हैदराबादमधील बलात्कार प्रकरण काही दिवसांपासून चर्चेत होते. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी मध्यरात्री ठार करण्यात आले. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी ठार झाले. या चार आरोपींनी प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी घटनास्थळी नेण्यात आले होते. त्या वेळी त्या आरोपींनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पळून न जाण्याचा इशारा दिला होता, पण त्यांनी पळण्याचा प्रयत्न केल्यामुळे नाईलाजाने पोलिसांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्या चकमकीत चारही आरोपी ठार झाले.

या घटनेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. “कधी कधी ‘ठोकशाही’ने मिळालेला न्याय पण योग्य आणि स्वागतार्ह वाटतो.” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चारही आरोपींच्या एन्काऊंटरचं समर्थन केलं आहे.

दरम्यान, हैदराबाद प्रकरणात आरोपी असणारे चार जण पोलीस चकमकीत मारले गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर काहींनी याबाबत संशय व्यक्त केला, पण बहुतांश भारतीयांनी पोलिसांचे कौतुक केले. भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर म्हणाला की न्यायव्यवस्थेत बदल घडणे अपेक्षित आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाने दिलेला निर्णय हा अंतिम असायला हवा. त्या निर्णयावर पुढे कुठेही याचिका करण्याची संधी देण्यात येऊ नये. तसेच मृत्यूदंडाच्या शिक्षेवर दया याचिका करण्याची तरतूद नसावी. हैदराबाद प्रकरणात जर आरोपींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असेल, तर माझा पोलिसांना पाठिंबा आहे.