काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ल्याला एक महिना पूर्ण झाला आहे. मागच्या महिन्यात आजच्याच तारखेला म्हणजेच २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांना ठार केलं. धर्म विचारुन पर्यटकांना ठार मारण्यात आलं. या घटनेत २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध NIA कडून घेतला जातो आहे.
भारत आणि पाकिस्तानमधला संघर्ष वाढला
पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध संपूर्ण जगाने केला. तसंच या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचं समजल्यानंतर पाकिस्तानवरही जगभरातून टीका झाली. भारताने या हल्ल्याचं उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी होत होती. ज्यानंतर ६ आणि ७ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं. एकूण ९ ठिकाणी एअरस्ट्राईक करत आणि सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्ताना उत्तर दिलं. दरम्यान पहलगाम हल्ल्यामागे असलेले दहशतवादी हे अद्यापही सापडलेले नाहीत.
पहलगाम हल्ल्यामागे पाच दहशतवादी
पहलगाम येथील हल्ल्यामागे पाच दहशतवादी होते. ज्यात पाकिस्तानच्या तीन जणांचा समावेश आहे. या सगळ्यांची रेखाचित्रं पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी जारी केली आहेत. या दहशतवाद्यांवर २० लाख रुपयांचं इनामही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र अद्यापही दहशतवादी सापडलेले नाहीत. या प्रकरणात आत्तापर्यंत १५० हून जास्त स्थानिकांकडे चौकशी करण्यात आली आहे. ज्यांच्यात खेचर चालक, दुकानदार, फोटोग्राफर्स या सगळ्यांचा समावेश आहे.
१५ दिवस आधी ज्याने दुकान सुरु केलं त्याचीही कसून चौकशी
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवस आधी एका दुकानदाराने दुकान सुरु केलं होतं त्याचीही चौकशी एनआयएने केली आहे. हल्ला झाला तेव्हा या दुकानदाराचं दुकान बंद होतं. मात्र या दुकानदाराच्या विरोधात ठोस काहीही आढळून आलं नाही असंही एनआयने म्हटलं आहे. मोठ्या प्रमाणावर मोबाइल डेटा, व्हिडीओ आणि फोटो तपासण्यात आले आहेत. जे पर्यटक पहलगाममध्ये होते त्यांच्या नातेवाईकांनी काढलेले फोटो आणि व्हिडीओही एनआयएकडून तपासण्यात आले आहेत.
शेकडो लोकांची चौकशी, दहशतवाद्यांचा शोध अद्यापही सुरुच
पहलगाम हल्ल्यानंतर तिथले पोलीस, सुरक्षा दलं सक्रिय झाली आहेत. त्यांनी शेकडो जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. दहशतवाद्यांचा काही सुगावा लागतो का? याची माहिती घेतली आहे. दोन उद्दीष्टं समोर ठेवून आम्ही काम करत आहोत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेणं आणि ज्यांना हिंसा करायची आहे त्यांना एक स्ट्राँग मेसेज देणं की आम्ही यापुढे असले हल्ले सहन करणार नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.