आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये अजब दावे केले आहेत. भगवान राम यांनी ‘अस्त्र’ आणि ‘शस्त्र’चा उपयोग केला तर भगवान विष्णुंनी लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुदर्शन चक्राचा वापर केला, जो आपले लक्ष्य भेदल्यानंतर पुन्हा परत यायचा. यामुळे क्षेपणास्त्रांचे विज्ञान भारतासाठी नवे नाही. हे हजारो वर्षांपूर्वीही उपलब्ध होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच रावणाकडे लंकेत अनेक विमानतळ होते. आपल्या विमानांसाठी तो याचा वापर करत असत, असेही राव यांनी म्हटले आहे.

हिंदु शास्त्रात भगवान विष्णुंच्या ज्या दशावताराचे वर्णन आहे. ते १७ व्या शतकातील ब्रिटिश शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विनच्या विकासवादाच्या सिद्धांतापेक्षा जास्त विकसित असल्याचा दावाही राव यांनी केला आहे. १०६ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये ते बोलत होते.

दशावतार ‘मत्स्य अवतारा’पासून सुरू होतो. जे जलीय प्राणी आहेत. त्यानंतर ‘कूर्म अवतार’ येतो. जो उभयचर प्राणी आहे. ते जल आणि स्थल दोन्ही जागी असतो. तिसरा अवतार हा ‘वराह अवतार’ आहे. ज्यामध्ये विष्णु पृथ्वीला वाचवण्यासाठी वराह बनतात. चौथा अवतार हा ‘नरसिंह’ आहे, जो अर्धा वाघ आणि अर्धा मनुष्य आहे. पाचवा अवतार वामन ‘अवतार’ आहे. जो कमी परिपक्वता असलेला मनुष्य अवतार आहे, असे सांगत ते पुढे म्हणाले, अंतत: ‘राम अवतार’ आहे. जो पूर्णपणे मनुष्य आहे. नंतर कृष्ण अवतार आहे, जो जाणकार, नेता आहे. माझ्या मते कृष्ण राजकारणी होते. पण राम नेता नाहीत. ते विकासवाद आहेत. त्याचबरोबर कौरव हे त्यावेळेचे टेस्ट ट्यूब बेबी होते, असेही त्यांनी म्हटले.