साठीच्या टप्प्यावर एकमेकांविषयी वाटायला हवी अशी मनाची कोवळीक कोमेजून गेलेली असते अनेकदा. खरं तर याच वयात नाही तर नेहमीच जोडीदाराचं आजारपण, नोकरी-व्यवसायात आलेलं अपयश यातून सावरण्यासाठी भक्कम आधाराची आवश्यकता असते. प्रौढ वयात ही गरज पूर्ण करण्याची ताकद तुमच्या जोडीदारात असू शकते. अशा वेळी ‘त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव’ या उक्तीतील सर्व रूपं आपल्याही नकळत आपल्या जोडीदारामध्ये पाहिली जातात. शोधली जातात. असं नातं निर्माण होणं खूप खूप अवघड असलं तरी अशक्य नसतं.. आयुष्याची संध्याछाया गडद होत जाताना तरी नक्कीच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला पाहून डॉक्टर दाणी सरांनी लांबूनच हात केला आणि जोरदार शिट्टी मारली. लांब ढांगा टाकत ते माझ्यापाशी आले आणि माझ्या मैत्रिणीच्या-तनयाच्या गालाला हलकेच स्पर्श करत म्हणाले, ‘‘ही कोण सुंदरी तुझ्याबरोबर आहे?’’ तनयाचा चेहरा कसनुसा झाला. त्यांना काय प्रतिसाद द्यावा मला कळेना. घाईघाईनं ओळख करून देत मी म्हणाले, ‘‘हे माझे इकोनॉमिक्सचे दाणी सर. खूप छान शिकवायचे.’’ माझं वाक्य पूर्ण होईपर्यंत दाणीबाई तिथं पोचल्या.

‘‘कधी कधी इतके भरभर चालतात हे की मी मागेच पडते.’’ त्यांना दम लागल्याचं जाणवत होतं. ‘‘ओळखलंत नं हिला? तुमची आवडती स्टुडंट.’’

‘‘तुझ्या आधी ओळखलं.’’ ते लहान मुलाच्या उत्साहात म्हणाले.

‘‘चला. आमच्या घरी. चहा घेऊया,’’ बाई म्हणाल्या. ‘‘कुणी ओळखीचं भेटलं की, यांना फार बरं वाटतं. घरी खूप कंटाळतात म्हणून रोज पाय मोकळे करायला घेऊन येते.’’ बाई मन:पूर्वक बोलत होत्या. मला त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं. पण तनयानं काही तरी कारण सांगून येण्याचं टाळलं. सर थोडं पुढे गेल्यावर बाई हळू आवाजात म्हणाल्या, ‘‘दोन र्वष झाली यांना अल्झायमर झाला आहे. कधी कधी समोरच्याला ओळखतात, कधी नाही. पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्या आजाराची त्यांना सारखी जाणीव करून द्यायची नाही.’’ त्यांच्या आवाजात डॉक्टरांविषयी वाटणारी आस्था भरून राहिली होती. हाच अनुभव घरी गेल्यावरही आला. त्यांनी आपला संपूर्ण दिनक्रम डॉक्टरांच्या सोयीप्रमाणे आखून घेतल्याचं जाणवलं. स्वत:चं लेखन-वाचन चालू राहावं म्हणून त्या पहाटे चारला उठायच्या. हे सांगताना आपण फार काही करत असल्याचा अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात अजिबात नव्हता. उलट त्यांच्या आवाजातील मार्दव मला स्पर्शून गेलं. या पाश्र्वभूमीवर मला उल्का आणि अरविंद आठवले. आय. टी. क्षेत्रात खूप नाव आणि पैसा कमावलेली जोडी. अतिशय उत्साही. मित्रमैत्रिणी जमा करून पाटर्य़ा आणि ट्रिप्स आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. मध्यंतरी अरविंदला उच्च रक्तदाब, मधुमेह झाल्याचं उल्काकडून कळलं. दोन महिन्यांपूर्वी त्याची अँजिओप्लास्टी झाल्याचं कानावर आलं. त्यानंतर एका पार्टीमध्ये उल्का भेटली. तिच्याकडे अरविंदची चौकशी करताच ती म्हणाली, ‘‘बरा आहे गं तो. ऑफिसलाही जायला लागला. पण आज हेमाकडे पार्टी आहे हे मी त्याला सांगितलं नाही. एक तर त्याला तू येऊ  नको म्हटलं तर ऐकत नाही. आणि आल्यावर पिऊ नको म्हणलं तर त्यावरही कंट्रोल नाही. त्यामुळे एकातून एक वाढत गेलेले आजार. त्याच्यासाठी मी का म्हणून स्वत:ला घरात कोंडून घ्यायचं? मी त्याला काहीबाही थापा मारून बाहेर पडते. मग तो निमूट घरी बसून ऑफिसचं काम करत राहतो किंवा टी.व्ही. बघतो. त्यामुळे त्याचाही वेळ बरा जातो आणि माझाही.’’ असं म्हणून स्वत:चा ग्लास भरायला ती उठली. जोडीदाराच्या आजाराकडे तुच्छतेनं पाहायची तिची वृत्ती मला अस्वस्थ करून गेली.

