दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगात त्यांची प्रकृती खालावली असल्याचं आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी सांगितलं आहे. आपमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केल्यापासून आतापर्यंत त्यांचं साडेचार किलो वजन घटलं आहे. केजरीवाल यांचं वजन घटत असल्यामुळे आप नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं आहे की, केजरीवाल यांची प्रकृती उत्तम आहे. येथील डॉक्टरांनीदेखील केजरीवालांच्या तब्येतीबाबत कोणतीही चिंता व्यक्त केलेली नाही.

आम आदमी पार्टीने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाची गंभीर समस्या आहे. त्यांची प्रकृती ठीक नसूनही ते २४ तास देशाची सेवा करत असतात. अटकेनंतर त्यांचं ४.५ किलो वजन घटलं आहे. भाजपाने त्यांचं आरोग्य अधिक धोक्यात आणलं आहे. अरविंद केजरीवाल यांना काही झालं तर भाजपाला आपला देशच नव्हे तर देवही माफ करणार नाही.

हे ही वाचा >> उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल

दिल्लीच्या मंत्री आतिशी म्हणाल्या अरविंद केजरीवाल यांना मधुमेहाची गंभीर समस्या आहे. पंरतु, त्यांनी कधी त्यांच्या आरोग्याच्या समस्यांना देशसेवेमध्ये अडथळा बनू दिलं नाही. भाजपा सरकारने त्यांना अटक केल्यापासून त्यांची प्रकृती ढासळली आहे. ईडीच्या कोठडीत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी तीन वेळा घसरली आहे. अटकेपासून १२ दिवसांत त्यांचं वजन ४.५ किलोने घटलं आहे. मधुमेहग्रस्त व्यक्तीचं वजन अशा पद्धतीने इतक्या वेगाने घसरणं खूप गंभीर बाब मानली जाते. त्यांच्यासमोर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. केजरीवाल यांना बरबाद करण्यासाठी भाजपा खालच्या स्तरावर जात आहे. त्यामुळे मी भाजपाला इशारा देतेय की संपूर्ण देश तुमची दडपशाही पाहतोय. केजरीवाल यांना काही झालं तर हा देश तुम्हाला माफ करणार नाहीच, तसेच ईश्वरही तुम्हाला माफ करणार नाही.