नरेंद्र मोदी यांच्याभोवती असलेल्या भ्रामक समजुतींचे धुके दूर होण्यास सुरूवात झाली आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये झालेली मोदींची भाषणे त्यांना आलेल्या नैराश्याचे निदर्शक असल्याची टीका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव डी. राजा यांनी केली. डी. राजा यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला. भाजपकडून नरेंद्र मोदींभोवती भ्रामक समजुतींचे जे मोहजाल निर्माण करून ठेवण्यात आले होते, ते आता लुप्त होण्यास सुरूवात झाली आहे. बिहार आणि दिल्लीतील जनतेने नाकारल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांनी आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये केलेली भाषणे त्यांची निराशा दाखवून देत असल्याचे राजा यांनी पत्रकारांना सांगितले. मोदी सरकारच्या स्किल इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या योजना फसव्या असून, त्यांचे मूळ धोरण उद्योगधर्जिणे असल्याची टीकाही यावेळी डी. राजा यांनी केली.