केरळ येथे होम क्वारंटाइन असणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याने घरातून पळ काढला असल्याचं समोर आलं आहे. १८ मार्चपासून हा अधिकारी सरकारी निवासस्थानी होम क्वारंटाइमध्ये होता. अधिकाऱ्याने घरातून पळ काढत उत्तर प्रदेशातील आपलं गाव गाठलं. कोल्लम येथे उप-जिल्हाधिकारी पदावर असणाऱ्या अनुपम मिश्रा यांच्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून कठोर कारवाई केली जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अनुपम मिश्रा हे कोल्लम जिल्ह्यात उप-जिल्हाधिकारी पदावर होते. सुट्टीवरुन आल्यानंतर १८ मार्च रोजी ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. अनुपम मिश्रा परदेशातून प्रवास करुन आले असल्याने जिल्हाधिकारी अब्दुल नजीर यांनी त्यांना सरकारी निवासस्थानी विलगीकरणात राहण्याचा आदेश दिला होता.

आणखी वाचा- धक्कादायक! करोनामुळे मृत्यू होण्यापूर्वी रुग्णाने घेतली १०० जणांची भेट, २३ जणांना लागण; १०० गावं सील

विलगीकरणात असणाऱ्यांची आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडून रोज पाहणी केली जाते. यावेळी अनुपम मिश्रा हे घऱात नसल्याचं लक्षात आलं अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. “तपास केला असता अनुपम मिश्रा उत्तर प्रदेशात असल्याचं समोर आलं. कोणालाही कोणतीही माहिती न देता ते गेले होते. हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारडे यासंबंधी अहवाल सोपवला जाणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.

आणखी वाचा- अरेरे! करोना झाल्याच्या भीतीनं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचा रिपोर्ट आला निगेटिव्ह

दरम्यान केरळमधील अधिकारी उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. सरकारने लॉकडाउन जाहीर केला असतानाही त्यांनी राज्याबाहेर प्रवास कसा केला याची माहिती मिळवली जात आहे. दरम्यान अनुपम मिश्रा यांच्या संपर्कात आल्याने त्यांचे सुरक्षारक्षक आणि इतरांना विलगीकरणात जाण्यास सांगण्यात आलं आहे.