बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला कौल मिळताना दिसत आहे. सध्या एनडीए आणि महाआघाडीत अटीतटीची लढत सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, महाआघाडी काही जागांनी एनडीएच्या पुढे आहे. सुरूवातीच्या कलांवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तेजस्वी यादव यांचं राज्य येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत म्हणाले,”निकाल पूर्ण यायचे आहेत. जे कल पाहिले आहेत. त्यावरून एका तरुण नेत्यानं. त्याने देशाच्या केंद्रीय सत्तेला आव्हान देऊन जी ताकत उभी केली आहे. आता अटीतटीची लढत आहे. मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल. जेव्हा संपूर्ण निकाल हाती येईल, तेव्हा लोकं जंगल राज विसरलेले असतील आणि मंगलराज सुरू झालेलं असेल,” असं संजय राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, बिहारमध्ये सर्वात वेगवान तेजस्वी. तेजस्वींच्या समोर पंतप्रधान, त्यांची फौज, केंद्रीय मंत्रिमंडळ, नितीश कुमार यांचं सरकार. सत्ता, संपत्ती, ताकद संपूर्ण होतं. पण एका मुलानं. एका तरुणानं ज्या पद्धतीनं सगळ्यांसमोर आव्हान उभं केलं. बिहारमध्ये ज्याप्रमाणे तो लढत आहे. मला वाटत हा एक चांगला संकेत आहे. जंगलराजविषयी बोललं जात होतं. १५ वर्षांपासून नितीश कुमार यांचं सरकार होतं. मग कोणतं जंगलराज होतं. मला वाटतं लोक जंगलराज संपवून आज तेजस्वींच्या नेतृत्वात मंगलराज सुरू होईल,” असं संजय राऊत म्हणाले.