उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

करोना साथीच्या काळात पाळावयाच्या नियमांचा भंग, सुरक्षात्मक उपायांचा अभाव व वर्षभराच्या साथीमुळे आलेला ताणतणाव या तीन कारणांमुळे अलीकडच्या काळात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगण्यात आले.

६ ते १४ एप्रिलदरम्यान मुखपट्टीचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांबाबत सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले असून महाराष्ट्र, पंजाब व छत्तीसगड या कोविड रुग्णांची जास्त संख्या असलेल्या राज्यांत केंद्राची पथके पाठवण्यात येणार आहेत, त्यात वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार असून व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची उपलब्धता, वेगाने चाचण्या व लसीकरण, खाटांची संख्या वाढवणे या उपायांचाही अवलंब करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सामूहिक जबाबदारीचे पालन करोनाचा सामना करण्यासाठी गरजेचे आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. चाचण्या, संपर्क शोध, उपचार, कोविड प्रतिबंधक वर्तन, लसीकरण या पाच कलमी उपायांचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

देशात करोनाची साथ वेगाने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यात लसीकरण, वाढता संसर्ग या मुद्दय़ांवर चर्चा करण्यात आली. कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, आरोग्य सचिव हे बैठकीस उपस्थित होते. गेल्या २४ तासांत देशात कोविड रुग्णांची दैनंदिन वाढ सप्टेंबर मध्यानंतर प्रथमच मोठय़ा प्रमाणात झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात ९३२४९ इतके रुग्ण सापडले असून एकूण संख्या १.२४ कोटी झाली आहे. १९ सप्टेंबरनंतर ही सर्वात मोठी संख्या असून सप्टेंबरमध्ये ९३३३७ इतकी रुग्णसंख्या होती. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे,की आठ राज्यातील प्रमाण एकूण संख्येच्या ८१.४२ टक्के आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशात जास्त रुग्णवाढ झाली आहे.

केंद्राने राज्यांना यापूर्वीच गर्दी टाळण्यापासून इतर प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना केल्या असून त्यात मुखपट्टीचा वापर, सामाजिक अंतर हे उपाय सुचवण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यातील ढिलाईमुळे रुग्णवाढ झाल्याचे सांगण्यात आले. विषाणूमध्ये झालेल्या उत्परिवर्तनामुळे रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान केंद्राचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी याआधी असे म्हटले होते, की विषाणूच्या उत्परिवर्तनाचा रुग्णवाढीशी कमी संबंध आहे. आता त्यांनी असे म्हटले आहे, की प्रतिबंधित क्षेत्रे वाढवणे, काही भागांत टाळेबंदी, करोना चाचण्या करणे व संसर्ग असलेल्यांनी विलगीकरणात राहाणे महत्त्वाचे आहे.

विषाणूची जनुकीय क्रमवारी वाढवण्याची गरज असून माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. विशिष्ट भागात करोनाची वाढ जास्त का आहे हे माहितीची तुलना करून ठरवता येईल असे त्यांनी सांगितले.

गेल्या २४ तासांत देशात ९३२४९ रुग्ण सापडले असून एकूण संख्या १.२४ कोटी झाली आहे. १९ सप्टेंबरनंतर ही सर्वात मोठी संख्या असून सप्टेंबरमध्ये ९३३३७ इतकी रुग्णसंख्या होती.  महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पंजाब व मध्य प्रदेशात जास्त रुग्णवाढ झाली आहे.