दिवसेंदिवस होणारी दरवाढ आणि ढासळणाऱया अर्थव्यवस्थेवरून पंतप्रधानांना लक्ष्य करत भारताला वास्तवतावादी पंतप्रधानाची गरज आहे. अर्थतज्ज्ञाची नाही! असा टोला भारतीय जनता पक्षाचे(भाजप) अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी लगावला. ते म्हणाले, भ्रष्टाचारमुक्त सरकारची भारताला गरज आहे. सध्याच्या वास्तवाला अनुसरून भारत अर्थव्यवस्थेत कसा प्रबळ बनेल? हे उद्दीष्ट साध्य करणाऱया नेतृत्वाची देशाला गरज आहे. “मला पंतप्रधानांच्या आजच्या भाषणात त्यासाठीची प्रबळ इच्छा शक्ती आणि आत्मविश्वास दिसला नाही” असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत सर्व क्षेत्रात भारताच्या होणाऱया घसरणीला यूपीए सरकारला संपुर्णपणे दोषी ठरवत राजनाथ सिंह म्हणाले, जर खरेच देशाला सर्वबाबतीत बळकट करायचे असेल तर, वास्तवाला सामोरे जाऊन उपलब्ध पर्यायांतून लक्ष्य साध्य करण्याची नेतृत्व क्षमता असणाऱया पंतप्रधानाची गरज आहे. असे नेतृत्व भारताला सध्या मिळत नाही आहे. त्यामुळे देशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.