पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपाने आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये रविवारी भाजपाचा झंझावात दिसून आला. बंगालच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रोड शो केला. त्यावेळी त्यांच्या रोड शो ला मोठ्या प्रमाणात लोकं उपस्थित होते. त्यावेळी असा रोड शो आपण यापूर्वी कधी पाहिला नाही, लोकांना आता परिवर्तन हवंय, असं मत त्यांनी व्यक्त त्यावेळी केलं. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजपाला एकदा संधी द्या आम्ही सोनार बांगला बनवू असं म्हणत भाजपाचा विजय झाल्यास बंगालच्या मातीतलाच मुख्यमंत्री आम्ही देऊ, असं आश्वासनही दिलं.

“काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर ज्याप्रकारे हल्ला केला त्याचा भाजपा निषेध करते. तसंच मी वैयक्तिकरित्याही त्याचा निषेध करतो. हिंसाचाराचं उत्तर लोकशाही पद्धतीनं देणार असल्याचं आमच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही त्यांचा पराभव करून दाखवू. जर भाजपाचा विजय झाला तर पुढील मुख्यमंत्री हा पश्चिम बंगालच्या मातीतलाच असेल,” असंही शाह म्हणाले.

“अशाप्रकारच्या कोणत्याही हल्ल्यांमुले भाजापाची गती मंदावेल किंवा भाजपा कार्यकर्ते थांबतील या भ्रमात तृणमूल काँग्रेसनं राहू नये. तुम्ही जेवढं हिंसक वातावरण त्या ठिकाणी तयार कराल तेवढंच भाजपा आणखी योग्यप्रकारे बंगालमध्ये स्वत:ची स्थिती मजबूत करण्याचं काम करेल. हिंसाचाराला आम्ही लोकशाहीच्या पद्धतीनं उत्तर देऊ आणि येणाऱ्या निवडणुकांध्येही उत्तर देऊ,” असं ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ३०० पेक्षा अधिक भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणांच्या तपासातही कोणती प्रगती दिसत नाही. भ्रष्टाचारही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीबांसाठी जे पैसे दिले ते सर्व गायब झाले. सीएजी ऑडिट विरोधात सर्वोच्च न्यायालयात का धाव घेतली जात आहे. भ्रष्टाचार झालाय म्हणूनच पळवाट शोधली जात आहे. आपल्याच माणसांनी तो भ्रष्टाचार केलामुळे त्यांना पकडण्याची हिंमतही होत नसल्याचं ते म्हणाले.

टीएमसी आणि काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सुवेंदु अधिकारी यांनीही भाजपात प्रवेश केला आहे. मी त्यांचं स्वागत करतो. अन्यायाच्या विरोधात ज्यांना आवाज उठवायचा आहे त्यांनी भाजपात यावं. काल आमचे सर्व पोस्टर्स फाडण्यात आले. परंतु आज मोठ्या प्रमाणात लोकं जमली. मी लोकांचा आभारी आहे,” असंही शाह म्हणाले.