काँग्रेसने राफेल करारावरुन टीकेची झोड उठवली असतानाच या आरोपांवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. ‘काही स्वार्थी वृत्ती आणि व्यावसायिक स्पर्धकांनी काँग्रेसला चुकीची माहिती देत दिशाभूल केली’, असे अंबानींनी या पत्रात म्हटले आहे.

राफेल युद्ध विमान खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्यांवरून पळ काढत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीने स्थानिक भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली. १४ दिवसआधी स्थापन झालेल्या कंपनीला साहित्य निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. केवळ आपल्या मित्रांना फायदा व्हावा म्हणून देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यात आला, असे काँग्रेसने म्हटले होते.

काँग्रेसच्या आरोपानंतर रिलायन्स धिरुभाई अंबानी समुहाचे अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी प्रत्येक आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. अनिल अंबानी म्हणतात, सर्व आरोप हे निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. हा दुर्दैवी प्रकार आहे. राफेल विमानांची निर्मिती रिलायन्स द्वारे होत नसून सर्व ३६ विमाने फ्रान्समध्येच तयार केले जातील आणि तिथून हे विमान भारतात निर्यात केले जातील, असे त्यांनी सांगितले.
आमची भूमिका फक्त निर्यातीमध्येच आहे, असे त्यांनी नमूद केले. संरक्षण मंत्रालयाकडून रिलायन्स डिफेन्स किंवा रिलायन्स समूहातील कोणत्याही कंपनीला कंत्राट मिळाले नाही, असा खुलासाही त्यांनी केला.