टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेली संयुक्त संसदीय समिती सत्य लपवित असून या समितीने चौकशीसाठी तत्कालीन दूरसंचारमंत्री ए. राजा यांना न बोलाविणे ही मोठी आगळीक असल्याची टीका भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी केली.
या संयुक्त संसदीय समितीने चौकशीदरम्यान राजा यांना न बोलाविल्याची तक्रार आपण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सभापती मीरा कुमार यांच्याकडे पत्राद्वारे करणार असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. तसेच जर मुख्य आरोपीलाच साक्षीसाठी समितीसमोर आणले जाणार नसेल तर संसदीय समितीचे प्रयोजनच काय उरले, असा संतप्त सवाल राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला. या संसदीय समितीचे अध्यक्ष पी. सी. चाको यांच्यावर त्यांनी तोफ डागली. राजा यांनी चाको यांना काही विपत्रे (ई-मेल) पाठविली असून, त्यामुळे समितीच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे असे  सिन्हा म्हणाले.