सापाने दंश केल्याने भावाचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी गेलेल्या व्यक्तीचाही सापाने दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. झोपेत असताना सापाने त्यांना दंश केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मध्य प्रदेशातील बलरामपूर येथे ही घटना घडली असून, दोन्ही भावांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सर्कल अधिकारी राधे रमन सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय अरविंद मिश्रा यांचा सापाने दंश केल्याने मृत्यू झाला होता. त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा (२२) अंत्यविधीसाठी गावात आला होता. मंगळवारी सापाने दंश केल्याने त्याचंही निधन झालं.

“झोपेत असताना गोविंदला सापाने दंश केला. त्यांचा एक नातेवाईकदेखील त्या खोलीत झोपला होता. त्यालाही सापाने दंश केला,” अशी माहिती सिंग यांनी दिली आहे. गोविंदला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिथे त्याची प्रकृती गंभीर होती असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आहे. स्थानिक आमदार कैलाश शुक्ला यांनी कुटुंबाची भेट घेतली असून, मदतीचं आश्वासन दिलं आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.