बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा जामीन रद्द करण्याबाबत सीबीआयने दिल्ली न्यायालयात धाव घेतली आहे. आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी आयोजित एका पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तेजस्वी यादव यांनी धमकावल्याचा आरोप करत सीबीआयने न्यायालयाकडे ही मागणी केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली आहे.

“भाजपाच्या नेत्यांवर छापे का नाही, ते काय दुधाने…”; तेजस्वी यादवांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर

रांची आणि ओडिशाच्या पुरीमधील आयआरसीटीसीच्या हॉटेल्सचे कंत्राट २००६ साली एका खाजगी कंपनीला देण्यात आले होते. याप्रकरणी झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. “सीबीआयच्या अधिकाऱ्यांना आई किंवा मुले नाहीत का? त्यांना कुटुंब नाही का? ते नेहमीच सीबीआय अधिकारी राहतील का?” असे विविध प्रश्न तेजस्वी यादव यांनी गेल्या महिन्यात पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत विचारले होते. हा तपास अधिकाऱ्यांना धमकवण्याचा प्रकार असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

पंजाबमध्ये भाजपाला मिळणार ‘शीख’ चेहरा; माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग करणार भाजपात पक्षप्रवेश

राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांच्या निवासस्थानावर नोकरी घोटाळ्याप्रकरणी गेल्या महिन्यात सीबीआयने छापेमारी केली होती. यूपीए सरकारच्या काळात लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना झालेल्या या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तेजस्वी यादव यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर टीप्पणी केली होती. केंद्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या नेत्यांवर का छापे मारत नाही. ते काय दूधाने धुतलेले आहे का?, असा सवाल तेजस्वी यादव यांनी उपस्थित केला होता.