इमानदारीने चौकीदारी करणारा चौकीदार देशाच्या चौकीदारामुळे बदनाम होत असेल तर यासारखे देशाचे दुर्दैव नाही असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याच्या दुसर्‍या दिवसातील दुसरी सभा फलटण येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना धनंजय मुंडे यांनी एक किस्सा सांगितला. मित्राच्या घरी जात असताना गाडीत मोबाईल राहिला त्यावेळी त्या इमारतीच्या खाली उभा असलेल्या चौकीदाराला चौकीदार म्हणून हाक मारली असता ‘साब चौकीदार बोलके गाली मत दो’ अशी विनंती त्याने केली. चौकीदाराबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत असं यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

‘याआधी ७२च्या दुष्काळाचे उदाहरण दिले जात होते मात्र यापुढे २०१७-१८ हे वर्ष भीषण दुष्काळाचे उदाहरण म्हणून दिले जाईल. शेतकरी स्वतःचे सरण रचून आत्महत्या करत आहेत. आणि आज मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून जाहीर करतात की महाराष्ट्रात दुष्काळासाठी चार हजार सातशे कोटींचे पॅकेज केंद्राकडून मिळालंय. शेतकऱ्यांवर काय उपकार केले का?’, असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी यावेळी विचारला.

सरकारमधील मंत्री महादेव जानकर ज्यांना सर्व गोष्टींची जाण आहे असा समज आहे, ते म्हणतात की आम्ही ऑनलाइन चारा देऊ. ऑनलाइन चारा कसा पोहोचेल हो? की त्याचीही अवस्था कर्जमाफीसारखी होईल. काय ऑनलाईन खेळ लावला आहे यांनी? अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.