मागील काही महिन्यांपासून सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीननं भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आली. सॅटेलाइट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली असून, आता यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचं स्मरण करून देत हल्लाबोल केला आहे.

चीननं अरूणाचल प्रदेशात गावच वसवलं आहे. समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीननं तब्बल १०१ घरं बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीननं हे बांधकाम केल्याचं फोटोतून दिसून येत आहे. या घटनेवर चिंता व्यक्त करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. चीननं अरुणाचलमध्ये गाव वसल्याच्या वृत्ताचा फोटो ट्विट करत “मैं देश झुकने नहीं दूँगा, हे त्यांचं वचन आठवतंय का?,” असा टोला राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला आहे.

आणखी वाचा- चीनचं धाडस वाढलं! अरुणाचलमध्ये वसवलं गाव; सॅटेलाइट फोटोंमधून आलं समोर

सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीननं अरुणाचलमध्ये हे गाव वसवलं असून, हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीननं ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात घरंही बांधल्याचं दिसत आहे. सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीननं कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचं दिसत आहे.