पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून भारत आणि चीन दोघांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असताना, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी मोदी सरकारला या पार्श्वभूमीवर तीन प्रश्न विचारले असून, भारत सरकारने हे स्पष्ट केलं पाहिजे असं देखील ते म्हणाले आहेत.

१. कैलाश रेंजमधील प्रबळ ठिकाणांहून आपलं सैन्य का काढून घेतलं जात आहे?
२. का आपण आपला प्रदेश देत आहोत आणि फिंगर ४ वरून सैन्य फिंगर ३ वर आणले जात आहे?
३. चीन डेपसांग प्लेन्स आणि गोगरा हॉट स्प्रिंग्सवरून का सैन्य काढत नाही?
हे तीन प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत व त्यांची उत्तर देखील मागितली आहेत.

“पँगाँग टीएसओमधील फिंगर फोर पर्यंत भारताची हद्द आहे. असे असताना, सैन्याला फिंगर तीन पर्यंत जाण्यास का सांगण्यात आले?” असं राहुल गांधींनी विचारलं आहे. तसेच, पंतप्रधान मोदींनी भारताची भूमी चीनला दिली हे स्पष्ट होते असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी डरपोक, चीनचा सामना करु शकले नाहीत – राहुल गांधी

पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला” असा आरोपही राहुल गांधी यांनी केलेला आहे.