पाकपुरस्कृत दहशतवादावर रविवारी भारताकडून जोरदार प्रहार करण्यात आला. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अनेक कॅम्पवर भारतीय लष्कराकडून जोरदार कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांचे चार कॅम्प उध्वस्त करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक दहशतवाद्यांसह पाकिस्तानचे ६ ते १० सैनिकही यामध्ये मारले गेले आहेत. अद्याप याची अधिकृत माहिती गोळा करण्याचे काम सुरु असून त्यानंतर माध्यमांसमोर याचा खुलासा करण्यात येईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी दिली आहे.

रावत म्हणाले, पीओकेतील अथमुकम, जूरा, कुंदलशाही येथील दहशतवाद्यांचे कॅम्प आम्ही उद्धवस्त केले आहेत. घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तान कशाप्रकारे सैरभैर झाला आहे हे आपण पाहत आहोत. या भागात बर्फ पडण्यास सुरुवात होण्यापूर्वी भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न होत आहे.

काश्मीरमध्ये सध्या शांतता आहे. सफरचंदांच्या व्यवसायासह सर्व व्यवसाय सुरळीत सुरु आहेत. पाकिस्तानकडून काश्मीरमधील हीच शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरची परिस्थिती कशी वाईट आहे हे दाखवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करीत आहे. आम्ही आर्टिलरी गन्सच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या कॅम्पला निशाणा केला आहे, असे लष्करप्रमुख यावेळी म्हणाले.

भारतीय लष्कराच्या या धडक कारवाईबाबत सरकारला माहिती देण्याबाबत त्यांनी सांगितले, आम्ही अशी कोणतीही कारवाई करताना राजकीय नेतृत्वाला माहिती देत असतो. त्यामुळे सरकारचे नेतृत्व पूर्णपणे आमच्यासोबत आहे.