कंपनीने नोकरभरतीही थांबविली

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडियाच्या निर्गुतवणुकीची तयारी सरकारने सुरू केल्यानंतर या कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, तसेच नव्या कर्मचाऱ्यांची भरती करणे थांबवले आहे.

५० हजार कोटी रुपयांहून अधिकच्या कर्जाचे ओझे असलेल्या एअर इंडियाच्या निर्गुतवणुकीची प्रक्रिया सरकार लवकरच सुरू करण्याची अपेक्षा आहे. या प्रक्रियेसाठी या एअरलाइनची १५ जुलैपर्यंतची लेखा पुस्तके (बुक्स ऑफ अकाऊंट्स) बंद करण्यात आली असून, निविदा मागवताना त्याच आकडेवारीचा आधार घेण्यात येणार आहे.

एअर इंडियाच्या भागविक्रीपूर्वी कंपनीत पदोन्नती आणि नवी भरती थांबवण्यात आली आहे, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. एअर इंडियाचे सुमारे १० हजार कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. एअर इंडियाने याबाबत लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. नागरी हवाई वाहतूक सचिव प्रदीप सिंह खरोला यांना याबाबत केलेल्या विचारणेला त्यांनी काही उत्तर दिले नाही.

एअर इंडियाची भागविक्री येत्या ४ ते ५ महिन्यांत पूर्ण करण्याचा सरकार विचार करत आहे. एअर इंडिया सध्या दररोज १५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे.

या राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनीतील ७६ टक्के हिस्सा विकण्याचे प्रयत्न २०१८ साली अपयशी ठरले होते. सरकारने २४ टक्के हिस्सा तसेच संबंधित हक्क स्वत:कडे ठेवणे आणि प्रचंड प्रमाणावरील कर्ज, ही निर्गुतवणूक प्रक्रिया अयशस्वी ठरण्याची कारणे असल्याचे व्यवहार सल्लागार (ट्रँक्शन अ‍ॅडव्हायजर) अर्नेस्ट अँड यंगने त्याच्या अहवालात नमूद केले होते.

एअर इंडियाच्या निर्गुतवणुकीसाठी सरकार बांधील असून, भागविक्रीपूर्वी ही कंपनी परिचालनदृष्टय़ा अधिक सक्षम बनवण्याची योजना आहे, असे नागरी हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी २ जुलै रोजी राज्यसभेत सांगितले होते.