डॉक्टर दाणी आणि दाणी बाई तसंच अरविंद आणि उल्का या आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या जोडय़ा आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यावर जसा अनेकांच्या कर्तृत्वाला बहर येतो तसंच त्यांच्या बाबत झालं होतं. कारण चाळिशीनंतर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या तुलनेनं कमी झालेल्या असतात. नोकरी-व्यवसायात स्थैर्य आलं असतं. या वयात शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सर्व ताकदीनिशी काम करत असल्यामुळे नव्या जबाबदाऱ्या पेलण्याची उमेद वाढत असते. त्यामुळे आजच्या काळात साठीच नाही तर सत्तरी ओलांडली तरी धडाडीनं काम करण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु एखादा आजार वा नोकरी-व्यवसायात वाटय़ाला आलेलं अपयश याला जोडीदारापैकी एकाला सामोरी जायची वेळ आली तर? तर अशा महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा दुसरा जोडीदार त्याकडे कशा पद्धतीनं बघतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. तिथं मग एकमेकांमधील नात्याचा कस लागतो. उल्का आणि अरविंदला एकमेकांच्या सहवासापेक्षा आयुष्यातील मौज, मजा, मस्ती अधिक प्रिय असावी. त्यामध्ये आलेला अडथळा ते स्वीकारू शकले नाहीत. अरविंदला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडल्यावर आपली जीवनशैली बदलायला पाहिजे याची जाणीव उल्काला झाली नसेल असं नाही. सुरुवातीला तिनं तसा प्रयत्न कदाचित केला असेलही. पण त्या दोघांना अत्यंत आवडत्या आणि सवय होऊन बसलेल्या ‘पार्टी कल्चरला’ दुसरा पर्याय ते दोघंही शोधू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

सुमेधा आणि श्रीकांतची परिस्थिती तर याहूनही अवघड होऊन बसली आहे. श्रीकांत सरकार दरबारी उच्च पदावर काम करणारा सनदी अधिकारी. त्याच्या बरोबर लाल दिव्याच्या गाडीतून हिंडताना मानसन्मान आणि ऐषआराम याचं सुख सुमेधानं पुरेपूर उपभोगलं. नोकरी करताना श्रीकांतनं भरपूर ‘माया’ जमवली. परंतु निवृत्तीच्या आधी काही महिने तो एका प्रकरणात अडकला. चौकशी चक्र त्याच्या मागे लागलं. त्या वेळी सुमेधानं वाल्या कोळ्याच्या बायकोची भूमिका स्वीकारली. श्रीकांत एकटा पडला. आत्मविश्वास गमावून बसला. वाल्याचा वाल्मीकी होण्याची ताकद त्याच्यात नव्हती. सुमेधा घर सोडून गेल्यावर त्याला नैराश्यानं घेरलं. तो आज त्याच्या ऐशी वर्षांच्या आईबरोबर राहत आहे.

