लग्नसोहळ्यात मिठाई वाढण्यावरून राडा झाल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या नवरदेवाने नवरीच्या ९ वर्षाच्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या भावाचं अपहरण करुन गाडीत बसवून पळून जात असताना नवरदेवाच्या गाडीने अन्य तीन महिलांनाही जोरदार धडक दिली. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अन्य दोघांना गंभीर जखमा झाल्या आहेत. उत्तर प्रदेशच्या फर्रुखाबादमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अतसैनी पहाडपूर गावातील रहिवासी मनोज कुमार याची वारात गोविंदपुर अहदुल्लापुर गावात पोहोचली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नवरीचा दुसरा भाऊ पुनीतने (वय १९) सांगितलं की, “नवरदेवाची वारात साडे आठ वाजता आली. आल्यानंतर त्यांना नाश्ता आणि पाणी देण्यात आलं, पण मनोज आणि त्याच्या मित्रांनी जेवणाची व्यवस्था विशेषतः मिठाईवरुन नाराजी जाहीर केली आणि गोंधळ घालायला सुरूवात केली. घरातील मोठ्या लोकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केल्यावर ते अजून चिडले. त्यांनी नवरीच्या मामावर गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने मामा त्यातून कसेबसे बचावले. त्यानंतर गावकऱ्यांनी मनोज आणि त्याच्या मित्रांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पळाले. मात्र पळण्याआधी त्यांनी बंदूकीचा धाक दाखवत माझा लहान भाऊ प्रांशू( वय९ ) याला घेऊन एसयूव्ही गाडीतून पळ काढला. पळून जाताना त्यांनी तीन अन्य महिलांनाही धडक दिली. नंतर आम्ही मनोजला अनेकदा फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याने फोन कट केला. पहाटे तीनच्या सुमारास त्याने माझ्या भावाची हत्या करून त्याचा मृतदेह गावात आणून फेकला आणि पुन्हा पळून गेला”.

दरम्यान, नवरीचे वडील रामपाल जाटव यांनी याप्रकरणी नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.