभूमीवर ते यावं, अशी माझी फार इच्छा आहे. सुरू केलेलं हे लिखाण तिने थांबवू नये तर सतत चालू ठेवायला हवं.’’ तर लीना सांगते, ‘‘मंगेश चांगला अभिनेताही आहे. त्यांनी अभिनयाकडेही जास्त लक्ष द्यायला हवं आत्तापर्यंत ज्या ज्या वेळी त्यांनी नाटकात अभिनय केला तेव्हा तेव्हा त्याचं कौतुक झालं आहे. ‘असा मी असा मी,’ ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे,’ ‘गोष्ट तशी गमतीची’ आणि ‘के दिल अभी भरा नाही’ सारख्या नाटकांतून उत्तम भूमिका केल्या आहेत.. पण दिग्दर्शनाकडे त्यांचा जास्त कल दिसतो. मात्र आता त्यांनी चित्रपट दिग्दर्शनाकडे वळावं, असं मलाच नाही तर त्यांच्या निकटच्या मित्रमंडळींनाही वाटतं.’’

आमचा वैयक्तिक आयुष्यातला आनंद आमच्या व्यावसायिक नात्यावर आणि व्यवसायिक आयुष्यातला आनंद वैयक्तिक नात्यावर अवलंबून आहे. हे सांगत असताना लीना म्हणते, ‘‘आपल्याच व्यावसायिक क्षेत्रातला जोडीदार मला लाभला याचा फार आनंद होतोय. कोणत्याही नवरा-बायकोला आपल्यात तिसरा कुणी आलेला खपत नाही, पण आमच्या बाबतीत हा तिसरा घटकच जास्त महत्त्वाचा आहे. आयुष्याची वाटचाल एकमेकांचा हात धरून चालताना आमचा दुसरा हात नाटकाने घट्ट धरून ठेवलाय. शेवटच्या क्षणापर्यंत रंगभूमीवर कार्यरत राहायचं याशिवाय आता आणखी मागणे काहीच नाही.

– निमा पाटील

nima_patil@hotmail.com

मराठीतील सर्व सर्वार्थाने जोडीदार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The marriage story of leena bhagwat and mangesh kadam
First published on: 04-11-2017 at 00:54 IST