जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी स्थानिक दहशतवाद्यांचा भूमीपुत्र असा उल्लेख करत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं म्हटलं आहे. पुढे बोलताना त्यांनी जम्मू काश्मीरमधील ‘शस्त्र संस्कृती’ मिटवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेत दहशतवाद्यांशी चर्चा केली पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

‘सध्या पाकिस्तान आणि फुटीरतावाद्यांशी चर्चा होणं गरजेचं आहे. याचप्रमाणे दहशतवाद्यांचं नेतृत्व करणाऱ्यांशीही चर्चा केली पाहिजे कारण त्यांच्याकडे शस्त्र आहेत आणि तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात’, असं मेहबुबा मुफ्ती यांनी अनंतनाग येथे बोलताना सांगितलं. ‘मला वाटतं एका ठराविक वेळेनंतर हुरियत कॉन्फरन्स आणि दहशतवाद्यांशी चर्चा झालीच पाहिजे’, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांना हिंसेच्या मार्गावर जाण्यापासून आपण रोखलं पाहिजे यावर मेहबुबा मुफ्ती यांनी जोर दिला.

‘1996 मध्ये मी राजकारणात प्रवेश केल्यापासून म्हणत आहे की, स्थानिक दहशतवादी भूमीपुत्र असून त्यांना वाचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले गेले पाहिजेत’, असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं. जर चकमक उडाली तर दहशतवादी आणि सुरक्षा जवान एकमेकांच्या समोर येतात आणि अशावेळी कोणी काहीही करु शकत नाही’, असं मेहबुबा मुफ्ती बोलल्या आहेत.

यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी जेएनयू देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी दाखल आरोपपत्राच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा उचलण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर केला जात असल्याचा आरोप केला.