पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी वीज कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा प्रकार घडल्याचे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली.

अंगावर वीज कोसळून मृत पावलेल्या १३ जणांपैकी ३ जण नादीया, मुर्शिदाबाद आणि नॉर्थ २४ परगाना जिल्ह्यातील आहेत. तर दक्षिण दीनाजपूर आणि मालदा जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

घराबाहेर आपल्या शेतांमध्ये काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने यातील बहुतांश जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या मोठ्या पावसाची स्थिती अूसन ढगांच्या मोठ्या गडगडाटांसह वीज कोसळण्याच्या अनेक घटना विविध भागात घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

पुरुलिया जिल्ह्यात वीज कोसळून जखमी झालेल्या ४ जणांपैकी दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. अचानक निर्माण झालेल्या या वातावरणातील बदलामुळे राज्यातील अनेक भागात अॅलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हवामान खात्याकडून मोठ्या पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.