दिल्लीतल्या कंझावाला भागात १ जानेवरीची पहाट उजाडली तिच एक भयंकर बातमी घेऊन. एका तरूणीचा मृतदेह विवस्त्र आणि छिनविछिन्न अवस्थेत सापडला. अंजली सिंह असं या मुलीचंनाव होतं. ३१ डिसेंबरच्या रात्री ती घरातून बाहेर पडली होती मात्र ती घरी परतलीच नाही. अंजली टू व्हिलरवर असताना कारने तिला धडक दिली. तसंच तिला सुमारे १३ किमी फरपटत नेलं. अंजलीच्या अपघाती मृत्यूला नऊ दिवस पूर्ण अंजलीच्या या महाभयंकर अपघाती मृत्यूला नऊ दिवस पूर्ण झाले आहेत. तरीही अजून पोलिसांना नऊ प्रश्नांची उत्तरं मिळायची आहेत. कंझावाला मध्ये घडलेलं हे प्रकरण सुटण्याऐवजी त्याचा गुंता वाढतच जातो आहे. अंजलीच्या कुटुंबाने पोलिसांच्या कारवईवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. तर दिल्लीच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली. अंजलीच्या मृत्यू प्रकरणात नऊ दिवसांपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकलेले नाहीत. अपघातात मृत्यू झालेली अंजली १) आरोपींबाबत संशय अंजली सिंहच्या मृत्यू प्रकरणात सर्वात मोठा संशय आरोपींवर आहे. अपघात झाला तेव्हा अंजलीला धडक देणाऱ्या कारमध्ये पाच जण होते. हे आरोपी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्ण आणि मिथुन हे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंजलीला जेव्हा कारने धडक दिली आणि तिला फरपटत नेलं जात होतं तेव्हा दीपकला कारखाली काहीतरी आलं आहे याची कल्पना आली होती. पोलिसांनी हे सांगितलं की कार दीपक चालवत होता. मात्र हे सांगितल्यावर तीन दिवसात पोलिसांची सगळी थिअरी बदलली. पोलिसांनी सांगितलं कारमध्ये पाच नाही तर चारच आरोपी होते. कार दीपक नाही तर अमित चालवत होता. एवढंच काय पोलिसांनी हेपण सांगितलं की जेव्हा हा अपघात झाला तेव्हा दीपक त्याच्या घरी होता. या प्रकरणातले आणखी दोन आरोपी आहेत ज्यांची नावं अंकुष आणि आशुतोष आहेत. अंकुश आणि आशुतोषने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दीपक कार चालवत होता अशी माहिती दिली. तर दीपकला सांगितलं की आमच्याकडे कार लायसन्स नाही म्हणून आम्ही तुझं नाव सांगितलं. २) निधीने नेमकं काय केलं? ते अद्यापही अनुत्तरीत अंजलीची मैत्रीण आणि या प्रकरणातली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली निधीन ही अंजलीची मैत्रीण संशयाच्या घेऱ्यात आहे. निधीने पोलिसांना सांगितलं की अंजली नशेत होती. आम्ही दोघीही पार्टी करून रात्री १.४५ ला हॉटेलमधून निघालो होतो. अंजली स्कुटी चालवत असतानाच कारची धडक लागली. या दरम्यान मी एका बाजूला पडले आणि अंजली कारच्या बाजूला. यानंतर अंजलीचा पाय कारमध्ये अडकला. कार तिला फरपटत पुढे नेलं. या सगळ्या प्रकारामुळे मी घाबरले आणि घरी निघून आले असं निधीने पोलिसांना सांगितलं आहे. निधीने दिलेल्या माहितीनुसार हे सगळं आपण आपल्या आईलाही सांगितलं होतं. मात्र अंजलीचे कुटुंबीय सातत्याने निधीची चौकशी करा कारण ती खोटं बोलते आहे असं म्हटलं आहे. ३) निधी आणि अंजलीमध्ये भांडण कशावरून झालं? निधी आणि अंजली या दोघींमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री भांडण झालं होतं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की या दोघींची हाणामारी झाली होती. या ठिकाणी अंजलीचा मित्र उपस्थित होता. त्यानेच ही माहिती पोलिसांना दिली. निधी अंजलीकडे तिचे पैसे मागत होती आणि त्यावरूनच या दोघींचं भांडण झालं. पोलिसांनी यानंतर अंजली आणि निधी या दोघींचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत अशीही मागणी झाली आहे. तर अंजलीच्या कुटुंबीयांनीही निधीची चौकशी झाली पाहिजे ही मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनीही हा प्रश्न उपस्थित केला आहे तसंच तुम्ही निधीचा फोन अद्याप जप्त का केला नाही असाही प्रश्न स्वाती मलिवाल यांनी पोलिसांना