मोदीजी आणि त्यांच्या सुटाबुटातील मित्रांना तुमच्या जमिनी बळकावायच्या असल्याचे सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते शनिवारी बिहारच्या पश्चिम चंपारण्य भागातील प्रचारसभेत बोलत होते. आगामी निवडणुकांमध्ये बिहारमध्ये भाजपची सत्ता आल्यास तुम्हाला तुमची जमीन आणि उपजिवीकेचे साधन गमवावे लागेल, असे राहुल यांनी उपस्थित जनतेला सांगितले. तुमच्या जमिनीच्या मोबदल्यात ते तुमच्या विकासाची आणि तुम्हाला रोजगार देण्याची भाषा करतात. मात्र, एकदा का तुमच्या जमिनी हातातून गेल्या की तुमच्या उपजिवीकेचे साधनही हिरावले जाईल, असा दावा यावेळी राहुल यांनी केला.
राहुल गांधींची सभा झाली त्याच चंपारण्य भागात महात्मा गांधांनी ब्रिटीश प्रशासकांच्या निळीचे उत्पादन घेण्याच्या जाचक अटींतून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी आंदोलन केले होते. या घटनेचा धागा पकडत राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली. महात्मा गांधींनी शेतकऱ्यांचे नेतृत्व करताना स्वत:च्या सुटाचा त्याग करून धोतर परिधान केले. मोदीदेखील ते चहावाला असल्याचे सांगतात. मात्र, पंतप्रधान झाल्यापासून ते १५ लाखांचा सूट घालायला लागले आहेत. त्यामुळे भाजपप्रणित रालोआ सरकार म्हणजे ‘श्रीमंतांचा क्लब’ बनल्याचे राहुल यांनी म्हटले. धोतर परिधान केलेल्या महात्मा गांधींनी नेहमी मजूर आणि गरीब जनतेत राहून काम करायला आवडायचे. याउलट सुटबूट घालणारे मोदी गरीब आणि पीडितांना कधीच भेटत नाहीत, असे राहुल यांनी म्हटले.