आयुष्याच्या उत्तरार्धात अशा काही कारणांमुळे ठेच लागते तेव्हा श्रीकांत-सुमेधासारख्या व्यक्ती आतापर्यंतचं आयुष्य एकमेकांसोबत जगले आहेत हा एक भ्रम वाटायला लागतो. इतक्या वर्षांत आपण मनाने जवळ आलो नाही, आपल्यामध्ये अतूट असे बंध निर्माण झालेले नाहीत हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं नसतं. दोन आयुष्यं एका छपराखाली परंतु समांतर रेषेत व्यतीत झालेली असतात. कदाचित तरुण वयात आयुष्याला आलेला अचाट वेग, अनेक ऐहिक गोष्टी प्राप्त करण्याच्या नादात प्रेम, करुणा, सहवेदना या भावभावनांचा पडत गेलेला विसर, नातेसंबंधांचं झालेलं यांत्रिकीकरण यापायी साठीच्या टप्प्यावर एकमेकांविषयी वाटायला हवी अशी मनाची कोवळीक कोमेजून गेली असते. खरं तर याच वयात नाही तर नेहमीच जोडीदाराचं आजारपण, नोकरीव्यवसायात आलेलं अपयश वा त्याचं चारित्र्यहनन यातून सावरण्यासाठी भक्कम आधाराची आवश्यकता असते. त्याच्या डोळ्यातील पाणी टिपण्यासाठी ममत्वाची गरज असते. प्रौढ वयात ही गरज पूर्ण करण्याची ताकद कुणाचेही आई-वडील, बहीण-भाऊ, मुलंबाळं यांच्यापेक्षाही अधिक तुमच्या जोडीदारात असू शकते. आई-वडील थकलेले असतात. बाकी सर्व जण आपापल्या संसारात गुंतलेले असतात. अशा वेळी ‘त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव’ या उक्तीतील सर्व रूपं आपल्याही नकळत आपल्या जोडीदारामध्ये पाहिली जातात. शोधली जातात. असं नातं निर्माण होणं खूपखूप अवघड असलं तरी अशक्य नसतं. अंजलीला जेव्हा मधुमेह असल्याचं लक्षात आलं तेव्हा सुहासनंही ‘दोघांचा वेगळा चहा कशाला करायचा?’ असं म्हणून स्वत: चहात साखर घेणं बंद करून टाकलं. म्हटलं तर कृती खूप छोटी आहे. पण एकमेकांसाठी आहार-व्यवहारात बदल करायची वृत्ती सुखावणारी आहे. हीच वृत्ती दाणी बाईंच्या वागण्या-बोलण्यातून मला जाणवली. अल्झायमर झालेल्या माणसाबरोबर राहणं, त्याचा आत्मसन्मान जपणं आणि त्याच वेळी स्वत: निराश न होता आपलं काम चालू ठेवणं यासाठी कमालीचा संयम लागतो, मार्दव लागतं आणि तेवढीच आत्मनिष्ठाही; जी दाणी बाईंकडे असल्यामुळे त्या दोघांचं आयुष्य सुकर झालं आहे असं वाटतं. या सगळ्या गोष्टी अकस्मात निर्माण होत नसतात. त्यामागे एकमेकांना समजून घेऊन साथ देण्याची इच्छा असावी लागते. एकमेकांना सांभाळून घेत जगण्याच्या इच्छेमागे वर्षांनुवर्षांची तपश्चर्या असते. लग्न होतं तेव्हा एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभावविभाव यामधील जे फरक जाणवतात ते स्वीकारण्याची मानसिकता असेल तर सुदृढ नातं रुजायला सुरुवात होते आणि पुरेशा सहवासानंतर या फरकांविषयीसुद्धा जेव्हा प्रेम वाटायला लागतं, आदर वाटायला लागतो तेव्हा हे नातं फुलतं. दृढ होतं. परिपक्व होत जातं. अशी परिपक्व व्यक्तिमत्त्वं आयुष्यातील संध्याछाया गडद झाल्या की भले भांबावून जाऊ  शकतात पण एकमेकांची साथ सोडण्याचा विचार मात्र कधीच करत नसतात.

chitale.mrinalini@gmail.com

मराठीतील सर्व शिशिरातला वसंत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article by mrunalini chitale
First published on: 03-12-2016 at 00:45 IST