मोठ्या प्रमाणावर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या इराणमधील वेगवेगळया प्रांतांमध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परत आणण्याासाठी केंद्र सरकारने एक योजना तयार केली आहे. त्यानुसार, दोन विशेष विमानं इराणकडे रवाना होणार आहेत. या विमानांमधून तिथं अडकलेल्या भारतीयांना भारतात आणले जाणार आहे. Union Ministry of Civil Aviation Official: As per the Evacuation Plan of Ministry of Civil Aviation, following special flights will operate to evacuate Indians from Iran- 1. From Mumbai on 13th March, 12:30 pm 2. From Delhi on 15th March, 1:40 am #CoronaVirus — ANI (@ANI) March 12, 2020 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या इव्हॅक्युएशन प्लाननुसार दोन विशेष विमानं इराणला पाठवण्यात येणार आहेत. यांपैकी पहिले विमान १३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईतून इराणकडे उड्डाण करेल. त्यानंतर १५ मार्च रोजी पहाटे १.४० मिनिटांनी दुसरे विशेष विमान दिल्लीहून इराणकडे उड्डाण करेल. चीनप्रमाणे इराणलाही करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. इराणमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठी आहे. इराणच्या वेगवेगळया प्रांतामध्ये तब्बल ६ हजार भारतीय अडकून पडले आहेत. लडाख, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह महाराष्ट्रातील जवळपास ११०० यात्रेकरुंचा यामध्ये समावेश आहे. जम्मू-काश्मीरमधील ३०० विद्यार्थी तसेच केरळ, तामिळनाडू आणि गुजरातमधील १००० मच्छीमारांचाही यामध्ये समावेश आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज लोकसभेमध्ये ही माहिती दिली. या सर्वांना परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून, सर्वात आधी यात्रेकरुंकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इराणमधील कोम या ठिकाणी करोना व्हायरची सर्वाधिक लागण झाली असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. दरम्यान, इराणवरुन आतापर्यंत ५२९ नमुने प्राप्त झाले असून त्यातील २९९ निगेटीव्ह आल्याची माहितीही जयशंकर यांनी दिली आहे.