मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे झालेल्या वादावादीतून प्रियकराने प्रेयसीची गळा चिरला. तिरुवोत्तीयुर भागात रविवारी रात्री ही घटना घडली. व्ही. भारती (२६) असे जखमी तरुणीचे नाव असून ती शाळेत शिक्षिका आहे. आरोपी एस.बालाजी (२८) कांचीपूरम येथे रहातो. तो एका ऑडिट फर्ममध्ये नोकरीला आहे.

बालाजी आणि भारतीचे प्रेमसंबंध आहेत. पण भारतीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध आहे असे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री बालाजी भारतीच्या घरी गेला. तिथे लग्नाच्या विषयावरुन दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापाच्या भरात बालाजीने तिथे ठेवलेला चाकू उचलून भारतीचा गळा कापला व तिथून पळून गेला.

यावेळी भारतीची आजारी आई देखील घरी होती. भारतीचा भाऊ लोगेश नुकताच कामावरुन घरी परतला होता. आईची किंकाळी ऐकून त्याने आतमध्ये धाव घेतली. त्यावेळी बहिणीच्या गळयातून रक्तस्त्राव सुरु होता. त्याने तात्काळ भारतीला नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. या दरम्यान बालाजीने सुद्धा उंदीर मारण्याचे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिरुवोत्तीयुर पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केले. आपण विष पिऊन आल्याचे त्याने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी बालाजी विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.