राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी रविवारी मुजफ्फरनगरातील दंगलग्रस्तांच्या छावणीला भेट दिली आणि जातीय दंगलीबद्दल भारतीय जनता पक्ष आणि समाजवादी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी आणि ‘आम आदमी पक्षा’चे अरविंद केजरीवाल हे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर फिके आहेत, असे सांगत राहुल स्तुतिपाठ गायला.
प्रसिद्धीमाध्यमांना लालूप्रसाद म्हणाले की, मोदी आणि केजरीवाल यांना तुम्हीच मोठे केले आहे. राहुल गांधी हे राहुल गांधी आहेत. त्यांच्यासमोर दुसऱ्या कोणाचाही प्रभाव पडू शकत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत राजद काँग्रेस पक्षाशी युती करील, असेही ते म्हणाले.
दंगलग्रस्तांनी छावणीतून आपल्या गावी परतावे, असा सल्ला राहुल गांधी यांनी गेल्या आठवडय़ात दिला होता. त्याचे समर्थनही लालूप्रसाद यादव यांनी केले. मी इथे दंगलग्रस्तांचे अश्रू पुसायला आलो आहे. त्यांनी आपल्या घरी परतावे. सरकारने त्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, असेही ते म्हणाले.
आम आदमी पक्ष भ्रष्टाचाराविरोधात बोलत असला तरी हा पक्षच भ्रष्ट आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अमित शहा हे मोदींसाठी समाजात दुही पसरवण्याच्या कामी नेमलेले व्यवस्थापक आहेत, असेही ते म्हणाले. भाजपने उत्तर प्रदेशातील निवडणूक प्रचाराची जबाबदारी अमित शहा यांच्यावर सोपविली तेव्हापासूनच दंगली घडविल्या गेल्या. ते इथले वातावरण दूषित करीत आहेत, असा आरोपही यादव यांनी केला.भाजप हा देशाचा शत्रू आहे आणि आम्ही भाजपचे शत्रू आहोत, असा नाराही त्यांनी दिला.