विचारला आहे. दिल्लीत कंझावला भागात अपघाताची भीषण घटना १ जानेवारीला उघडकीस आली. ( फोटो सौजन्य-ट्विटर)) ४) अंजलीच्या मृत्यूचं ड्रग्ज कनेक्शन? निधीच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी जीआरपींनी २ वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये निधीला ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. तिच्यासोबत इतर दोन मुलांनाही अटक केली होती. निधीला एक महिना तुरुंगात रहावं लागलं होतं. त्यानंतर तिला जामीन मिळाला. अशात आता प्रश्न हा उपस्थित राहतो आहे की या अपघाताचं काही ड्रग्ज कनेक्शन तर नाही ना ? ५) निधी आरोपींना आधीपासून ओळखत होती? दिल्ली पोलिसांनी आपल्या मागच्या पत्रकार परिषदेत हे म्हटलं होतं की या प्रकरणातले जे आरोपी आहेत त्यांच्यात आणि अंजली, निधी यांच्यात काहीतरी कनेक्शन मिळालेलं नाही. अशात दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी असं म्हटलं आहे की निधीवर जो गांजा तस्करीचा आरोप लागला होता. त्यात इतर जी दोन मुलं होती त्यापैकी एकाचं नाव दीपक होतं. आत्ताही एका दीपकचं नाव समोर आलं आहे हे दोन्ही दीपक एकच तर नाहीत ना? निधी आरोपींना ओळखत होती का? हे प्रश्न त्यांनी उपस्थित केलं आहे. ६) सातव्या आरोपीला तातडीने जामीन का? अंजली सिंहच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अंकुश हा सातवा आरोपी अटकेता होता. पण त्याला तातडीने जामीन मिळाला. अंकुशवर पोलिसांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. तरीही त्याला खूप तातडीने जामीन मंजूर झाला. अशात पोलिसांनी हे सगळं प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही का? हा प्रश्न उपस्थित होतो आहे. हेपण वाचा -Delhi Accident : “अंजली कारखाली असल्याची माहिती होती, पण…”, पोलीस तपासात आरोपींचा धक्कादायक खुलासा ७) कट रचून अंजलीची हत्या करण्यात आली का? अंजलीचा अपघाती मृत्यू होऊन नऊ दिवस उलटले आहेत. दिल्ली पोलिसांची १८ पथकं या प्रकरणावर काम करत आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की त्यांनी या प्रकरणातला प्रत्येक पैलू तपासून पाहात तपास सुरू केला आहे. अंजलीचा मृत्यू अपघातात झाला असं पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र रोज जे नवनवे खुलासे होत आहेत त्यावरून हा प्रश्न निर्माण होतो आहे की अंजलीला ठार करण्यासाठी कट आखला गेला होता का? ८) दिल्ली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? ३१ डिसेंबरच्या रात्री दिल्ली पोलिसांच्या नऊ पीसीआर व्हॅन सुरक्षेच्या दृष्टीने गस्त घालत होत्या. दिल्ली पोलिसांनी तशी नोंद त्यांच्या नोंदवहीत केली आहे. अशात १२-१३ किमी एका मुलीला फरपटत नेलं जातं तर ही सुरक्षा व्यवस्था तेव्हा नेमकी कुठे असते असा प्रश्न सगळ्याच दिल्लीकरांना पडला आहे. ९) कलम ३०२ अद्याप का लावण्यात आलेलं नाही? अंजलीचा मृत्यू हा अपघाती आहे की तो ठरवून केलेला खून आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र पोलिसांनी सुरूवातीपासून हा दावा केला आहे की अंजलीचा मृतदेह कारमध्ये अडकला आहे हे कुणालाही समजलेलं नाही. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कलम ३०४ लावलं होतं. मात्र नंतर आरोपींना अटक करण्यात आल्यावर आणि त्यांची कसून चौकशी केल्यावर पोलिसांना हे समजलं होतं की या संपूर्ण प्रकरणात आरोपींना माहित होतं की आपल्या कारमध्ये अंजली अडकली आहे. तसंच तिचा मृतदेह सोडून आपण पळून गेलो असंही आरोपींनी सांगितलं आहे. मग स्वाती मलिवाल यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे की या प्रकरणात अद्याप आरोपींच्या विरोधात कलम ३०२ का लावण्यात आलेलं नाही? हे सगळे प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. आता हे प्रकरण कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.