श्रीधरस्वामींचे, ‘सत्संग अव्यंग असला पाहिजे’ हे  सांगणे महत्त्वाचे आहे. अशा अव्यंग सत्संगासाठी ‘मी’ची जाणीव मागे सरायला हवी, हेही आपण पाहिलं. ‘मी’चा लोप सुरू होण्याचा एक मार्ग म्हणजे नाम. श्रीधरस्वामी हे समर्थ रामदासांचे शिष्य, आणि समर्थानी वर्णिलेला ‘राम’ आकळून घेतलेले साधक. त्यामुळे त्यांच्या ‘मोक्षोपाय’ या रचनेत राम-पदाच्या आसपास तुमचे मन असू द्या, असा उपदेश आहे. ही रचना आठ श्लोकांची, तिचे पहिले तीन श्लोक हे श्रीरामाचे गुणवर्णन करणारे  आहेत. हा राम अहंकारमत्त रावणाला जीवबंधनातून सोडवणारा आहे, पण त्याआधीचा त्याचा वनवास हा वैराग्यात्मक आहे.

साधकांसाठी आणि सत्संग ‘अव्यंग’ हवा म्हणजे कसा हवा हे जाणून घेण्याची आस असलेल्यांसाठी महत्त्वाचे आहेत, ते या ‘मोक्षोपाय’ रचनेचे पुढले सहा श्लोक.  देहजाणीव, समाजातील स्थानाची जाणीव, लिंगजाणीव आणि भवजाणीव यांपासून मुक्त होऊन, ‘मी’चे भवदुख विसरून रामपदापर्यंत गेलेले मन स्थिररूप करायचे आहे. ‘मी’पासून मुक्ती हे साधनामार्गाचे पथ्य श्रीधरस्वामी खुबीने सांगतात. मात्र अखेरच्या श्लोकात, ‘मी सांगितले म्हणून नव्हे, स्वतहून निर्णयपूर्वक चित्त जडवा’ असेही साधकांना ते सुचवतात. विनम्रपणे अनुरोध करावा, अशा सुरातील ही प्रासादिक रचना मुळातून वाचताना तिच्यातील नादमय आर्जव लक्षात राहते. ही मूळ रचना अशी :

मोक्षोपाय

भक्तांचा भवशोक गाढ रजनी नासावया जो रवी ।

भक्तांचा भवमोह नष्ट करुनी ज्याची कृपा ज्ञान वी॥

भक्तां हिंसक दुष्ट दैत्य भव यान्नामेचि जीवा मुके ।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥१॥

जो अज्ञानमदांधदैत्यदमनीं वीराग्रणी कीं असे ।

देवा सोडविता समर्थ प्रभु हा यावीण त्राता नसे॥

देहाहंकृतिमत्तरावण असा ज्या योगि जीवा मुके।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके॥२॥

वैराग्यात्मक द्या सदा मन महारुद्रासि या चेतना।

सीता स्वानुभवात्मिका जननि जैं व्हावी तुम्हां पालना॥

ज्याचा आश्रय लाभतांचि विषयव्यामोह जीवा मुके।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके॥३॥

मी गोरा बहु वा कुरुप मज हें तारुण्य वृद्धाप्य वा ।

मी हा ब्राह्मण क्षत्र वा वणिज वा मी शूद्र आलों भवा॥

श्रीमान् विश्व दरिद्रि स्त्री पुरुष मी हा भाव जीवा मुके।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥४॥

मी थोटा बहिरा मुका असत मी पंगू तसा अंध वा ।

मी हा चंचल धीट भ्याड जड वा विद्वान्सुखी खिन्न वा ॥

मी हा बद्ध विमुक्त शिष्य गुरु वा  हा भाव जीवा मुके।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥५॥

जें सच्चिद्घन दिव्य सौख्य मिति ज्या लाभे न वेदांतरीं ।

जे का वेद वदे स्वरूप असतें तें रामरूपांतरीं ॥

येतां प्रत्यय हा न दु:ख भविचें भिन्नत्व जीवा मुके ।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥६॥

योगायोगिं वसे तनू न कसला त्या पाश विश्वांतरीं ।

ज्यातें ब्रह्मचि मी अखंड असतें रामकृपें अंतरीं ॥

‘मी, हा हें मम’ या न बंध कसला अज्ञान जीवा मुके।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके॥७॥

‘मी मी’ जें निज अंतरीं स्फुरत तें पुर्वील सच्चित्सुखीं।

नेवोनी विलया त्यजूनि अवघें श्रीराम ठेवा मुखीं ॥

संसारीं प्रभुभक्ति धर्म जगवा जीवत्व जीवा मुके ।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥८॥

माझ्या अंतरिं जें असें प्रगटलें तें दाविलें हें असें ।

जाणोनि निजरुपिं चित्त जडवा श्रीराम त्राता वसे ॥

ऐक्यत्वें जरि रामपाद गवसे मायाहि जीवा मुके ।

ठेवा रामपदारविंदिं मन या जन्मासि येणें चुके ॥९॥