हिंदी जगतातील प्रसिद्ध गीतकार आणि कवी गोपालदास नीरज यांचं गुरूवारी संध्याकाळी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. गुरूवारी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती खालावल्याने गोपालदास नीरज यांना आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने बुधवारी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर गुरूवारी त्यांचं निधन झालं. ४ जानेवारी १९२५ रोजी जन्मलेल्या निरज यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहीट गाणी दिली. १९९१ मध्ये पद्मश्री आणि २००७ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांना तीन वेळेस फिल्म फेअर अवार्डनेही सन्मानित करण्यात आलं होतं.

निरज यांच्या पार्थिवाला आग्रा येथे अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल, तेथून त्यांचं पार्थिव अलीगडमध्ये नेण्यात येईल आणि तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती त्यांचा मुलगा शशांक प्रभाकरने दिली.