दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे सहा जवान शहीद झाले. शहिदांमध्ये एका कनिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश आहे. मणिपुरातील चंडेल जिल्ह्य़ात रविवारी दुपारी हा हल्ला झाला. भारत-म्यानमार सीमेलगत हा जिल्हा आहे. गेल्या वर्षी याच जिल्ह्य़ात एनएससीएन या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. भारत आणि म्यानमार यांच्या सीमेलगत असलेल्या चंडेल जिल्ह्य़ातील जौपी हेंगशी या गावानजीक २९ आसाम रायफल्सचे जवान मुख्य तळाकडे परतत असताना दुपारी एकच्या सुमारास दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या वेळी झालेल्या चकमकीत सहा जवान शहीद झाले. हल्लेखोरांच्या शोधासाठी लष्कर व पोलिसांतर्फे मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. दोन किंवा अधिक दहशतवादी गटांनी एकत्र येऊन हा हल्ला केला असावा असा संशय व्यक्त होत आहे. केंद्राकडून गंभीर दखल दरम्यान, मणिपुरातील या दहशतवादी हल्ल्याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना दिले आहेत. हल्ल्याच्या वृत्तानंतर राजनाथ यांनी आसाम रायफल्सच्या महासंचालकांशी परिस्थितीविषयी चर्चा केली.