जम्मू-काश्मीरसंदर्भातील कलम ३७० हटवल्याच्या आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरात हिंसाचार घडवून आणण्याच्या तयारी असलेल्या दहशतवाद्यांचा उरी सेक्टरमधून घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. काल रात्री हा प्रकार घडल्याची माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली आहे.

उरी येथील सीमारेषेवरुन पाकपुरस्कृत दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रयत्न करताना पाकिस्तानी रेंजर्सने भारतीय चौक्यांच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. याला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्य सध्या पाकिस्तानकडून होणाऱ्या अशा कुठल्याही संभाव्य धोक्यापासून निपटण्यासाठी हायअॅलर्टवर आहे.

दरम्यान, मंगळवारीच लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते की, सशस्त्र दल पाकिस्तानकडून होणाऱ्या कुठल्याही संभाव्य धोक्यापासून निपटण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे देशाने कोणाच्याही धमक्यांना घाबरण्याची गरज नाही.