गंगा नदीच्या किनाऱ्यावरील अदालतघाट येथे छटपूजेप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीस व्यवस्थेतील ढिसाळपणाच कारणीभूत असल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. या चेंगराचेंगरीत १७ जण ठार झाले होते. प्रशासनाने योग्य व्यवस्था न केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा ठपकाही भाविकांनी ठेवला.
अदालतघाटावरील छटपूजेसाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने पुरेशी व्यवस्था केलेली नव्हती. या घाटावर यापूर्वी अशा प्रकारची दुर्घटना कधीही घडली नव्हती, असे प्रेमकुमार या भाविकाने सांगितले तर अदालतघाट आणि बाहेरच्या मुख्य रस्त्यामध्ये असलेली अरुंद गल्लीच या चेंगराचेंगरीस कारणीभूत ठरली, असे भोजपूर जिल्ह्य़ातून आलेल्या जयप्रकाश भारती यांनी सांगितले.
भविष्यात असे प्रकार टाळायचे असतील तर त्या गल्लीचे रुंदीकरण तातडीने केले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. पाटण्याच्या बाहेरील भाविकांनी घाटावर न येता अन्यत्र अध्र्यदान केल्यामुळे मंगळवारी सकाळी नेहमीची गर्दी जाणवली नाही. अन्य ज्येष्ठ महिला नीतादेवी यांनी अदालतघाट परिसरातील मोठय़ा गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोप केला. या भागातील एका अरुंद पुलास आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे महिला आणि लहान मुलांनी आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावण्यास सुरूवात केल्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे प्रामुख्याने महिला व मुले मृत्यूमुखी पडली. अर्थात नंतर आगीची अफवा असल्याचेच उघडकीस आले.