जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होता दिसत आहे. देशात दररोज ५० ते ६० हजारांच्या वर करोनाबाधितांची नोंद होत आहे. जगभरातील करोनाबाधितांच्या एकूण मृत्यूंच्या संख्येतही भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतात आतापर्यंत करोनामुळे ६२ हजार ६३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापूर्वी भारतापेक्षा सर्वाधिक मॅक्सिकोत ६२ हजार ५९४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर आतापर्यंत करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझीलमध्ये झाले आहेत.

अमेरिकेत करोनामुळे १ लाख ८५ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे त्या खालोखाल ब्राझीलमध्ये १ लाख १९ हजार जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. भारतात जून महिन्यात अनलॉक प्रक्रिया राबवण्यास सुरूवात झाली. यानंतर करोनाबाधितांच्या एकूण संख्येत आणि करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून आली. भारतात यापूर्वी १० लाख व्यक्तींमागे मृत्यूंची संख्या ही ५ इतकी होती. ती आता १० लाख व्यक्तींमागे ४५ इतकी झाली आहे. तर प्रत्येक १० लाखांमागे रुग्णांची संख्याही आता वाढून २ हजार ५५४ इतकी झाली आहे.

भारतात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ७५ हजारांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. शुक्रवारीही ७७ हजारांपेक्षा अधिक नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. तर दिवसभरात ६५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी करोनावर मात केली. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता वाढून ३४ लाखांच्या वर गेली आहे. देशात करोना चाचण्यांची संख्याही आता मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. देशात आतापर्यंत तब्बल ४ कोटींच्या जवळपास लोकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.