मूलतत्त्ववादी इस्लामी गट आणि पोलीस यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत २८ जण ठार झाले असून समाजकंटकांनी मंगळवारी येथे एका रेल्वेगाडीलाच आग लावली. त्यामध्ये गाडीचे दोन डबे जळून खाक झाले. बांगला देशात अद्यापही हिंसाचाराचा उद्रेक सुरूच असून हा घातपाताचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुवर्ण एक्स्प्रेसच्या पाच डब्यांना समाजकंटकांनी आग लावली. त्यामध्ये दोन डबे जळून खाक झाले, सुदैवाने गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने जीवित हानी झाली नाही, असे रेल्वेचे अधिकारी मियाँ जहान यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
हिफाजतच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येत असून त्याच्या निषेधार्थ बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाने उद्यापासून दोन दिवसांच्या सार्वत्रिक बंदची हाक दिली असून जमात-ए-इस्लामी ही मूलतत्त्ववादी संघटना या विरोधी प्रक्षाची प्रमुख सहकारी आहे.
रेल्वे गाडीला आग लावण्याच्या प्रकारामध्ये हिफाजत किंवा विरोधी पक्षांचा हात आहे का, याचा तपास सुरू असल्याचे चितगाँवमधील कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी महिउद्दीन सेलीम यांनी सांगितले. हिफाजत आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत एकूण २८ जण ठार झाले. हाथझरी येथे झालेल्या चकमकीत लष्करातील एका सैनिकासह सात जण ठार झाले.
हिफाजतच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कडक अशा बाप्तिस्मा कायद्याच्या अंमलबजावणीसह अन्य १३ मागण्या केल्या आहेत आणि त्यासाठी सरकारवर मोठय़ा प्रमाणावर दबाव आणण्यात येत आहे.