केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली असून या मुलाखतीत यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूक, पीएफआय संबंध, संसदेचे अधिवेशन, अंतर्गत सुरक्षा, २०२४ च्या लोकसभा निवडणुका आणि सध्या गाजत असलेल्या अदाणी समूहाच्या विषयावर भाष्य केले. त्रिपुरा विधानसभेसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्रिपुरामध्ये यावेळी आम्ही विक्रम प्रस्थापित करु आणि मोठा विजय मिळवू, असेही त्यांनी सांगितले. तसेच हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदाणी समूहाबाबत दिलेल्या अहवालानंतर जो गदारोळ झाला, त्यावर बोलत असताना अमित शाहा म्हणाले की, “आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही.”

अदाणी प्रकरणावरुन काँग्रेसने देशभर आक्रमक आंदोलन केले. एलआयसी कार्यालयाबाहेर आंदोलने करण्यात आली आहेत. हिंडेनबर्ग अहवाल आणि अदाणी समूहाच्या वादाबाबत बोलताना अमित शाहा म्हणाले, “या प्रकरणात प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होत आहे. मात्र या प्रकरणात भाजपाला लपविण्यासारखे काहीच नाही. तसेच या मुद्द्यावरुन भाजपाला घाबरण्याची देखील गरज नाही.”

हे वाचा >> “शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर…” पहाटेचा शपथविधी आणि फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊत यांचं मोठं विधान

सत्य लपू शकत नाही

यावेळी अमित शाहांना बीबीसी डॉक्युमेंट्रीवरुन विरोधकांनी केलेल्या आरोपाबाबतही विचारण्यात आले. त्यावर शाह म्हणाले, विरोधक काहीही म्हणत असले तरी सत्य लपू शकत नाही. सत्यावर कोणतंही षडयंत्र रचलं तरी ते सुर्यासारखे तळपून बाहेर येतंच. विरोधक २००२ पासून मोदींवर हल्ला करत आहेत. तरिही पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम मिळाले आहे. प्रत्येक वेळी मोदी हे आणखी बळकट होत गेले आहेत.

प्रत्येक गोष्टीची मार्केटिंग कशासाठी?

भाजपाच्या जाहीरातबाजीवरही यावेळी प्रश्न विचारण्यात आला. भाजपा प्रत्येक गोष्टीचा इतका गाजावाजा का करत असते? यावर शाह म्हणाले की, जर एखादे प्रॉडक्ट चांगले आहे. तर त्याचा गाजावाजा करुन जाहीरात केली पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य देश आणि संपूर्ण जगासमोर ठेवले गेले पाहीजे. हा पूर्ण भारताचा गौरव आहे.

राहुल गांधींच्या व्यक्तिमत्त्वाला भाजपा घाबरतो?

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्वात कमालीचा बदल झालेला आहे. त्यांची शैली आक्रमक झाली आहे. या नव्या रुपाला भाजपा घाबरतो का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. तेव्हा शाह म्हणाले, हा त्यांचा विचार असेल. मात्र मला नाही वाटत की, जनतेला असे वाटत असेल.