हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाने सगळ्या देशात खळबळ उडाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणही चांगलचं तापलं आहे. यावर योगी सरकारमधील मंत्री अजितसिंह पाल यांनी हाथरस घटनेसंबधी वादग्रस्त विधान केले आहे. हाथरसमध्ये १९ वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार आणि मृत्यू हा किरकोळ मुद्दा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीडित मुलीवर बलात्कार झाला नाही तसेच डॉक्टरांनी आधीच हे स्पष्ट केले आहे असा दावा त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आणखी वाचा- हाथरस पीडितेच्या गावात ३०० पोलिसांची फौज, दोन दिवस कुटुंबाला केलं ‘कैद’; फोन टॅपिंगचा संशय "या प्रकरणात आपण योग्य पाठपुरावा करत आहोत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत असेल तर आम्ही काहीही करू शकत नाही. त्यांच्याकडे टीका करण्यासाठी दुसरा कोणताही मुद्दा नाही त्यामुळे या अशा छोट्या मुद्यांना ते उचलून धरत आहेत. विरोधक फक्त मुद्देच उपस्थित करत आहेत जनहितासाठी काहीही करत नाहीत," असे पाल यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले. आणखी वाचा- “मला कोणीच अडवू शकत नाही”, राहुल गांधींचा पीडितेच्या कुटंबाला भेटण्याचा निर्धार दरम्यान पाल यांनी या घटनेला 'छोटासा मुद्दा' आहे असे सांगताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केल्यावर या प्रकरणाची चौकशी केली जात आहे अशी सारवासारव त्यांनी केली. "हाथरस येथे सामूहिक बलात्कारासारखे काहीही घडले नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. चौकशीत जे काही आढळेल ते सार्वजनिक केले जाईल," असे पाल यांनी सांगितले. उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनीही गुरुवारी वैद्यकीय तपासणीमध्ये बलात्कार झाला नसल्याचे सांगितले होते.